Jammu Kashmir Assembly Election 2024 Voting Increased : जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. तीन टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली असून नागरिकांना आता ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. राज्यात शेवटची विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये झाली होती. यंदाच्या निवडणुकीत २०१४ च्या निवडणुकीतील मतदानापेक्षा कमी मतदानाची नोंद झाली आहे. मात्र ही चिंतेची बाब नाही, असं म्हटलं जाऊ शकतं. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यापेक्षा खूपच कमी मतदान झालं होतं. त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेतील परिस्थती बरी म्हणावी लागेल. यामध्ये अजून एक दिलासादायक बातमी म्हणजे ज्या सोपोर, बारामुल्ला भागात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी कट्टरपंथी नेत्यांकडून चिथावलं जातं, तिथे याआधीच्या निवडणुकांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली आहे. सोपोर व बारामुल्लात मागील तीन दशकांमधील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा तिसरा टप्पा मंगळवारी पार पडला. या टप्प्यात राज्यात सात जिल्ह्यांमध्ये ६८.७२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीत याच सात जिल्ह्यांमध्ये ६६.७८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ५७.८९ टक्के तर विधानसभेला ६५.८४ टक्के मतदान झालं होतं. तर यावेळी विधानसभा निवडणुकीत राज्यात ६३.४५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

हे ही वाचा >> Haryana Election: पंतप्रधान मोदी १४ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ घटनेचा वारंवार उल्लेख का करतात? काय घडलं होतं तेव्हा हरियाणात?

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला अधिक मतदान

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ४० मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. यामध्ये जम्मूमधील २४ तर काश्मीरमधील १६ मतदारसंघांचा समावेश होता. जम्मूमधील मतदान ६ टक्क्यांनी कमी झालं आहे. तर, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदानही लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक होतं. पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांमधील ६१.३८ टक्के मतदान झालं होतं. तर लोकसभेला या जिल्ह्यांमद्ये ६० टक्के मतदान झालं होतं. दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये ५७.३१ टक्के मतदान झालं होतं. तर याच मतदारसंघांमध्ये लोकसभेला ५२.१७ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

हे ही वाचा >> Haryana Assembly Election: वडील पोलीस अधिकारी, पती सराईत गुन्हेगार आणि निवडणुकीत सामना थेट माजी मुख्यमंत्र्यांशी; कोण आहेत मंजू हुड्डा?

सोपोर, बारामुल्ला भागात मतदानाचं प्रमाण वाढलं

मतदानाच्या दिवशी सकाळी मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळथ होता. मात्र दुपारनंतर मतदारांचा ओघ कमी झाला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर उत्तर काश्मीरमध्ये आता १५ ऐवजी १६ विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी ११ मतदारसंघांमध्ये मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झालं आहे. सोपोर, बारामुल्ला, वाघूरा व पट्टण या चार मतदारसंघांमधील मतदान मात्र वाढलं आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या १६ पैकी १४ मतदारसंघांमधील मतदानाची आकडेवारी वाढली आहे. केवळ हंदवाडा व लंगेट या दोन जागांवर कमी मतदान झालं आहे.

हे ही वाचा >> जम्मू-काश्मीरमध्ये कुणाचं सरकार येणार? त्रिशंकू विधानसभा झाल्यास भाजपाशी युती करणार? कलम ३७० बाबत भूमिका काय? फारूख अब्दुल्ला म्हणतात…

बारामुल्ला मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत १५ टक्क्यांनी मतदान वाढलं आहे. यंदा या मतदारसंघात ५४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामुल्ला मतदारसंघात शेख अब्दुल रशीद उर्फ रशीद इंजिनियर यांनी उमर अब्दुल्ला व सज्जाद लोन यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्यांनी ही निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती.

हे ही वाचा >> राज्याची नव्हे देशाची निवडणूक ;२०२९ ला भाजपचा मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

स्थानिक नागरिक काय म्हणाले?

येथील स्थानिक रहिवासी इंडियन एक्सप्रेसला म्हणाले, आमच्या मतदारसंघात खूप समस्या आहेत. आम्ही विकासापासून वंचित राहिलो आहोत, आमच्या मुलाना रोजगार हवे आहेत. बदल घडेल या आशेने आम्ही मतदान करत आहोत. गेल्या तीन दशकांपासून फुटीरतावाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सोपोरमध्ये यंदा चांगलं मतदान झालं. मतदानानंतर येथील एक रहिवासी बोटावरील शाई दाखवत म्हणाला, मी काश्मीरच्या अस्मितेसाठी मतदान केलं आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मतदान केलं आहे. लोकसभा निवडणुकीती मतदानापेक्षा विधानसभेल सोपोरमध्ये अधिक मतदान झालं आहे.