छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात येत्या आठ- दहा दिवसांत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याची माहिती उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी दिली. ही गुंतवणूक राज्यातील विविध विभागांत असेल असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात टोयोटा, एथर, किर्लोस्कर आणि लुब्रीझॉल या कंपन्यांनी ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यातील काही कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे. यातून २० हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी ही गुंतवणूक येणारच नाही असे खोटे कथन तयार केले जात आहे. त्याला उत्तर देत कंपन्यांच्या व्यवस्थेतील अधिकाऱ्यांसह उद्याोजकांनी सत्कार घडवून आणल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यघटना बदलणार असा अपप्रचार करण्यात आला. तसाच अपप्रचार उद्याोगांबाबत पूर्वी करण्यात आले होते. वेदांता फॉक्सकॉन, एअर बस या प्रकल्पाचा काही एक पत्रव्यवहार नसताना पूर्वी न केलेल्या कामाचे बालंट आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता पुन्हा तोच प्रकार घडू शकतो. म्हणून कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसह सरकारला मानपत्र देण्याचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमधील उद्याोजकांनी घडवून आणला. या नव्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात औद्याोगिक वाढीला मोठी चालना मिळेल असा दावा उद्योगमंत्री सामंत यांनी केला.