मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपला सक्षम स्थानिक पर्यायी नेतृत्व मिळाले नसल्यामुळे विधानसभा निवडणूक जिंकून देण्याची जबाबदारी पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. मोदींनी धडाक्यात प्रचार करूनही कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती उत्तरेकडील तीन राज्यांमध्ये झाली तर, आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता मांडली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशमध्ये चारवेळा मुख्यमंत्री झालेल्या शिवराजसिंह चौहान यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागामध्ये शिवराज यांची लोकप्रियता झपाट्याने घसरू लागल्याचे सांगितले जाते. राज्यातील भाजप सरकारकडून वेगवेगळी आश्वासने दिली असली तरी ती पूर्ण कशी करणार असे लोक विचारू लागले आहेत. ‘मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आपली दिशाभूल करत असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली असून त्याचा मोठा फटका भाजपला मध्य प्रदेशमध्ये बसण्याची शक्यता आहे’, असा दावा भोपाळमधील बिगरभाजप-बिगर काँग्रेस पक्षातील नेत्याने केला.

हेही वाचा – राजस्थान : भाजपाने सात खासदारांना उतरवले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, स्थानिक नेत्यांत नाराजी!

यावेळी शिवराजसिंह चौहान यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवलेले नाही. त्यांची उमेदवारीदेखील तिसऱ्या यादीमध्ये घोषित केली गेली. शिवराज प्रचारात उतरले असले तरी, प्रचाराची सूत्रे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हातात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी मोदी-शहांचे राज्यात दौरे झालेले आहेत. शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नेतृत्व द्यायचे नसल्यामुळे भाजपने नरेंद्र तोमर, प्रल्हाद पटेल, फग्गनसिंह कुलस्ते या केंद्रीयमंत्र्यांचे राजकीय भवितव्य पणाला लावले आहे. या नेत्यांमधून मध्य प्रदेशमध्ये शिवराज यांना पर्याय दिला जाईल असा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण, नेमका नेता कोण याबाबत मतदारांच्या मनात संदिग्धता निर्माण झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

राजस्थानमध्ये भाजपने नेतृत्वाची सूत्रे वसुंधरा राजेंकडून कधीच काढून घेतली होती. त्यांना निवडणुकीसंबंधित एकाही समितीमध्ये सामील करून घेतलेले नाही. मोदी-शहांच्या प्रचारसभेमध्ये त्यांची उपस्थिती असली तरी, त्यांच्याकडे दोन्ही नेत्यांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा होत आहे. वसुंधरा राजेंच्या नेतृत्वाला पर्याय म्हणून भाजपने केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, दिया कुमारी अशी नावे चर्चेत ठेवली आहेत. पण, त्यांच्यापैकी एकही नेता स्वबळावर राजस्थान जिंकून देण्याची क्षमता नसल्याचे सांगितले जाते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शेखावत यांना जिंकण्यासाठी वसुंधरा राजेंची मदत घ्यावी लागली होती! वसुंधरा राजेंना बाजूला केल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असून ती कदाचित मतदानावेळी बाहेर पडण्याचा धोका असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – तेलंगणा : बीआरएस पक्ष लवकरच उमेदवारांना एबी फॉर्म देणार; काँग्रेस, भाजपाकडून अद्याप उमेदवारांची घोषणा नाही!

छत्तीसगढमध्येही भाजप नव्या सक्षम नेत्याच्या शोधात आहे. पण, आत्ता तरी भाजपला माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पक्षाने रमण सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केलेले नाही. प्रचाराची सूत्रेही त्यांच्याकडे दिलेली नाहीत. पण, त्यांना बाजूला करून भाजपला छत्तीसगढ जिंकता येणार नसल्याचे लक्षात आल्याने भाजपच्या नेतृत्वापुढे नाइलाज झाल्याचे दिसते. भाजपने रमण सिंह यांना परंपरागत राजनंदगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या ६४ उमेदवारांच्या यादीमध्ये बहुतांश उमेदवार रमण सिंह यांच्या पसंतीचे आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is local leadership causing difficulty in bjp success in madhya pradesh rajasthan chhattisgarh print politics news ssb
Show comments