हर्षद कशाळकर
अलिबाग : रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच हवा यासाठी शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते आग्रही होते. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती पूर्णही केली. पण अवघ्या दिड वर्षात शिवसेनेच्याच पालकमंत्र्यांना शिवसैनिक कंटाळले आहेत. पक्षसंघटनेसाठी पालकमंत्री उदय सामंत वेळ देत नाहीत, त्यांच्या खात्याचाही जिल्ह्याला कुठलाच फायदा होताना दिसत नाही असा सूर आळवायला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरूवात केली आहे. शिवसेना शिंदे गटातील पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे पालकमंत्री नको असा नारा रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी दिला होता. अदिती तटकरे शिवसेनेला विकास निधी देत नाहीत. आमदारांच्या कामाचे श्रेय घेतात, शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करतात. या सारखे आरोप करत शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी पालकमंत्री हटावचा नारा दिला होता, पण तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दाद दिली नाही, म्हणून पक्षांतर्गत बंड करत शिंदे गटात सहभागी झाले होते. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यावर रायगडचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी आग्रही मागणी या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यामुळे शिवसेनेच्याच उदय सामंत यांची रायगडच्या पालकमंत्री पदावर वर्णी लागली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात उत्साहाचे वातावरण होते.

हेही वाचा… मावळमध्ये खासदार बारणे उमेदवारीवर निश्चिंत

उदय सामंत यांनीही सुरवातीच्या काळात जिल्ह्यात आपली छाप पाडण्याचा प्रय़त्न केला. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार दरबारसारखे उपक्रम राबविले. जिल्ह्यात उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची स्वप्न दाखवली. पक्षासाठी कधी बोलवा येईल अशी ग्वाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. पण नव्याची नवलाई सरली आणि शिवसेनेचेच पालकमंत्री पदाधिकाऱ्यांना खटकू लागले. सामंत पक्ष आणि पदाधिकाऱी यांच्यासाठी वेळ देत नाही. राज्याचे उद्योगमंत्री असूनही ते बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाऊले उचलत नाहीत यासारखे आक्षेप त्यांनी घेतले आहेत. अलिबाग येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगेश सातमकर यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारीणीची सभा पार पडली यावेळी जिल्हाप्रमुख राजा केणी आणि जिल्हा संघटक प्रकाश देसाई यांनी पालकमंत्र्याच्या कार्यप्रणालीबाबतची जाहीर नाराजी व्यक्त केली. नेत्‍याने आपल्‍यासाठी वेळ द्यावा, आपल्‍या समस्‍या समजून घ्‍याव्‍यात असं कार्यकर्त्‍यांना वाटते. उदय सामंत राज्‍याचा कारभारपाहतात त्‍यामुळे ते पुरेसा वेळ देवू शकत नसले तरी शक्‍य तेवढा वेळ देण्‍याचा प्रयत्‍न करतात, अशी सारवासारव यावेळी सातमकर यांनी केली.

हेही वाचा… पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे भाजप नेत्यांचे नवाब मलिकांबाबत मौन

सामंत हे मुळचे रत्नागिरीचे, त्यांचा मदतारसंघही रत्नागिरीत आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांचा ओढा रत्नागिरीकडे असणे स्वाभाविक आहे. पण हे करत असतांना त्यांनी रायगडसाठी शक्य तितका वेळ द्यावा अशी माफक अपेक्षा शिवसेना पदाधिकाऱ्यांची आहे. पण ते होतांना दिसत नाही. अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर उदय सामंत यांनी हळुहळू रायगड जिल्ह्यात येणे कमी केले आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रशासकीय पकड सैल होत चालली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड घट्ट झाली आहे. खासदार सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांचा प्रशासनावर वचक वाढला आहे. हे देखिल शिवसैनिकांच्या नाराजीचे एक कारण आहे.

रायगड जिल्ह्यात गेल आण आरसीएफ नवीन प्रकल्प येऊ घातले आहेत. या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. गेल प्रकल्पाविरोधात त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यामुळे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची कोंडी होतांना दिसते आहे. हीबाब प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न उदय सामंत यांनी सोडवावा अशी अपेक्षा स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे. पण प्रकल्पग्रस्तांना सरसकट नोकऱ्यामध्ये सामावून घेणे शक्य नसल्याने, अवास्तव मागण्या मान्य करणे शक्य नसल्याने उद्योग मंत्री सामंत यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad district eknath shinde group upset against guardian minister uday samant print politics news asj