महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्वाल्हेरला येऊन गेल्यानंतर महाराजांसाठी इथले वातावरण बदलले आहे. ते जमिनीवर उतरून काम करत आहेत, यावेळीही चंबळ-ग्वाल्हेर विभागातून २० पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील’, असे केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक स्थानिक नेत्याने सांगितले. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य यांनी या विभागातील ३४ पैकी काँग्रेसच्या २६ जागा जिंकून आणल्या होत्या. हीच किमया त्यांनी आता भाजपसाठी करण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.

ग्वाल्हेर, चंबळ, गुना या जिल्ह्यांतील अनेक काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते ज्योतिरादित्यांबरोबर भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचा खरेतर भाजपमध्ये कोंडमारा होत आहे. ‘भाजप कार्यालयाकडे मला बघावसं सुद्धा वाटत नाही. त्यांचं आणि आमचं जमत नाही. ते आम्हाला बैठकांना बोलवतात पण, आम्हाला काही कळू दिलं जात नाही’, ही पन्नाशी गाठलेल्या ज्योतिरादित्यांच्या कार्यकर्त्याची भावना अन्य समर्थकांमध्येही दिसते. या कार्यकर्त्याचे केंद्रीयमंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र तोमर यांच्याशी मात्र अत्यंत सख्य आहे!

हेही वाचा… छत्तीसगडमध्ये विद्यमानांना धक्का; भाजपाने जाहीर केले ४ नवीन उमेदवार

‘ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपशी जुळवून घेतलेले आहे. त्यांचे मोदींशी संबंध सलोख्याचे आहेत. ज्योतिरादित्य गुजरातचे जावई असल्याचे मोदी जाहीरसभेत म्हणाले. मोदींनी ज्योतिरादित्यांना जणू भाजपचे नेतृत्व करण्याचा संदेश दिला आहे’, असे ज्योतिरादित्यांच्या गटातील एका नगरसेवकाचे म्हणणे होते. ज्योतिरादित्यांच्या मामी व भाजपच्या नेत्या माया सिंह ग्वाल्हेर-पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तिथले काँग्रेसचे उमेदवार सतीश सिकरवार हे या नगरसेवकाचे नातेवाईक. पण, हे नगरसवेक ज्योतिरादित्य शिंदेंसाठी मामींचा प्रचार करत आहेत.

हेही वाचा… ज्योतिरादित्य सिंदियांच्या निष्ठावंतांना शेवटच्या यादीत दिलासा; २५ पैकी १८ जणांना मिळाली उमेदवारी

भाजपच्या नेतृत्वाने ज्योतिरादित्य शिंदेंनाही विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता, असे सांगितले जाते. पण, ज्योतिरादित्यांनी नकार देत शिताफीने स्वतःला राज्यस्तरीय नेत्यांच्या स्पर्धेतून वाचवले आहे! ‘पूर्वी काँग्रेसमध्ये कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, नरेंद्र तोमर आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा या भाजपमधील स्पर्धकांमुळे ज्योतिरादित्यांची कोंडी झालेली होती. पण, गेल्या तीन-चार दिवसांपासून परिस्थिती बदलू लागली आहे’, असा दावा काही समर्थकांनी केला. भाजपने ज्योतिरादित्य शिंदेच्या १८ हून अधिक पाठिराख्यांना उमेदवारी दिली आहे. मुन्नाभाई गोयल यांच्यासारख्या काहींची संधी हुकली असली तरी, त्यांचा राग शांत करण्यात ज्योतिरादित्य यशस्वी झाले आहेत. ‘२०१८ची पुनरावृत्ती ते करू शकले तर, त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असेल’, असे समर्थक नगरसेवकाचे म्हणणे आहे.

हेही वाचा… पाचही राज्यांत आमचीच सत्ता येणार -मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा; २०१८ सालच्या निवडणुकीत काय घडले होते?

राजघराण्यामुळे ज्योतिरादित्य शिंदेंचे वलय ग्वाल्हेरकरांमध्ये टिकून आहे. त्यांच्यासाठी ज्योतिरादित्य अजूनही ‘महाराज’ आहेत. ‘मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार येईल. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांची आता जाण्याची वेळ आलेली आहे’, असे उमाशंकर दुबे या ग्वाल्हेरकराचे मत असले तरी, ‘ज्योतिरादित्य हे आमचे महाराज आहेत’, ही भावना त्यांनी व्यक्त केली. ‘महाराजांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. हिंसा केली नाही. त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला’, असे शिवनाथसिंह सेंगर या रहिवाशाचे म्हणणे होते. स्थानिक कारणांमुळे राजघराण्याविरोधात नाराजीचे सूरही ऐकायला येत असले तरी, ग्वाल्हेरकरांचा महाराजांवर टोकाचा राग नाही. ‘शिंदे राजघराण्याचे निवासस्थान असलेल्या जयविलास महालाने आमची वहिवाट अडवली आहे. राजघराण्याने सामान्य लोकांकडे कधीतरी बघावे’, अशी महालाच्या परिसरात राहणाऱ्या एकाची तक्रार होती. पण, हाच तक्रारदार ‘महाराज मुख्यमंत्री बनू शकतील’, असे आशेने सांगतो.

हेही वाचा… Chhattisgarh : नक्षलग्रस्त बस्तरच्या अबूझमाडमध्ये ७ नोव्हेंबर रोजी मतदान; निवडणूक यंत्रणेसमोर आव्हान?

शिंदे की छावणी परिसरातील जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात मात्र महाराज ‘गद्दार’ आहेत. या कार्यालयावर महाराजांचे वर्चस्व राहिले होते. ज्योतिरादित्य शिंदेंचे वडील आणि माजी केंद्रीयमंत्री दिवंगत माधवराव शिंदेंच्या काळापासून समर्थक राहिलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस विचारांमुळे ज्योतिरादित्यांची साथ सोडली आहे. आता ते कट्टर विरोधक झाले असून राजघराण्याची संपत्ती वाचवण्यासाठी ज्योतिरादित्य भाजपमध्ये गेल्याची टीका हे कार्यकर्ते करतात. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शर्मा यांची नियुक्ती ज्योतिरादित्य शिंदेनी केलेली होती. पण, ज्योतिरादित्यांनी संपर्क केल्यानंतरही शर्मांनी काँग्रेसशी फारकत घेतली नाही. ‘मी ज्योतिरादित्यांमुळे जिल्हाध्यक्ष बनलो हे खरे असले तरी मी कधी काँग्रेस सोडणार नाही. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या घरासमोर माझा फलक लागला होता. ते पाहून वाजपेयींनी मला भाजपमध्ये येण्याची विनंती केली होती. पण, त्यांनाही मी नकार दिला होता’, असे शर्मा यांनी सांगितले. ‘माधवरावांनी सर्वांशी चर्चा करून काँग्रेस पक्ष सोडला, स्वतःचा पक्ष काढला. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले होते. ज्योतिरादित्यांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही, असे शर्मांचे म्हणणे होते. ‘आता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या शिवाय काँग्रेस चांगली कामगिरी करत आहे. ग्वाल्हेरच्या ६ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ काँग्रेस जिंकेल’, असा दावा शर्मा यांनी केला.

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरीनंतर महाराष्ट्रात जशी ५० खोक्यांची चर्चा रंगली होती, तशी इथे ३५ खोक्यांची चर्चा होती. ज्योतिरादित्य शिंदेनी २४ समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा फुटीर आमदारांना ३५ कोटी मिळाल्याचे आरोप केले गेले. त्यामुळे महाराजांच्या प्रतिमेला मात्र धक्का बसला. पण, ‘राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि पक्षांतर्गत अडचणी पार करत ज्योतिरादित्यांना पुन्हा चंबळ-ग्वाल्हेर विभागात आता वर्चस्व सिद्ध करता येईल’, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyotiraditya scindia on streets for assembly election campaign print politics news asj
Show comments