काही महिन्यांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत प्राप्त करून काँग्रेस पक्षाची सत्ता राज्यात स्थापन झाली. २०१८ साली देखील काँग्रेस-जेडीएसने आघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली होती. मात्र २०१९ साली ‘ऑपरेशन लोटस’ राबवून भाजपाने काही आमदार आपल्या बाजूला वळविले आणि सत्ता काबिज केली. आता पुन्हा एकदा कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडले जाईल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपा आमदार रमेश जारकीहोळी यांनी २०१९ साली काँग्रेस-जेडीएस सरकारमधून बाहेर पडत भाजपाचे सरकार आणण्यात मदत केली होती. त्यांनी सोमवारी (दि. ३० ऑक्टोबर) पुन्हा एकदा अशाच ऑपरेशन लोटसबाबत वाच्यता केली. ज्यामुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेळगाव येथे पत्रकारांशी बोलत असताना भाजपा आमदार रमेश जारकीहोळी म्हणाले की, महाराष्ट्र मॉडेलप्रमाणे कर्नाटकातही भाजपाचे सरकार स्थापन केले जाऊ शकते. जर काँग्रेसचे सरकार पडले तर याचे खापर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर फोडले जाईल, असेही जारकीहोळी यांनी सांगितले. महाराष्ट्रात भाजपाकडे सर्वाधिक जागा असूनही २०१९ साली सत्ता स्थापन करताना अडचणी निर्माण झाल्या. मात्र मागच्यावर्षी शिवसेनेत फूट पडल्यामुळे तिथे भाजपा-शिवसेनेचे सरकार आले. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनीही भाजपाशी हातमिळवणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे वाचा >> कर्नाटकात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, जारकीहोळी बंधू मंत्रिपदी कायम

आमदारांना मंत्री पद आणि ५० कोटी

महाराष्ट्रात काँग्रेसकडे फारसे आमदार नसले तरी कर्नाटकात मात्र बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक आमदार यावेळी निवडून आलेले आहेत. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील मतभेदांमुळे सिद्धरामय्या सरकार उलथवून लावले जाईल, अशी चर्चा सतत करण्यात येत असते. शनिवारी (दि. २८ ऑक्टोबर) मांड्या येथील काँग्रेसचे आमदार रविकुमार गौडा यांनी आरोप केला की, काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी आमदारांना ५० कोटी आणि मंत्रीपदाचा प्रस्ताव देण्यात येत आहे. यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाजपाच्या हेतूंवर शंका घेत सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

“महाराष्ट्रासारखीच कर्नाटकात परिस्थिती पाहायला मिळू शकते”, असे विधान जारकीहोळी यांनी पत्रकारांसमोर केले. सरकार कसे पडणार? या प्रश्नावर जारकीहोळी यांनी हा दावा केला की, “आमदारांच्या राजीनाम्याची गरज नाही. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आमदारांचा एक गठ्ठा भाजपाच्या बाजूने आला, त्याचप्रकारे आमदार एकगठ्ठा होऊन भाजपाकडे येतील.”

जारकीहोळी पुढे म्हणाले, “२०१९ पेक्षा भाजपाची यावेळची राज्यातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. २०१९ साली बहुमतासाठी फक्त आठ आमदारांची गरज होती. पण यावेळी जर सरकार स्थापन करायचे असेल तर महाराष्ट्राच्या मॉडेलची पुनरावृत्ती करावी लागेल. तेव्हा कुठे भाजपाचे सरकार येऊ शकते. जर सिद्धरामय्या यांनी योग्य निर्णय घेतला तर सरकार तग धरेल अन्यथा हे सरकार पडणार.”

हे वाचा >> विश्लेषण : कर्नाटकच्या सेक्स सीडीचं प्रकरण पुन्हा का चर्चेत आलं आहे?

२०१९ साली काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यात पुढाकार

२०१९ साली कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस आघाडीचे सरकार पाडण्यासाठी १६ आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यापैकी रमेश जारकीहोळी हेदेखील एक होते. शिवकुमार यांच्याशी मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शिवकुमार यांच्यावर टीकास्र सोडताना जारकीहोळी म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमाऱ्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री लवकरच माजी मंत्री होतील. माझ्या माहितीप्रमाणे जर काँग्रेसचे सरकार पडले, तर त्यासाठी डीके शिवकुमार आणि त्यांची बेळगावमधील सहकारी कारणीभूत असतील.

रमेश जारकीहोळी हे बेळगावच्या गोकाक विधानसभेतून आमदार झालेले आहे. बेळगावमध्ये सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय आणि रमेश जारकीहोळी यांचे बंधू, काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी आणि शिवकुमार यांच्या निकटवर्तीय, काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात बरेच वाद आहेत. या दोन गटातील स्पर्धेचा दाखला देऊन रमेश जारकीहोळी यांनी डीके शिवकुमार यांच्यावर टीका केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka government may fall along maharashtra model says bjp mla ramesh jarkiholi kvg
Show comments