दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : बड्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची रणनीती सर्व पक्षांमध्ये दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिमान नेते मात्र या धोरणाकडे पाठ फिरवत असून त्यांना विधानसभा अधिक प्रिय आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी सहजगत्या मिळत असतानाही त्याला रामराम ठोकला जात आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यासह भाजपच्या यादीत दिसणारी अनेक प्रभावी नावे या यादीमध्ये दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. राजकीय पक्षांच्या बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण असावेत याची चाचपणी केली जात आहे. सक्षम उमेदवाराला लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचे धोरण दिसून येत आहे. अलीकडे पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने लोकसभेतील ताकदीचे नेते रिंगणात उतरवले असता भरघोस यश मिळाल्याचे दिसले. या प्रयोगाचे यश पाहता त्याचीच पुनरावृत्ती आता लोकसभा निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत आहेत. अनेकदा विधानसभेचे मैदान मारलेल्या शक्तिशाली नेत्यांना लोकसभेच्या आखाड्यात आणण्याचा प्रयत्न होत आहेत.

हेही वाचा… भाजपचा दावा तरीही सातारा लोकसभेसाठी शिंदे गटाची तयारी, पुरुषोत्तम जाधव यांना मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल

आहे काँग्रेस प्रबळ तरी

पक्षाला बड्या नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे वाटत असले तरी जिल्हा पातळीवरील नेते मात्र विधानसभा निवडणुकीत अधिक रस दाखवत आहेत. काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा आढावा बैठकी मध्ये काही नावे पाठवण्यात आली होती. त्यात नामोल्लेख असलेले काँग्रेसचे आजी-माजी जिल्हाध्यक्ष एकमेकांकडे बोट दाखवत राहिल्याचे अनेकदा दिसून आले. थेट जिल्हा काँग्रेस भवनात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी जयंतीदिनी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी माजी जिल्ह्याध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील यांच्या सफाईदार हिंदी भाषणाचे कौतुक करून त्याचा त्यांना चांगला उपयोग होईल,असे म्हणत लोकसभा निवडणुकीसाठी ते पात्र असल्याचे सूचित केले होते. त्याचवेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष,आमदार सतेज पाटील यांनीही माझ्यापेक्षा तुमची हिंदी भाषा चांगली असल्याचे म्हणत पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवावी, असे संकेत दिले. परंतु , पी. एन.पाटील यांनी लोकसभेसाठी आमदार सतेज पाटील हेच योग्य उमेदवार असल्याचे सांगत चेंडू त्यांच्याकडे टोलवला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आले होते तेव्हाही सतेज पाटील – पी. एन. पाटील यांनी लोकसभेचे उमेदवार म्हणून एकमेकांकडे बोट दाखवले. ताज्या मुलाखतीत पी. एन. पाटील यांनी लोकसभा लढवणार नाही. विधानसभा मात्र जिंकून दाखवणार असा निर्धार व्यक्त केला आहे. यामुळे दोन्ही पाटील लोकसभेच्या आखाड्यापासून बाजूला जात आहेत हेच पुनःपुन्हा स्पष्ट होत आहे. त्यांच्याइतके दुसरे सक्षम उमेदवार नसल्याने जिल्ह्यातील सर्वात प्रबळ पक्ष असा दावा करणाऱ्या काँग्रेसवर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार आयात करण्याची वेळ आल्याचे दिसते.

कागलच बरे

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेही नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे. अलीकडे त्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढवण्याचा विचार करू असे म्हटले होते. यापूर्वी त्यांनी अनेकदा कागल विधानसभेची दोन वेळा निवडणूक लढवणार, त्यानंतर खासदार होणार आणि मग केंद्रात मंत्री होणार असे विधान केले आहे. ही विधाने पाहता त्यांनाही लोकसभेमध्ये तूर्तास रस नाही. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष, शाहू उद्योग समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे यांचेही नाव भाजपच्या यादीत दिसते. तथापि, घाटगे यांनीही कागल विधानसभा लढवून जिंकायची आहे असा निर्धार केला आहे.

हेही वाचा… बिल्किस बानो प्रकरणी आरोपींच्या शिक्षामाफीवर महाराष्ट्र सरकार अनुकूल भूमिका घेणार का ?

हातकणंगलेतही तेच चित्र

हातकणंगले लोकसभा मतदार संघ शिंदेसेनेकडे आहे. हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी केली जात आहे. येथे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, भाजपला पाठिंबा दिलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश आवाडे यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, या तिन्ही आजी-माजी आमदारांना लोकसभेपेक्षा विधानसभा अधिक प्रिय दिसते. आवाडे हे त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी या प्रयत्नात आहेत. एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांना लोकसभेसाठी विचारणा केली जात असली तरी त्यांना दिल्लीपेक्षा मुंबई प्यारी वाटत आहे.

प्रभावी राजकीय नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास पुढे आले तर अनेकांची विधानसभेची वाट सुकर होणार आहे. हसन मुश्रीफ वा समरजितसिंह घाटगे यापैकी कोणीही लोकसभेसाठी तयारी दर्शवली तर दुसऱ्याचा कागल मधून विधानसभेत जाण्याचा मार्ग अगदीच प्रशस्त होऊ शकतो. पी. एन. पाटील यांनी लोकसभेसाठी तयारी केली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदेसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांना करवीर विधानसभेसाठी फारशा खस्ता खाव्या लागणार नाहीत. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे किंवा सुरेश हाळवणकर यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागली तर दुसऱ्यासाठी विधानसभा निवडणूक तुलनेने सोपी असू शकते. मात्र, हि शक्याशक्यता जरतर वर अवलंबून आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur district big leaders preferring than assembly election in lok sabha print politics news asj
Show comments