प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर क्रमांक दोनची मते या मतदारसंघात शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी पहिल्याच फेरीत घेतली आणि अचानकपणे या उमेदवारांनी घेतलेल्या मताचे विश्लेषण ठिकठिकाणी लोक आपापल्या परीने करू लागले .राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे हे विजयी होणार हे जवळपास निश्चित होते मात्र पहिल्या पसंतीची क्रमांक दोनची मते भाजपचे किरण पाटील हे घेतील असा अंदाज सर्वांचाच होता. मात्र, या अंदाजाला सुरुंग लावणारी मते शिक्षक संघटनेचे सूर्यकांत विश्वासराव यांनी घेतली.

सूर्यकांत विश्वासराव हे शिक्षक संघटनेचे काम करत असले तरी ते इतके मते घेतील असे काही त्यांचे वातावरण नव्हते. मात्र या निवडणुकीत पुन्हा एकदा जातीचे ध्रुवीकरण झाले व लिंगायत, मराठा या जुन्या वादाचा लाभ सूर्यकांत विश्वासरावाना झाला, त्यामुळेच त्यांना एवढी मते पडली अशी उघड चर्चा मतदारसंघात सुरू आहे . लातूर जिल्ह्यातील लातूर व उदगीर या दोन ठिकाणी साठ वर्षापासून लिंगायत समाजाचे प्राबल्य होते .लातूर शहरातील धान्य बाजारपेठ व सोने बाजारपेठ या दोन्ही बाजारपेठेवर लिंगायत समाजाचे वर्चस्व होते आणि स्वाभाविकपणे ते वर्चस्व राजकारणातही दिसून आले.

हेही वाचा… प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात विदर्भातील काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांची उघड भूमिका

साठ वर्षांपूर्वी क वर्ग नगरपालिका ही लातूरची, लातूर शहरातील दुसरे नगराध्यक्ष म्हणून तमनअप्पा उटगे हे निवडून आले व ते सलग दहा वर्षे नगराध्यक्ष राहिले त्या काळात २१ नगरसेवकांपैकी तब्बल नऊ नगरसेवक एकट्या लिंगायत समाजाचे होते १९६२ साली बाबासाहेब परांजपे यांनी लातूर विधानसभेची निवडणूक लढवली केशवराव सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला मात्र बाबासाहेब परांजपे यांचा प्रचार करणारे लिंगायत समाजाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षातून काढण्यात आले. त्यानंतर १९६७ साली लिंगायत समाज व मारवाडी समाज बापूसाहेब काळदाते यांच्या पाठीमागे उभा राहिला व बापूसाहेब काळदाते यांनी माजी सहकार मंत्री केशवराव सोनवणे यांचा पराभव केला. त्यावेळीच लिंगायत समाजाने आपली ताकद बापूसाहेब काळदाते यांच्या पाठीमागे उभी केली होती तेव्हापासून लातूरच्या राजकारणामध्ये लिंगायत समाजाचे प्राबल्य राहिले. शिवराज पाटील चाकूरकर हे आमदार व खासदार अनेक वर्ष राहिले .लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात मल्लिनाथ महाराज औसेकर,शिवशंकरप्पा उटगे हे आमदार होते. त्यानंतर उदगीर येथे मनोहर पटवारी हे निवडून आले. औसा विधानसभा मतदारसंघातून बसवराज पाटील मुरूमकर हे सलग दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले. जिल्ह्यात अजूनही लिंगायत समाजाचे प्राबल्य असून जातीपातीचे राजकारण आता संपले, या राजकारणाला मूठ माती दिली गेली आहे अशी टाळ्या घेणारी वाक्ये निवडणुकीच्या जाहीर सभांमधून प्रत्येक पक्षाचे मंडळी वापरतात मात्र वस्तुस्थिती अतिशय वेगळी असते. प्रत्येक पक्षालाच जातीपातीच्या राजकारणाचा आधार घ्यावा लागतो ,हे प्रत्येक निवडणुकीत दिसून येते.

हेही वाचा… शिवसेनेच्या ‘ मराठी मुस्लिम ‘ ला तोंड देण्यासाठी भाजपचे व्यापारी व कष्टकरी मुस्लिम हे ‘ लक्ष्य ‘

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बसवराज पाटील मुरूमकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा पराभव भाजपचे अभिमन्यू पवार यांनी केला .जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी निवडून आलेले आमदार हे एका जातीचे व उदगीर विधानसभा मतदारसंघातून राखीव उमेदवार निवडून आला. लिंगायत समाजाचे खच्चीकरण होत आहे ही भावना लिंगायत समाजात वाढू लागली आहे त्यातूनच प्रत्येक पक्षात या समाजाची मंडळी आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात .औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निमित्ताने या समाजाने आपली ताकद दाखवून दिली आहे. नगरपालिका, नगरपंचायत ,पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा प्रत्येक निवडणुकीत या समाजाचा विचार केल्याशिवाय कोणत्याही पक्षाला पुढे जाता येत नाही .शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत जातीपातीचे गणिते होत नसावीत असा सर्वसाधारण विचार केला जातो. मात्र, प्रत्यक्षात याही निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणाला प्राधान्य असल्याचे पुन्हा समोर आल्याने लिंगायत मतपेढीला नव्याने झळाळी मिळाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the aurangabad teacher elections the votes of the lingayat community had an unexpectedly makes large influence print politics news asj
Show comments