लोकसभा निनडणुकीतील यशानंतर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांतील विजयापाठोपाठ मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत सर्व दहाही जागा जिंकून शिवसेना ठाकरे गटाने मुंबईवरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पदवीधर तसेच अधिसभेतील यशाने सुशिक्षित तसेच मध्यमवर्गीयांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने आपली पकड अधिक घट्ट केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक यंदा चांगलीच गाजली. तीन वेळा विविध कारणाने निवडणूक लांबणीवर पडल्याने सत्ताधआरी महायुती पराभवाच्या भीतीनेच मुद्दामहून निवडणूक टाळत असल्याची चर्चा सुरू झाली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तसा जाहीरपणे आरोप केला होता. या वेळीही निवडणूक टाळण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. प्रकरण न्यायालयात गेले. पण न्यायालयानेच निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. शेवटी पार पडलेल्या या निवडणुकीत सर्व दहाही जागा जिंकून शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले.

हेही वाचा : Waqf Bill :भाजपा खासदार निशिकांत दुबेंचा गंभीर आरोप, “वक्फ बोर्डाच्या ‘त्या’ सूचना आणि हरकतींमागे ISI, चीन..”

अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने विजय संपादन करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पदवीधरमध्ये भाजपने सारी ताकद पणाला लावूनही शिवसेनेचे अनिल परब मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर हे निवडून आले. पदवीधर आणि शिक्षकपाठोपाठ मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत सर्व दहाही जागा जिंकून शिवसेना ठाकरे गटाने सुशिक्षित तसेच मध्यवर्गीय मतदार असलेल्या या वर्गावर आपली पकड अधिक घट्ट केली.

मुंबईत ठाकरे गटावर कुरघोडी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे प्रयत्न सुरू असतात. पण पदवीधर तसेच शिक्षकपाठोपाठ अधिसभा जिंकून ठाकरे गटाने शिंदे व भाजपचे सारे मनसुबे हाणून पाडले आहेत.

हेही वाचा : गंगाजल-गोमूत्र प्राशन करायला लावून काँग्रेस नगरसेवकांचं शुद्धीकरण? महापौर म्हणाल्या, “आता ते भ्रष्टाचारमुक्त झाले”

शिवसेनेची फुटीनंतर शिंदे गटाने संघटनेवर तसेच पारंपारिक मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. पण लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने शिंदे गटाला मागे टाकून शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण कायम आहे हाच संदेश दिला. लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि कोकण या शिवसेना ठाकरे गटाच्या पारंपारिक बालेकिल्ल्यात शिंदे गट आणि भाजपने विजय संपादन केला. पण मुंबईत तीन जागा जिंकून ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम स्स्पष्ट केले. चौथी जागाही अवघ्या काही मतांनी गमवावी लागली. मुंबई आणि शिवसेना ठाकरे गट हे समीकरण कायम असल्याचे सिद्ध होते हेच विविध निकालांवरून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे गटावर कुरघोडीसाठी टपलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ते आणि नेत्यांचा आवाज या निकालाने बंद झाला आहे.

शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत मिळालेले यश :

लोकसभा निवडणूक – तीन जागा

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ

अधिसभा – सर्व दहा जागा