यवतमाळ : कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघ गेल्या १० वर्षांत भाजपच्या ताब्यात आहे. २०१४ मध्ये दणदणीत आणि २०१९ मध्ये भाजपने येथे काठावर विजय मिळविला. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघात फटका बसला. त्यामुळे भाजप येथे उमदेवार बदलविणार अशी चर्चा आहे.

आर्णी मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतल्याने हा मतदारसंघ प्रकाशझोतात आला. याच मतदारसंघात मोदींनी भाजप सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केळापूर येथे महिला मेळाव्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. २०१४ मध्ये आर्णी विधानसभा मतदारसंघात मोदींची जादू चालली आणि येथून भाजपचे राजू तोडसाम यांनी काँग्रेस उमेदवार शिवाजीराव मोघे यांचा २० हजारांवर मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये भाजपने येथे राजू तोडसाम यांना उमेदवारी न देता डॉ. संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली. मात्र भाजपचे मताधिक्य घटले. संदीप धुर्वे केवळ तीन हजार १५३ मतांनी विजयी झाले. यावेळीसुद्धा येथे काँग्रेसचे शिवाजीराव मोघे हेच विरोधात उभे होते.

हेही वाचा : परभणीत ‘खान हवा की बाण’चे संदर्भ बदलले !

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आर्णी विधानसभा मतदारसंघाने काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना भक्कम साथ दिली. धानोरकर यांना आर्णी मतदारसंघाने जवळपास १९ हजार ५०० मतांची आघाडी दिल्याने भाजपला चांगलाच हादरा बसला. मतांच्या या नुकसानीचे खापर भाजपचे स्थानिक आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्यावर फोडण्यात आले. संदीप धुर्वे हे विधानसभेत प्रश्न मांडण्यात आघाडीवर राहत असले तरी मतदारसंघात त्यांचा लोकसंपर्क नसल्याची ओरड आहे. भाजपने केलेल्या विविध सर्वेक्षणातूनही स्थानिक आमदारांबद्दल नकारात्मक अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे येथे भाजप यावेळी उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. मात्र संदीप धुर्वे उमेदवारीसाठी मुंबईत तळ ठोकून होते. गेल्यावेळी उमेदवारी नाकारल्याने अपक्ष लढलेले राजू तोडसाम हे उमेदवारीसाठी पुन्हा भाजपमध्ये दाखल होईल, अशी चर्चा आहे.

हेही वाचा : दक्षिण नागपूरमध्ये सेना आग्रही का ?

महाविकास आघाडीत आर्णी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटणार आहे. मात्र यावेळी काँग्रेसकडून शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव जितेंद्र मोघे यांनी उमेदवारी मागितली आहे. याशिवाय आणखी सातजण काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र केंद्रीय समिती येथे पुन्हा शिवाजीराव मोघे यांनाच निवडणूक रिंगणात उतरविण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा शिवाजीराव मोघे यांनीच लढावे, असा आग्रह करीत आहे. या मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होईल, असे चित्र सध्या आहे.