यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. विद्यमान आमदार मदन येरावार हे यावेळी सातव्यांदा निवडणूक लढविणार आहेत. यवतमाळ विधानसभेत आजपर्यंत नऊ वेळा अल्पसंख्याक तर नऊ वेळा कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. त्यामुळे यावेळी चित्र काय, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात जांबुवंतराव धोटे हे तीनवेळा आणि मदन येरावार हेसुद्धा आजपर्यंत तीनवेळा निवडून गेले आहे. १९५२ पासून आजपर्यंत झालेल्या १८ निवडणुकींमध्ये मतदारसंघात अत्यल्प मतदारसंख्या असलेल्या समाजाने येथील प्रतिनिधीत्व केले आहे. त्यात लिंगायत समाजाने सर्वाधिक चार वेळा, आर्यवैश्य समाजाने तीनवेळा तर जैन व मारवाडी समाजाने प्रत्येकी एकवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. इतर नऊवेळा कुणबी समाजाने या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात कुणबी, तेली, माळी, अनुसुचित जाती समाजातील मते सर्वाधिक आहेत. त्याखालोखाल मुस्लीम व इतर समाजाची मते आहेत. मात्र समाजाची बहुसंख्य मते असुनही येथील मतदारांनी कायम अल्पसंख्याक समजातील उमेदवाराची लोकप्रतिनिधी म्हणून निवड केली आहे.

हेही वाचा :Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीची शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर दोनच दिवसांत हकालपट्टी; कोण आहे श्रीकांत पांगारकर?

१९५२ मध्ये काँग्रेसचे ताराचंद सुराणा (मारवाडी) हे येथून विजयी झाले होते. त्यानंतर १९५७ ते १९७८ पर्यंत या मतदारसंघात कुणबी समाजाचे रामचंद्र कडू (१९५७), जांबुवंतराव धोटे (१९६२, १९६४, १९६७, १९७८) आणि नरसिंग कडू (१९७२) यांनी प्रतिनिधीत्व केले. १९८० मध्ये एकाच वर्षात दोन निवडणुका झाल्या. तेव्हा पहिल्यांदा त्र्यंबक देशमुख पारवेकर यांच्या रूपाने लिंगायत समाजाला संधी मिळाली. त्याच वर्षी दुसऱ्यांदा निवडणूक झाली तेव्हा पुन्हा जांबुवंतराव धोटे हे आमदार झाले. १९८५ मध्ये पुन्हा कुणबी समाजाचे सदाशिवराव ठाकरे यांना येथून संधी मिळाली. १९९० मध्ये लिंगायत समाजाचे जवाहर देशमुख पारवेकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. १९९५ मध्ये राजाभाऊ ठाकरे (कुणबी), १९९९ कीर्ती गांधी (जैन), २००४ मदन येरावार (आर्यवैश्य), २००९ नीलेश देशमुख पारवेकर (लिंगायत), २०१३ नंदिनी नीलेश पारवेकर (लिंगायत) आणि २०१४ व २०१९ मध्ये पुन्हा मदन येरावार (आर्यवैश्य) यांनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.

मदन येरावार यांनी १९९९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली. मात्र त्यावेळी ते पराभूत झाले. त्यानंतर २००४ मध्ये ते विजयी झाले. २००९ मध्ये पुन्हा पराभूत झाले. २०१३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. २०१४ मध्ये केवळ एक हजार २२७ मतांनी येरावार विजयी झाले होते. २०१९ मध्येसुद्धा केवळ दोन हजार २५३ मतांनी ते विजयी झाले होते. आता सातव्यांदा येरावार निवडणुकीला सामोरे जात आहेत.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचाच दबदबा ?

महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. मात्र काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या तिन्ही पक्षांनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटणार, हा तिढा सध्या कायम आहे. त्यामुळे २०२४ मध्ये चित्र काय राहील, याकडे मतदारसंघाच्या नजरा लागल्या आहेत.