सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याकडे महायुतीतीलच मित्र पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवल्याने महायुतीचा हा मेळावा केवळ शिंदे शिवसेनेचाच असल्याचे स्पष्ट झाले. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे पुढे येत असताना स्थानिक पातळीवर महायुती असणारा अंतविर्रोध यामुळे समोर आला. विधानसभा निवडणूक महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासाठी कसोटीची तर राहणार आहेच, पण त्याही पेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांची कसोटी पाहणारी खानापूर-आटपाडी विधानसभेची निवडणुक ठरणार आहे.

अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्याने जानेवारीपासून ही जागा रिक्त असली तरी बाबर यांचे वारसदार म्हणून सुहास बाबर हे मतदार संघातील विकास कामासाठी कार्यरत राहिले आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना खंबीरपणे साथ देणार्‍यामध्ये स्व. आमदार बाबर यांचा वरचा क्रमांक होता. बाबर यांनाच मंत्री पदाची संधी मिळणार अशी चर्चा असताना त्यांना संधी मिळाली नसली तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी बाबर यांचे स्वप्न असलेल्या विस्तारित टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम मार्गी लावत सुमारे साडेसात हजार कोटींची व्यवस्था केली. खानापूर, आटपाडी, तासगाव या तालुययातील५२ गावांसह माण, खटाव, सांगोला या तालुक्यांनाही या योजनेच्या विस्तारिकरणाचा फायदा होणार आहे. यासाठी सुहास बाबर यांचा आग्रह कामी आला. तसेच विटा बस स्थानकाचे अद्यावतीकरणही मंजूर करून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आला.

हेही वाचा : Haryana Assembly Election: वडील पोलीस अधिकारी, पती सराईत गुन्हेगार आणि निवडणुकीत सामना थेट माजी मुख्यमंत्र्यांशी; कोण आहेत मंजू हुड्डा?

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा म्हणून महायुतीच्या निवडणुक प्रचाराचा शुभारंभच असल्याचे दिसत असल्याने या मेळाव्याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. महायुतीतील जागा वाटप अद्याप निश्‍चित झालेले नसताना खानापूरची जागा शिंदे शिवसेनेलाच मिळणार असे गृहित धरले जात असले तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार) स्थानिक नेत्यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. यामुळे या मेळाव्यात दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले तर स्थानिक पदाधिकार्‍यांची राजकीय कोंडी होणार हे स्पष्ट होते. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने भाजप व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यामुळे विट्यात झालेला शेतकरी मेळावा हा महायुतीचा न होता, केवळ शिंदे शिवसेनेचाच ठरला.

हेही वाचा : Haryana Election: पंतप्रधान मोदी १४ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ घटनेचा वारंवार उल्लेख का करतात? काय घडलं होतं तेव्हा हरियाणात?

या मतदार संघातून निवडणुक लढविण्यास माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील हे राष्ट्रवादीकडून (अजित पवार) ग इच्छुक आहेत, तर भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. विट्याचे पाटील तर कोणत्याही स्थितीत निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीतील भाजपचे संजयकाका पाटील यांच्या प्रचारात हिरीरीने भाग घेतला. मात्र, या मतदार संघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना भाजपपेक्षा अधिक मते मिळाली. मात्र स्थानिक प्रश्‍नाभोवतीच विधानसभा निवडणुकीची प्रचार राहिला पाहिजे असे प्रयत्न सुरू असून त्याला मात देउन टेंभू योजनेच्या विस्तारीकरणाचे भूमीपूजन करून बाबर गटांने बाजी मारली आहे. महायुतीत असलेल्या मित्र पक्षातील मतभेद कसे मिटवले जातात हे पाहणे येत्या काही दिवसात मनोरंजक तर ठरणार आहेच, पण महाविकास आघाडीतूनही खानापूरची जागा आघाडीकडे खेचून आणण्यासाठी खुद्द खा. शरद पवार मैदानात पुढे आले तर आश्‍चर्य वाटणार नाही. आटपाडीतून भाजपचे माजी आ मदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.तर देशमुख आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी वांगीमधील कार्यक्रमात खा.पवार यांची भेट घेउन केलेली चर्चा मतदार संघातील राजकीय मोर्चेबांधणी वेगळ्या मागा्रंने केली जाण्याची चिन्हे दर्शवत आहे. एकंदरित महायुतीतील मित्रांअंतर्गत असलेल्या अविश्‍वाासाच्या वातावरणाचा महाविकास आघाडी पुरेपूर फायदा करून घेण्याच्या मानसिकतेत सध्या आहे.