ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणुक लढवून दोन लाखाहून अधिक मते घेऊन सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का देणारे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भिवंडी लोकसभेत सांबरे यांच्यामुळे अपक्ष उमेदवारीमुळे भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे बोलले जात असून या पार्श्वभूमीवर विधानसभेत मतविभाजन टाळण्यासाठी सांबरे यांना महायुतीत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकेकाळी श्रमजिवी, कुणबी सेनेचे समर्थक मोठ्या प्रमाणात होते. या संघटनांची भूमिका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निर्णायक ठरत होती. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र वेगळे चित्र दिसून आले. नीलेश सांबरे हे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शिक्षण आणि आरोग्य सुविधांसह रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहेत. सांबरे यांनी सहा महिन्यांपूर्वी झालेली भिवंडी लोकसभेची निवडणूक लढविली. काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भाजपतर्फे माजी मंत्री कपिल पाटील आणि अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे या तीन उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे ६६ हजार १२१ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांना ४ लाख ९९ हजार ४६४ इतकी मते मिळाली. भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना ४ लाख ३३ हजार ३४३ मिळाली. तर सांबरे हे ८० ते ९० हजार मते घेतली अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांनी २ लाख ३१ हजार ४१७ इतकी मते घेऊन सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का दिला.

हेही वाचा – डोंबिवलीत सागावमध्ये मोटीराचा भोंगा वाजविला म्हणून मालकाला जीवे ठार मारण्याची धमकी

सांबरे यांनी महायुतीचा प्रभाव असलेल्या मुरबाड, शहापूर आणि भिवंडी ग्रामीण मतदारसंघात चांगली मते मिळवली आहेत. त्याचा फटका माजी मंत्री कपिल पाटील यांना बसून त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे बोलले जात आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीत सांबरे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह कोकण पट्ट्यात १८ उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असतानाच, सांबरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या बैठकीत जिजाऊ संघटनेला महायुतीत सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. यानिमित्ताने भिवंडी लोकसभेची पुनर्रावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून सांबरे यांना महायुतीत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीतील कावेरी चौकाला फेरीवाल्यांचा विळखा, विद्यार्थ्याच्या मृत्युमुळे कावेरी चौक फेरीवाला मुक्त करण्याची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाली असून त्यामध्ये जिजाऊ संघटनेला महायुतीत घेण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नसून पुढील बैठकांमध्ये याबाबत चर्चा होईल. त्यानंतरच संघटनेकडून महायुतीला साथ द्यायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. – नीलेश सांबरे, अध्यक्ष, जिजाऊ संघटना