नागपूर : शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर विदर्भातील चारपैकी तीन आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी सर्व खासदार आणि विधान परिषद सदस्य आणि माजी आमदार मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
विदर्भात शिवसेनेचे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले चार आमदार असून ते सर्व पश्चिम विदर्भातील आहेत. यात यवतमाळ जिल्ह्यातील संजय राठोड (दिग्रस), बुलढाणा जिल्ह्यातील संजय रायमूलकर (बुलढाणा), संजय गायकवाड (मेहकर) व अकोला जिल्ह्यातील नितीन देशमुख (बाळापूर) यांचा समावेश आहे. यापैकी नितीन देशमुख वगळता तिघे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. नितीन देशमुख यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगितले. आशीष जयस्वाल (रामटेक) आणि नरेंद्र भोंडेकर (भंडारा शहर) हे दोघे अपक्ष आमदार आहेत. दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून दोघेही एकनाथ शिंदेंसोबत आहेत. विदर्भात सेनेचे तीन खासदार आहेत. भावना गवळी (यवतमाळ), प्रतापराव जाधव (बुलढाणा) आणि कृपाल तुमाने (रामटेक) यांचा समावेश आहे. सध्याच्या स्थितीत हे तिन्ही खासदार उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. अमरावतीची माजी खासदारव्दयी अनंत गुढे आणि आनंदराव अडसूळ आणि माजी खासदार प्रकाश जाधव तसेच विधान परिषद सदस्य व नागपूरचे संपर्क प्रमुख दृष्यंत चतुर्वेदी आणि माजी आमदार व सेनेचे ज्येष्ठ नेते गोपीचंद बाजोरिया हे सुद्धा उद्धव ठाकरेंसोबतच आहेत.
बंडाळीनंतर जिल्हापातळीवर शिवसैनिकांमध्ये अस्थिरता वाढली असली तरी त्यांची निष्ठा अजूनही मातोश्रीवर कायम आहे. मात्र पुढच्या काळात या पातळीवरही राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भात पक्ष विस्तार करताना शिवसेनेने ज्यांच्या हातात पक्षाची सूत्रे दिली होती. त्यापैकी बहुतांश नेत्यांनी नंतर पक्ष सोडला. त्यात प्रामुख्याने बाळू धानोरकर (चंद्रपूर), विजय वडेट्टीवार (चंद्रपूर), अशोक शिंदे ( वर्धा जिल्हा), गुलाबराव गावंडे (अकोला), सुबोध मोहिते (नागपूर ) यांचा समावेश आहे. बाळू धानोरकर काँग्रेसचे खासदार आहे तर वडेट्टीवार हे काँग्रेसचेच मंत्री आहेत. अशोक शिंदे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गावंडे व मोहिते सध्या राष्ट्रवादीत आहेत. स्थानिक पातळीवर प्रत्येक जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात सेनेसोबत असणाऱ्या कट्टर शिवसैनिकांनी नंतर पक्षाला”जय महाराष्ट्र’ करून इतर पक्षात प्रवेश केला हे येथे उल्लेखनीय.