हर्षद कशाळकर
अलिबाग : रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वादाचा दुसरा अंक सुरु झाल्याचे सध्या पहायला मिळत आहेत. आदिती तटकरे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. मंत्रीपदासह रायगडचे पालकमंत्रीपद मलाच हवे असा अट्टाहास भरत गोगावले यांचा असल्याचे सध्या पहायला मिळत आहेत. कदाचित गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तरी तटकरे आणि गोगावले यांचे जिल्ह्याच्या राजकारणात सूर जुळणे कठीणच मानले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागली होती. तर तीन वेळा आमदार होऊनही शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे गोगावले नाराज होते. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने जिल्ह्याचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असावा असा आग्रह तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लावून धरला होता. मात्र उध्दव ठाकरे यांनी तो न जुमानता आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्री पदाची सुत्रे दिली. इथेच या वादाची पहिली ठिणगी पडली होती. नंतर कधी निधी वाटपावरून, कधी श्रेयवादावरून, तर कधी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करण्यावरून वाद होत राहीले. त्यामुळे गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तीनही आमदांरानी पालकमंत्री हटावचा नारा दिला होता. पण उध्दव ठाकरे यांनी ही मागणी धुडकावून लावली होती. यातून एकनाथ शिंदे यांच्या बंडाला रायगडमधील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी साथ दिली.

हेही वाचा… राजस्थान काँग्रेसच्या नेत्यांना वठणीवर आणले तर, महाराष्ट्राचे काय?

राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आमदारांच्या उठावात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या भरत गोगावले यांना राज्य सरकारमध्ये स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात गोगावले यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. गेली वर्षभर ते प्रतिक्षायादीवरच राहीले. मात्र सत्तास्थापनेनंतर त्यांनी पालकमंत्रीपद शिवसेनेकडे मागून घेतले. आणि उदय सामंत पालकमंत्री झाले होते. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान नसूनही गोगावले यांनी संयम बाळगला होता. पण राज्यसरकारमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश झाला आणि आदिती तटकरे यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागली. यानंतर मात्र भरत गोगावले कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… विरोधी पक्षनेतेविनाच पावसाळी अधिवेशन?

जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. कुठल्याही परिस्थितीत आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री नकोच अशी थेट मागणी गोगावले यांनी केली आहे. या मागणीला जिल्ह्यातील शिवसेने सह भाजपच्या आमदारांचा पाठींबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आता मंत्रीपदासह आणि रायगडचे पालकमंत्री पद मलाच हवे यासाठी गोगावले आग्रही झाले आहेत. गोगावले यांच्या या अट्टाहासामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण झाली आहे. आता महीलांपेक्षा पेक्षा पुरुष जास्त चांगले काम करू शकतो असे वादग्रस्त वक्तव्य गोगावले यांनी केले आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्ह दिसत आहेत.

हेही वाचा… जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला सांगलीतूनच आव्हान

आम्ही रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही नाही असे खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरिही गोगावले आदिती तटकरे यांच्या विरोधात आक्रमक असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे तटकरे गोगावले वादाच्या दुसऱ्या अंकाचा शेवट काय होणार हे तिसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर स्पष्ट होणार आहे. गोगावले यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला आणि त्यांना पालकमंत्रीपद दिले तरीही ते आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्याशी कितपत जुळवून घेतील याबाबत साशंकता कायम राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is impossible to consent between sunil tatkare and bharat gogawale print poltics news asj