मुंबई : महाराष्ट्र हा कोणत्याच क्षेत्रात मागे नाही आहे. तो स्वाभिमानी असून येथील पुढच्या पिढ्या स्वाभिमानाने जगल्या पाहिजेत, पण दिल्लीतील दोन ठग राज्यावर गुलामगिरी लादू पाहत आहेत. त्यामुळे आपण या दोन ठगांची गुलामगिरी का स्वीकारायची, अशा शब्दात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांवर टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाचा जाहीर करण्याचे आवाहन करतानाच आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार असे बोललेलो नाही, असा टोला फडणवीस यांना लगावला.

लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी शिवसेनेची राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद दादर येथील शिवाजी महाराज मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर केली टीका केली. महाराष्ट्रात गुजराती आणि मराठी असा वाद कधीच नव्हता. पण तिथे ठग बसलेत, त्यांनी गुजारात आणि संपूर्ण देश अशी भिंत बांधली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती. पण दोन ठग महाराजांचा महाराष्ट्र लुटताहेत. तोच लुटीचा पैसा वापरून स्वत:ची जाहिरात करत आहेत. सरकारवर विश्वास नसला तरी सरकारच्या जाहिरातीवर अजून लोकांचा विश्वास आहे. जे फेक नरेटिव्ह म्हणतात ते जाहिरातीच्या माध्यमातून हे बिघाडी सरकार दाखवत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : मावळतीचे मोजमाप: आरोग्यासाठी अपुरा निधी आणि खर्चाची तरतूदही अल्पच

यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करावे असा पुनरुच्चार केला. काँग्रेस व राष्ट्रवादीने कोणाचेही नाव जाहीर केल्यास तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्या नावाला माझा आताच पाठिंबा देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी आमचा खांदा वापरला. खांद्याचे दोन अर्थ होतात. तेव्हाही तुम्हाला दिला आताही तुम्हाला राजकारणामध्ये खांदा द्यायची इच्छा आहे. जनता वाटच बघतेय, असे सांगत हा मतलबीपणा तुमचा लपून राहिलेला नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.