पुणे : पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगावशेरी आणि हडपसर या दोन मतदारसंघांमध्ये महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असताना वडगाव शेरीवर भाजपने, तर हडपसरवर शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभेच्या निवडणुका राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस- अजित पवार सरकारने ‘ महायुती’ च्या माध्यमातून लढण्याचा आणि मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार असेल ती जागा संबंधित पक्षाला सोडली जाईल, अशी प्राथमिक चर्चा तिन्ही पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर झाली आहे. मात्र असे असले तरी स्थानिक पातळीवर मात्र या तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : UP Bypoll Election : भाजपा पोटनिवडणुकीतून अयोध्येतील पराभवाचा बदला घेणार? सपाविरोधात मोठी खेळी, अखिलेश यादवांची रणनिती ठरली!

पुणे शहरातील वडगावशेरी, हडपसर या विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार आगामी विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता असताना या दोन्ही मतदारसंघावर महायुतीत सहभागी असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जागा वाटपावरून महायुतीत जोरदार चढाओढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी टिंगरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. मुळीक यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आता मुळीक यांनी मतदारसंघातील नागरिकांना पत्र लिहिले आहे. ‘ आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद मला पुन्हा हवे आहेत’ अशा आशयाचे हे पत्र असून यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?

भाजपच्या पत्राने अस्वस्थता

पाच वर्षांपूर्वी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत वडगावशेरी मतदार संघात सुनील टिंगरे विरुद्ध जगदीश मुळीक अशी लढत झाली होती. यामध्ये मुळीक यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला आपला पाठिंबा जाहीर करत अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा संकल्प या तीनही नेत्यांनी केला आहे. त्यामुळे जागा वाटपावरून या तीनही पक्षांत स्थानिक पातळीवर राजकारण होणार हे निश्चित झाले आहे. वडगावशेरीची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असताना भाजपचे माजी आमदार मुळीक यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मुळीक यांनी मतदारसंघातील जनतेला पत्र लिहत नवा डाव टाकला आहे. त्यांचे हे पत्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. २०१९ मध्ये थोडक्यात पराभव झाला. मात्र दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. आमदार असताना काम केले. शहराध्यक्ष असताना तत्कालीन सरकारला धारेवर धरले. आता विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद मला पुन्हा हवे आहेत. यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीने आणि अधिक जोमाने आपल्या सहकार्याची आवश्यकता लागेल, असे आवाहन जगदीश मुळीक यांनी या पत्रात केले आहे.

हेही वाचा : Amit Shah: अमित शाह यांचा बैठकांचा सपाटा; देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, गडकरींची अनुपस्थिती, मराठा आंदोलनाच्या प्रश्नांवर काय म्हणाले?

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघापाठोपाठ आता हडपसरवर देखील महायुतीत सहभागी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने फ्लेक्स लावले असून ‘ हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेचाच’ असा मजकूर त्यावर लिहण्यात आला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. चेतन तुपे हे या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी देखील गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भानगिरे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्यात सत्ताधारी असलेल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी महायुती मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. असे असले तरी स्थानिक पातळीवर या तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान या तीनही पक्षांच्या नेत्यांना स्वीकारून या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी लागणार आहे. अन्यथा महायुतीतील या वादाचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होणार हे निश्चित आहे.