दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत सामान्य लोकांमध्ये असलेल्या आदराच्या भावनांचा राजकीय कारणासाठी वापर करून राजकीय इप्सित साध्य करण्याची चढाओढच राजकीय कार्यकर्त्यामध्ये लागली असून यातूनच आष्टा येथील नियोजित शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून राजकारण चांगलेच रंगले. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकमेकासमोर उभे ठाकल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

वाळवा मतदार संघामध्ये असलेल्या आष्टा शहराची अगोदरची ओळख ही सव्वा लाखी आष्टा म्हणून आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १८५५ मध्ये स्थापन झालेली नगरपालिका, पिण्याच्या पाण्यासाठी तलाव, बाजारपेठ अशी वेगळी वैशिष्ट्ये या शहराला लाभली आहेत. आज जरी सांगली-इस्लामपूर मार्गावरील एक शहर एवढीच ओळख या शहराला असली तरी शिवकाळापासून या शहराला इतिहास आहे. अफझलखान वधानंतर आदिशाहीतील महत्वाची ठाणी काबीज करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मुलुखगिरीला बाहेर पडले. त्यावेळी वाळव्यात त्यांचा मुक्काम होता. वाळव्याच्या थोरात सरदाराकडे आष्टा होते.

हेही वाचा… रोहित पवार यांचे महत्त्व वाढले

ब्रिटीश काळात सांगलीनंतरचे महत्वाचे व्यापारी केंद्र ठरल्याने ब्रिटीश अधिकारी मुक्कामासाठी वारंवार आष्ट्यात असत. यामुळे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची वर्दळ कायम असल्याने शैक्षणिक सुविधा चांगल्या पध्दतीच्या स्वातंत्र्यपूर्व काळातच उपलब्ध झाल्या होत्या. व्यापारी व प्रशासकीय केंद्र असल्याने नागरी सुविधा देण्यासाठी १८५५ मध्ये नगरपालिका स्थापन झाल्याची ऐतिहासिक नोंद मिळते.

हेही वाचा… बच्‍चू कडूंची वेगळी चूल दबावासाठी?

अशा या शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नगरपालिकेच्या वतीने उभारण्याचा निर्णय अकरा वर्षापुर्वी घेण्यात आला. यासाठी जागाही निश्‍चित करण्यात आली. मात्र, या जागेची मालकी शासनाकडे असल्याने नगरपालिकेकडे हस्तांतरण होणे गरजेचे होते. गेली अकरा वर्षे यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, याला मूर्त स्वरूप येत नव्हते. पुतळा उभारणीसाठी माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षिय समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीने काही प्रमाणात निधी संकलनही केले आहे. मात्र, महाराजांचा पुतळा उभारणीचे काम रखडले होते. यामुळे शिवप्रेमी म्हणून काही कार्यकर्त्यांनी यांनी पुतळा उभारणीसाठी आवश्यक जागा मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन दिले.यानंतर काही मंडळींनी तातडीने हालचाली करीत धरणे आंदोलन केले. यावेळी या प्रश्‍नात राजकारण येत असल्याचे समोर आले.

हेही वाचा… बिहारमध्ये सुरू, महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना होणार का?

याचा राजकीय लाभ उठविण्यासाठी राजकीय पक्षही मैदानात उतरल्याने या प्रश्‍नाचे महत्व अधिक अधोरेखित होत गेले. भाजपचा प्रमुख सहभाग असलेल्या शिवप्रेमींनी हा पुतळा उभारणीचा विषय हाती घेतला असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी व उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी २५ डिसेंबर रोजी दत्त मंदिर मैदानात सिंहासनारूढ महाराजांचा पुतळा रात्रीत उभा केला. यामुळे निर्माण झालेला तणाव कमी होतो की नाही तोपर्यंत पुतळा समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून जागा हस्तांतरणाचा मागणी लावून धरली. मोक्याच्या ठिकाणी दीड हजार चौरस फूट जागेची मागणी यासाठी करण्यात आली आहे. या मागणीचा लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन प्रशासकीय पातळीवरून मिळाले असताना भाजप कार्यकर्त्यांनी शिवभक्तांच्या मदतीने गेल्या आठवड्यात रात्रीत महाराजांचा अश्‍वारूढ बारा फुटी पुतळा उभा करून या मागणीमध्ये आम्हीसुध्दा आग्रही आहोत हे दर्शविण्याचा प्रयत्न केला. विनापरवाना उभारण्यात आलेला पुतळा कायमस्वरूपी राहू शकत नाही हे ज्ञात असतानाही यासाठी आग्रह धरत ठिय्या मारला. प्रशासनानेही राजकीय दबावाला बळी न पडता परिसर ताब्यात घेण्यासाठी जमावबंदी आदेश लागू करून ज्या गनिमी काव्याने पुतळा उभारण्यात आल्या, त्याच पध्दतीचा अवलंब करीत रात्रीमध्येच पुतळा सुरक्षित स्थळी हलविण्यात आला. याचा निषेध म्हणून वाळवा तालुका बंदची हाक भाजपच्यावतीने देण्यात आली. तणावाच्या स्थितीमध्ये महामार्गावरील वाहतूक रोखण्याचे प्रयत्न भाजपकडून तर वाहतूक सुरूळीत करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होते. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावात भर पडण्याची चिन्हे दिसताच पोलीसांनी अल्प बळाचा वापर करीत कटू प्रसंग टाळला.

आता प्रशासनानेही दीड हजार चौरस फूट जागा नगरपालिकेला हस्तांतर केली यावर महाराजांचा पुतळा उभारणीतील महत्वाचा अडसर दूर झाला आहे. मात्र, यावरून श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. भाजपचे कार्यकर्ते जागा हस्तांतरण आमच्यामुळेच झाले असल्याचे सांगत असून यासाठी फटाके फोडून साखर वाटून आनंदोत्सवही साजरा केला. याला प्रत्युत्तर म्हणून गप्प बसतील ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कसले? त्यांनीही हा भाजपचा प्रसिध्दी स्टंट म्हणून खिी उडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पडद्यामागे मात्र, विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भविष्यात वाळवा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा सामना अधिक रंगतदार होण्यासाठी आष्टा प्रकरण तेवत ठेवण्याचे प्रयत्न दोन्हीकडून होतील यात शंका नाही.

आष्टा येथील पुतळा प्रकरणावरून दुही माजविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत असून यामुळे सामाजिक ऐयय धोययात येण्याची शययता आहे. दोन्ही बाजूंनी सबुरीने वागायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सोबेत घेउनच स्वराज्याची उभारणी केली हे विसरून चालणार नाही. – माजी मंत्री अण्णासाहेब डांगे.

पुतळ्यासाठी जागा हस्तांतरण करण्यात आले असून आता आवश्यक ती परवानगी मिळवून शक्य तितक्या गतीने महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाईल. जागा हस्तांतरणामध्ये सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी असल्याने हे यश कोणा एकाचे म्हणता येणार नाही. – विशाल शिंदे, पुतळा समिती, अध्यक्ष.

नगरपालिकेत ठराव होउनही अकरा वर्षे पुतळा उभारणीचे काम पूर्ण होत नसल्याने शिवप्रेमींच्या भावना तीव्र होत्या. लवकरात लवकर पुतळा उभा करण्यात यावा याच भावनेतून आंदोलनाची भूमिका घेतली. आम्ही मागणी करताच वेगळ्या विचारांच्या मंडळींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. – प्रवीण माने, भाजप युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli politics is in full swing between ncp and bjp on shivaji maharaj statue issue print politics news asj
Show comments