सांगली : मरळनाथपूर (ता. वाळवा) या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत यांना भाजपमधून पुन्हा एकदा विधानपरिषदेचे आमदार पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या उस पट्ट्यात शेतकरी चळवळीत एकेकाळी सर्जा-राजाची जोडी म्हणून ओळखले जाणारे खोत दुसर्यांचा विधीमंडळाच्या सभागृहाचे सदस्य होण्याची संधी आली असताना या जोडीतील राजू शेट्टी यांचा मात्र लोकसभा निवडणुकीत दुसर्यांदा पराभव झाला.

सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळीत कार्यरत असतानाच त्यांनी उसदरासाठी शेट्टी यांच्यासोबत आक्रमक चळवळीत भाग घेत साखर कारखानदारांना जेरीस आणण्याचे काम केले. यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी माढा लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला., एनडीएशी झालेल्या युतीतून विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली. त्या जागेवर १० जून २०१६ रोजी त्यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर ८ जुलै २०१६ रोजी त्यांना मंत्रीमंडळातही कृषी, फलोत्पादन व पणन आणि ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम करण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात मिळाली होती.

हेही वाचा : कुणी म्हणे मोदींचे कान आणि डोळे, तर कुणी म्हणे ‘सुपर सीएम’; निवृत्त झालेल्या ‘या’ अधिकाऱ्याची एवढी चर्चा का?

मात्र, विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर त्यांना राजकीय विजनवासात जावे लागले होते. दरम्यानच्या काळात मंत्रीपदावर असताना त्यांची स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांची संघटनेतून हकालपट्टीही झाली. यानंतर त्यांनी रयत क्रांती ही स्वतंत्र संघटना स्थापन करून शेतकरी, शेतमजूर आणि बाराबलुतेदारांच्या हक्कासाठीचा संघर्ष सुरूच ठेवला. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी हातकणंगले मतदार संघातून एनडीएकडून उमेदवारीही मागितली होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाला ही जागा मिळाल्याने त्यांना संधी मिळाली नाही.

हेही वाचा : १८ व्या लोकसभेला उपाध्यक्ष असणार; विरोधकांना पद देण्याची काँग्रेसची मागणी

विधानपरिषदेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपकडे राजकीय पूनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांवर आक्रमकपणे टीका टिपणी करण्यासाठी त्यांच्या ग्रामीण ढंगातील वक्तत्वाचा लाभ घेता येईल या हेतूनेच भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली असावी. आता भाजपचे पुढचे लक्ष्य इस्लामपूर मतदार संघ असणार आहे. या ठिकाणचे प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना घेरण्यासाठीची ही रणनीती तर नाही ना अशी शंका या निमित्ताने उपस्थित होते आहे.