जयेश सामंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महानगर पट्टयातील अत्यंत महत्वकांक्षी अशा विकास प्रकल्पांच्या लोकार्पणाचा धडाका लावत या संपूर्ण पट्टयातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांवर महायुतीची पकड घट्ट करण्याची आखणी महायुतीच्या नेत्यांनी शुक्रवारी केल्याचे पहायला मिळाले. मुंबई महानगर पट्टयात ३३ हजार कोटींपेक्षा अधिक विकास प्रकल्प सुरु असल्याचे विधान यावेळी खुद्द पंतप्रधानांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या २२ तारखेस आयोध्येत होणारे राम मंदिराचे उद्धाटन, त्यापुर्वी मुंबईत झालेले ‘अटल सेतू’चे लोकार्पण असा हिंदुत्व आणि विकासाचा सरमिसळ असलेला ‘राम-सेतू’ पॅटर्न हाच महायुतीचा महाराष्ट्रातील विशेषत: मुंबई महानगर पट्टयातील आगामी निवडणुकांचा अजेंडा असेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

हेही वाचा… गावित विरुद्ध सारे

मुंबई, ठाणे, पालघर या पट्टयात गेल्या काही वर्षात भाजपची ताकद वाढली आहे. असे असले तरी नेमक्या याच पट्टयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी कडवा सामना करावा लागणार आहे. रायगड आणि त्यास खेटूनच असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातही महायुतीपुढे ठाकरे यांचेच आव्हान असणार आहे. हे लक्षात घेऊन मुंबई महानगर पट्टयाच्या विकासाचे आम्हीच शिल्पकार असा संदेश देण्याचा प्रयत्न पंतप्रधानाच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांनी शुक्रवारी पद्धतशीरपणे केला. ‘अटल सेतू’वरुन रायगड आणि पुढे कोकणाची जमिनही आपल्यासाठी सुपीक कशी होईल याचे आराखडेही मुख्यमंत्र्यांच्या गोटात यानिमीत्ताने बांधले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांसाठी आव्हान

आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील उत्तरेकडील राज्यात भाजपला अनुकूल चित्र असले तरी दक्षिणेत आणि विशेषत: महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना विरोधकांचे कडवे आव्हान असेल असे चित्र सातत्याने मांडले जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्र स्विकारल्यापासून एकनाथ शिंदे कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांसारखा अपवाद वगळला तर एकाही मोठया निवडणुकीला सामोरे गेलेले नाहीत. त्यामुळे येत्या तीन-चार महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा मोठा कस लागणार आहे. मुंबई महानगर पट्टयात गेल्या काही वर्षात भाजपची ताकद मोठया प्रमाणावर वाढली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल यासारख्या शहरांमधील काॅग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पारंपारिक गडांना भाजपने यापुर्वीच सुरुंग लावला आहे. या पट्टयातील अनेक मातब्बर नेते भाजपमध्ये प्रवेश करते झाले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण पट्टा या पक्षासाठी सुपीक असला तरी ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन मुख्यमंत्री पदी स्वार झालेले एकनाथ शिंदे यांना मात्र या भागातून किती साथ मिळते हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा… पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजितदादा गटाला होर्डिंगवर मानाचे स्थान

प्रकल्पांचे लोकार्पण महायुतीच्या पथ्यावर ?

मुंबई महानगर प्रदेशात लोकसभेच्या दहा तर विधानसभेच्या ६० जागा आहेत. रायगड जिल्ह्यात लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या एकूण सात जागा आहेत. शिवसेनेत झालेल्या मोठया फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी मोठी भिस्त अजूनही मुंबईत आहे. ठाणे, कल्याण, रायगड पट्टयातील आमदार, नेते जरी शिंदे यांच्यासोबत दिसत असले तरी मातोश्रीशी निष्ठा राखणारा या भागातील मतदार अजूनही ठाकरे यांच्यासोबत असल्याचे या पक्षाचे म्हणणे आहे. रायगड जिल्ह्यात कर्जत, महाड, अलिबाग, उरण यासारख्या मतदारसंघांमध्ये ठाकरे यांची शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि काॅग्रेस हे एकत्र लढल्यास शिंदे आणि भाजपच्या आमदारांनाही घाम फुटू शकतो हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमधून दिसून आले. या पार्श्वभूमीवर ‘अटल सेतू’सोबत संपूर्ण मुंबई महानगर पट्टयातील मोठया प्रकल्पांचे धडाक्यात लोकार्पण करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचा खुंटा या प्रदेशात अधिक बळकट करण्यास प्रधान्य दिल्याचे पहायला मिळत आहे. ‘अटल सेतू’मुळे नवी मुंबई, पनवेल आणि उरणमधील भाजप आमदारांना गेल्या आठवडाभरापासून वातावरणनिर्मीती करण्यास उत्तम संधी मिळाली. या आमदारांना काय हव काय नको याची पुरेपूर काळजी घेत आपण शिवसेनेचे नाही तर महायुतीचे मुख्यमंत्री आहोत हा संदेश देण्याचा प्रयत्नही यानिमीत्ताने मुख्यमंत्र्यांनी केल्याचे दिसून आले.

हेही वाचा… पुण्यातील महायुती मेळाव्यात अजित पवार भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणता सल्ला देणार ?

ठाणे, रायगड पट्टयातील विधानसभेच्या काही मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारांना भाजपच्या स्थानिक पातळीवरील नाराजीचा फटका बसू शकतो. हे लक्षात घेऊन या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनाही आवश्यक ‘रसद’ कशी मिळेल याची काळजी मुख्यमंत्र्यांच्या गोटातून घेतली जात असून पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमीत्त प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी या दोघा भाजप आमदारांसोबत त्यांनी ‘अटल सेतू’वरुन दोन ते तीन वेळा रपेट केली. याशिवाय या कार्यक्रमाला राम मंदिर उद्धाटनाचे पुर्वरंग देण्यातही भाजपच्या या दोघा आमदारांची पुरेपूर मदत घेण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण पट्टयात महायुतीचा निवडणुक अजेंडा काय असेल हेदेखील यानिमीत्ताने स्पष्ट होऊ लागल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of atal setu and election campaign of mahayuti in mumbai metropolitan region print politics news asj
First published on: 13-01-2024 at 11:36 IST