नांदेड : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची नात श्रीजया अशोक चव्हाण हिचे राजकीय पदार्पण काँग्रेसच्या माध्यमातून पण विधानसभेच्या उमेदवारीची दावेदारी भाजपाकडून अशी स्थिती एव्हाना समोर आली आहे. मागील दोन महिन्यांपासून अनेक वाहनांच्या ताफ्यासह या ‘राज’कन्येने भोकर मतदारसंघ पिंजून काढला आहे. पण ६० वर्षांपूर्वी याच कन्येच्या आजीने म्हणजे कुसुमताई चव्हाण यांनी पायपीट करून भोकर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये काँग्रेस आणि शंकररावांसाठी प्रचार केला होता.

विधानसभा निवडणुकीची धामधूम पुढील काही दिवसांत सुरू होईल. जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांसह विधानसभेमध्ये प्रथमच जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या इच्छुकांनी आपल्या मतदारसंघात भेटी आणि बैठकांचे सत्र सुरू केले असून त्यात भोकरसाठी इच्छुक असलेल्या श्रीजया चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.

हेही वाचा : लवकरच राज्यभर दौरे, पंकजा मुंडे यांची घोषणा; गोरगरिबांसाठी कामे करण्याचा निर्धार

चव्हाण कुटुंबातील शंकरराव अशोक आणि अमिता चव्हाण या तीन सदस्यांनी भोकरमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या; पण या परिवारातील चौथा प्रतिनिधी भाजपाकडून काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाला असून चव्हाण कुटुंबातील हा बदल लक्षणीय समजला जातो. निवडणुकीद्वारे अशोक चव्हाण यांना आपल्या राजकीय कृतीच्या योग्यतेवर शिक्कामोर्तबही करून घ्यायचे आहे. भोकर मतदारसंघाला काँग्रेसमय करण्याचा पाया शंकररावांनी ६०च्या दशकात घातला. नव्या शतकात त्यावर कळस चढविण्याचे काम त्यांच्या पुत्राने कुशलतेने केले. शंकररावांच्या भोकरमधील पहिल्या निवडणुकीतील आठवणी त्यांच्या सहचारिणी कुसुमताई यांनी नोंदवून ठेवल्या आहेत. आज अशोक चव्हाण यांच्यासाठी या मतदारसंघात शेकडो वाहने वेगवेगळ्या गावांमध्ये धावत आहेत. पण शंकररावांच्या जमान्यातील कार्यकर्ते बैलगाडी किंवा सायकलवरून प्रचारासाठी फिरत असत. आमच्याकडे सायकलीशिवाय अन्य वाहनच नव्हते, असे कुसुमताईंनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे.

६० वर्षांपूर्वीच्या निवडणूक काळातील चित्र उभे करताना कुसुमताईंनी नेते आणि कार्यकर्त्यांचा साधेपणाही सांगितला आहे. शंकररावांच्या प्रचार मोहिमेत तर केवळ एक जीप उपलब्ध होती. खराब रस्त्यावर जीप बंद पडल्यास प्रमुख नेते खाली उतरून जीपला धक्का मारत असत, वेळ पडली तर पुढचा प्रवास पायी करत असत, असे त्यांनी नमूद केले आहे. त्या निवडणुकीतील शंकररावांचा खर्च होता केवळ अडीचशे रुपये!

भोकर मतदारसंघामध्ये ‘काँग्रेस म्हणू, काँग्रेसच आणू’ हे वळण शंकरराव चव्हाण, बाबा पाटील बन्नाळीकर, भुजंगराव पाटील किन्हाळकर यांनी लावले. या सर्वांच्या पश्चात अशोक चव्हाणही त्याच वळणाने पुढे जात होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी व त्यांच्या परिवाराने अचानक भाजपात प्रवेश करून भोकर मतदारसंघावर भाजपाचा झेंडा फडकविण्याची तयारी आता जोरकसपणे केली आहे.

हेही वाचा : “मतांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकवा”, राज ठाकरे यांचे मतदारांना आवाहन

‘स्थानिकांना विश्वासात घेऊन संवाद’

भोकर मतदारसंघातील मुगट, बारड, शेंबोली, भोसी आदी गावांमध्ये पायी हिंडून आम्ही मतदारांशी चर्चा करत असू. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न असायचा. त्यांच्यासमोर आम्ही काँग्रेसची धोरण मांडत असू. या प्रचारमोहिमेमध्ये इतर कुटुंबातील अनेक महिला-भगिनी उत्साहाने सहभागी होत असत. लाखमोलाची माणसं बरोबर असत. त्यांच्या कष्टांमुळे साहेब पहिल्यांदा लोकनियुक्त आमदार झाले आणि नंतर महसूल खात्याचे उपमंत्री, असे दिवंगत कुसुमताई चव्हाण यांनी त्यांच्या ‘कुसुमांजली’ या पुस्तकात म्हटले आहे़