छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी भारत संकल्प यात्रेतून लाभार्थी मतदार बनविण्याच्या प्रक्रियेला भाजपकडून वेग दिला जात आहे. लाभार्थींनी आपली यश कहाणी आपल्या तोंडून सांगावी, अशी रचना आखण्यात आली आहे. ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ या प्रयोगाला विकास यात्रेतून केंद्रीय मंत्री हजेरी लावत आहेत. नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी बचत गटातील महिलांच्या कपड्याच्या दुकानातील व्यवहाराची माहिती त्यांच्याच तोंडून ऐकली. बचत गटासाठी मिळणारी कर्ज प्रक्रिया आणि त्यातून मिळालेले लाभ याचे कौतुक महिलांनी केले. काही लाभार्थींनी करोनामध्ये पंतप्रधान स्वनिधी योजनेतून मिळालेल्या कर्जामुळे आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलाची कहाणी सांगितली. मंत्र्याच्या भाषण कमी वेळाचे आणि लाभार्थ्यांना अधिक बोलते करण्याची प्रक्रिया महिलांना भाजपचा मतदार बनिवणारी असल्याचा दावा केला आहे.
राज्यस्तरीय बँकिक समितीच्या अहवालानुसार राज्यात एक लाख ५७ हजार ४५० स्वयंसहाय्यता गट आहेत. या प्रत्येक गटात दहा महिला, म्हणजे १५ लाखाहून अधिक महिला आपल्या प्रगतीसाठी बचत करतात आणि त्या बचतीच्या आधारे कर्ज घेतात. राज्यात २६७ कोटी रुपयांच्या बचतीतून १२७४ कोटी रुपंयाचे कर्ज महिला बचत गटांना देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बचत गटाशी असा संवाद साधण्याचा अर्थ या सर्व महिलांपर्यंत पोहचविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम शहरातील वस्त्यांच्या भोवताली, गजबजलेल्या भागात ठेवला जात आहे. काही गावात या संकल्प यात्रेला विरोधही होत आहे. परभणी, हिंगोली या जिल्ह्यात ही यात्रा योजनेच्या प्रचाराऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला. पण शहरी भागात महिलांना सोबत घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. ‘माझ्या तोंडून माझी गोष्ट’ ही रचना त्याच प्रक्रियेचा भाग आहे. आयुष्यमान भारत कार्डचा उपयोग करुन घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्याला फायदा हाेत असल्याचे मंत्र्यासमोरच्या कार्यक्रमात आवर्जून सांगितले जात आहे.
हेही वाचा : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा भाजपमधील देशमुख विरूद्ध देशमुख सामना ?
गेल्या काही वर्षांत महिलांचे मतदानावर असणारी पुरुषांचा प्रभाव बदलत असल्याचा दावा केला जात आहे. गेली अनेक वर्षे महिलांचे मतदान हे पुरुष सांगेल त्याला होत असे. आता विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला आपले मतदान स्वत:च्या बुद्धीने करू लागल्या आहेत. त्यामुळेच भाजपचे कार्यकर्ते या मानसिकतेला फुंकर घालू लागले आहेत. ‘लाभार्थींना मतदार करण्याच्या या प्रक्रियेला आता वेग देताना प्रधानमंत्री स्वनिधी योजना, मुद्रा तसेच अन्य वित्तीय योजनांचा महिलांशी आवर्जून संबध जोडला जात आहे.
हेही वाचा : खानापूर – आटपाडीमध्ये भाजप, शिंदे गटातच जुंपली
राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये सहप्रभारी म्हणून काम करणाऱ्या आणि भारतीय जनता महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या विजयाताई रहाटकर म्हणाल्या, अनेक योजनांमुळे महिलाचे आयुष्य सुकर झाले आहे. घरापर्यंत पाणी पोहचल्याने दोन- दोन किलोमीटरवरुन पाणी आणण्याचे कष्ट कमी झाले आहेत. गॅसमुळे धुराड्यात स्वयंपाक करण्याचा त्रासही कमी झाला आहे. अल्प उत्पन्न गटात आता मतदानाचे प्रारुप बदलत असल्याचा राजस्थानमधील कामाचा अनुभव आहे. त्यामुळे भाजपला यश मिळते आहे.