उपसरपंच ते माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार असा चढत्या भाजणीचा राजकीय प्रवास धैर्यशील मोहिते पाटील यांचा आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पुतण्या, तर आमदार रणजितसिंह यांचा चुलतभाऊ ही त्यांची आणखी एक ओळख आहे. यापूर्वी विजयसिंह यांनीदेखील माढ्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या क्षेत्रांत धैर्यशील यांनी आपला ठसा उमटवला आहे. राजकारणात पहिल्यांदा ते अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले. दांडगा जनसंपर्क, नेतृत्व गुण, राजकीय पाठबळ या जोरावर ते भाजपतून बंड करून खासदार झाले.

अकलूजचे मोहिते पाटील घराणे राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू आहे. (कै.) शंकरराव मोहिते पाटील हे त्या काळी जाणते नेते आणि सहकार चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जात. पुढे त्यांचे पुत्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खाती, तसेच उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. त्यांचा पुतण्या धैर्यशील यांनी २००० मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि ते अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले. पुढे त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकाजिंकल्या. विजयसिंह मोहिते पाटील मात्र, पाच वर्षांपूर्वी त्यांनी राजकीय कोंडीतून पवार आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपत प्रवेश केला. त्यानंतर भाजपने धैर्यशील यांना रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य, भाजप सोलापूरचे संघटन सचिव, माळशिरस विधानसभा निवडणूकप्रमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य या पदांवर काम करण्याची संधी दिली.

हेही वाचा : “संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”; RSS चा भाजपाला घरचा आहेर

माढ्यातून भाजपच्या उमेदवारीसाठी धैर्यशील प्रयत्नशील होते. पण पक्षाने त्यांना संधी दिली नाही. मग त्यांनी मतदारसंघात दौरा सुरू केला. अपक्ष लढण्याचे सुतोवाच केले होेत. भाजपकडून त्यांची मनधरणी केली जात होती. पण शेवटी मोहिते-पाटील घराण्यानेच शरद पवारांबरोबर पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या विरोधात धैर्यशील लढले. यामुळेच भाजपला आधी सोपी वाटणारी ही निवडणूक अवघड झाली. धैर्यशील मोहिते-पाटील निवडून आले. बंडाचे त्यांना फळ मिळाले. निवडून आले असले तरी आश्वासनांमधून तयार झालेली प्रचंड आव्हाने आणि आता सत्तेची सुटलेली साथ यातून त्यांना मार्गक्रमण करत यश मिळवावे लागणार आहे.