महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर वरचष्मा असणाऱ्या नेत्यांनाच सर्वपक्षीयांनी उमेदवारीमध्ये वरचे स्थान दिले आहे. प्रचार मुद्द्यांपेक्षा जात आणि आरक्षण आणि अभुतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत ‘साखरमाया’ घेऊन उतरणारे २४ नेते आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहीत पवार यांच्यासह कॉग्रेसचे नेते अमित देशमुख, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, तानाजी सावंत, राजेश टाेपे, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह २४ साखर कारखांनदारांसह अनेकांनी त्यांच्या मुलांनाही मैदानात उतरले आहेत. सहकारी साखर कारखाने खासगी करताना आणि त्यांच्या विक्रीतील घोटाळ्यांमुळे गेल्या दशकभराच्या राजकारणावर ‘साखर गोडी’तून पकड मिळावी म्हणून सत्ताधारी भाजपने बरेच प्रयत्न केले. उमेदवारीच्या पहिल्या यादीमध्ये ‘साखर सम्राटां’ चा जोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान बदलात आणि आवर्षण प्रवण क्षेत्रात ‘साखरमाया’ जमविणारे वरच्या स्थानावर नेते म्हणजे अमित देशमुख. लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी घोषित झालेल्या अमित देशमुख २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. ते खासगी व सहकारी मिळून १६ ते १८ कारखाने चालवतात. या यादीमध्ये जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, तानाजी सावंत, रत्नाकर गुट्टे यांचीही नावे आहेत. राजेश टाेपे सहा वेळेस निवडून आले आहेत. तर रत्नाकर गुट्टे यांच्यावर अनेक अरोप असताना व ते करागृहात असतानाही गंगाखेड मतदारसंघातून २०१९ मध्ये निवडून आले होते.

वडिलांची कृपा म्हणून राजकारणात आलेले अमित देशमुख आणि राजेश टाेपे आपापल्या मतदारसंघात स्थिरावले आहेत. तीन वेळा निवडून येणाऱ्या अमित देशमुख यांच्या देखरेखीखाली जवळपास १८ साखर कारखाने सुरू आहेत. राजेश टाेपे ह समर्थ आणि सागर हे दोन कारखाने चालवतात. साखर कारखान्यातून होणाऱ्या राजकीय संबंधाचा अभ्यास असणारे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील म्हणाले ,‘‘ पाच हजार गाळप क्षमतेचा मतदारसंघातील एक कारखाना म्हणजे १५ ते २० हजार कुटुंबातील संपर्काचे केंद्र असते. प्रत्येकाच्या घरातील तीन किंवा चार मतदार म्हणजे ६० ते ६५ हजार सभासदांचा मतदारसंघ बांधलेला असतो. या प्रत्येकाच्या घरातील छोट्या मोठ्या कार्यक्रमाची निमंत्रणे शेतकरी त्यांच्या नेत्यांकडे आवर्जून पाठवतात. केंद्रामध्ये स्वतंत्र ‘ सहकार ’ करणे या मतदारसंघावरची पकड निर्माण करण्याचा एक भाग आहे.’’

महाराष्ट्राच्या राजकारणावर वचक निर्माण करण्यासाठी भाजपने या क्षेत्राचा पुरेपूर उपयोग केला असे साखर कारखाना विक्रीतील घोटाळ्यांवर याचिका दाखल करणाऱ्या माणिक जाधव यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी उतविण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तरी बहुतांश साखर कारखांनदारांची नावे पुढे येतात. अजित पवार यांचे भाजपबरोबरचे नवे मैत्र, हे याच कारणातून निर्माण झाले.’ मराठवाड्यातून प्रमुख नेत्यांबरोबरच भोकरदनमधून संतोष दानवे, रमेश आडसकर ही राजकीय नेत्यांच्या वारसाची ताकदही साखरगोडीमध्येच दडलेले आहे. खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया, रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे, बाबुराव आडसकर यांचा मुलगा रमेश आडसकरही हेही साखरेच्या राजकारणातील गोडी ओळखून आहेत.

हे ही वाचा… आजी विरुद्ध माजी गृहमंत्र्यांमधील लढतीची अफवाच ठरली …..

साखर कारखाना आणि घोटाळ्यातील नावांमध्ये सर्वाधिक चर्चत असणारे नाव होते रत्नाकर गुट्टे यांचे. गंगाखेड मतदारसंघातून त्यांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. गंगाखेड शुगर्समधील अनेक प्रकारच्या घोळांमध्ये थेट अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केलेल्या गुट्टे यांनी पुन्हा एकदा गंगाखेड मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. या कारखांनदारांच्या संपत्तीचे तपशीलाचेही आता मतदारांना आश्चर्य वाटत नाहीत.

हे कारखांनदार निवडणुकीच्या रिंगणात

बारामती -अजित पवार, जामखेड- रोहीत पवार, शिर्डी – राधाकृष्ण विखे , कोपरगाव – आशितोष काळे, दिलीप वळसे पाटील – आंबेगाव, कागल- हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे – परळी, प्रकाश साेळंके – माजलगाव, बाबासाहेब पाटील – अहमदपूर, शंकरराव गडाख – नेवासा, सांगोला – दिलीप आबा पाटील, राधानगरी- के. पी. पाटील, इस्लामपूर – जयंत पाटील, घनसांगवी – राजेश टोपे, वसमत – जयप्रकाश दांडेगावकर, इंदापूर – हर्षवर्धन पाटील, राहुरी – प्राजक्त तनपुरे, शिराळा- मानसिंग नाईक, संगमनेर- बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत – परंडा, औसा -अभिमन्यू पवार, निलंगा- संभाजी पाटील, तुळजापूर -राणा जगजीतसिंह , सोलापूर- सुभाष देशमुख

हे ही वाचा… नागपूर, रामटेकवरील दावा कायम; काँग्रेस नेत्यांची पुन्हा दिल्लीकडे धाव

‘साखरमाया’ एवढी महत्त्वाची का ?

राज्याच्या राजकारणातील अंमलबजावणी संचालनालयाकडे देण्यात आलेली बहुतांश प्रकरणे साखर कारखाना विक्रीतील आहेत. याबाबतची पहिली तक्रार अण्णा हजारे आणि कॉ. माणिक जाधव यांनी रमाबाई आंबेडकरनगर पाेलीस ठाण्यात केली होती. राज्य बँकच्या लेखा परीक्षणात, सहकार खात्यांच्या ८८ कलमान्वये केलेल्या चौकशीमध्ये पुढे राज्य बँकेवर प्रशासक नेमताना साखर कारखान्यांना दिलेली कर्ज आणि त्यातून नियमबाह्य झालेल्या बाबींवर बोट ठेवत मोठा गहजब करण्यात आला. अनेकांवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. पुढे अजित पवार यांच्या विरोधात अनेक आरोप झाले. आरोपाने ज्या भाजपने राष्ट्रवादीतील नेत्यांना घेरले होते. ते अजित पवार भाजपच्या बरोबर आले. त्यानंतर भाजप नेत्यांनी साखर कारखान्यातील गैरव्यवहारावर बोलणेच सोडून दिले. आजही या प्रकरणात तक्रार ॲड्. सतीश तळेकर यांच्या तक्रारदारांनी जीवंत ठेवलेली आहे. साखर कारखांनदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. साखर कारखान्यातील गैरव्यवहारवर कारवाईचा केवळ दिखावा करुन महाराष्ट्रात पद्धतशीरपणे राजकारण केले गेले. त्यातून अनेक पक्षांतरे झाली, असे या प्रकरणाची वकिली करणारे ॲड्. सतीश तळेकर यांचे मत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra assembly election 24 candidates are from sugar factory lobbies print politics news asj
Show comments