Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुतीसह सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते विविध मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. असं असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीत काही मतदारसंघात चुरसीच्या लढती पाहायला मिळत आहेत. अनेक नेते मतदारसंघातील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठवाड्यातील लातूरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दशकभरानंतर भाजपाकडून लातूरची जागा हिसकावून घेण्यात यश मिळवलं. एवढंच नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, तर ३० पैकी काँग्रेसला १३ जागा मिळाल्या. आता विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा एकदा जास्त जागा मिळण्याची आशा आहे. तसेच लातूरमध्येही पुन्हा काँग्रेसचं वर्चस्व मिळवण्याची आशा पक्षाच्या नेत्यांना आहे. ज्यामध्ये देशमुख कुटुंबाची प्रमुख भूमिका आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लातूरमधील सहा जागांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेस तर अहमदपूर आणि उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, तर निलंगा आणि औसामधून भाजपाने विजय मिळवला होता.

हेही वाचा : Narendra Modi : धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’चा नारा का दिला? काय आहे कारण?

यावेळी लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि निलंगा या तीन जागांवर भाजपा विरुद्ध काँग्रेस लढत आहे. अहमदपूर आणि उदगीरमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढत आहेत, तर औसा येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) भाजपा विरुद्ध लढत आहे. तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमित देशमुख हे लातूर शहरातून निवडणूक लढवत आहेत. ते माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत. दरम्यान, विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. तेव्हा बाभळगाव गावातील देशमुख कुटुंबाचं वडिलोपार्जित घर हे जिल्ह्यातील काँग्रेसच्या हालचालींचं केंद्र असायचं.

भाजपाने अमित देशमुख यांच्या विरोधात माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील-चाकूरकर यांना प्रथमच उमेदवारी दिली. अर्चना पाटील-चाकूरकर यांना स्थानिक मतदारसंघात देशमुख कुटुंबाबाबतची नाराजी आणि आणि लिंगायत मतांचा फायदा होण्याची आशा आहे. त्यामुळे अर्चना पाटील चाकूरकर यांना विजयाचा विश्वास आहे. याबाबत त्यांनी म्हटलं की, जेव्हा आम्ही निवडणूक प्रचारासाठी फिरतो तेव्हा आम्हाला मतदारसंघात आमदार (अमित देशमुख) उपलब्ध नसल्याच्या तक्रारी ऐकू येतात. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर ठप्प झालेली विकासाची कामे पुढे नेण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आम्ही मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत आणि लोकांना सांगत आहोत की, मी सध्याच्या आमदारासारखं दूर राहणार नाही. माझी लाडकी बहीण योजनेतील लाभांमुळे सर्व समाजातील महिला मला पाठिंबा देत आहेत”, असं म्हणत महिलांची मते आपल्या बाजूने असल्याचं मत अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : पायाला फ्रॅक्चर, गोल्फ कार्टवर मतदारसंघात प्रचार; महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवाराची जोरदार चर्चा!

दरम्यान, लातूर शहरात मराठा आणि लिंगायत मतदार सुमारे २६ टक्के आणि २५ टक्के आहेत. ज्यात दलित आणि मुस्लिम २३ टक्के आणि २९ टक्के आहेत. अमित देशमुख हे केवळ आपली जागा टिकवून ठेवत नाहीत तर मराठाबहुल मराठवाड्यात काँग्रेसचा चेहरा म्हणून उदयास येत आहेत. तसेच लातूर जिल्हा हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे आणि त्याचे वैभव परत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं ते म्हणतात. अमित देशमुख या निवडणुकीत विशेषतः मराठवाड्यात काँग्रेसचा प्रचार करत आहेत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अमित देशमुख हे मराठवाड्यातील पक्षाचा प्रमुख नेता म्हणून समोर आले आहेत.

मराठवाड्यात प्रदेशातील लोकसभेच्या सातपैकी तीन जागांवर (लातूर, नांदेड आणि जालना) पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, अमित देशमुख हे पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. यातच अशोक चव्हाण हे भाजपात गेले. त्यामुळे मराठवाड्यात पक्षाचा चेहरा म्हणून समोर येत आहेत, असं त्यांचे काही निकटवर्तीय सांगतात. लातूरचे आणखी एक काँग्रेसचे दिवंगत शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील-निलंगेकर हे निलंगा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने अभय साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे, तर लातूर ग्रामीणमध्ये अमित देशमुख यांचे भाऊ धीरज देशमुख हे निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीप देशमुख हे यासंदर्भात म्हणतात की, “राजकारणात चारित्र्य महत्त्वाचं असतं. आमदार किंवा खासदाराची पाच वर्षांची मुदत संपलेली असते. पण राजकारण्याचे चारित्र्य नाही. ते कायम टिकते आणि आम्ही एक कुटुंब म्हणून त्यावर विश्वास ठेवतो. कोण कुठे जातात, याने काही फरक पडत नाही. आपण जिथे आहोत तिथे उभे आहोत. आतापर्यंत आम्ही निलंगा किंवा इतर कोठेही हस्तक्षेप केला नाही. कारण पूर्वी तेथे (काँग्रेसचे) ज्येष्ठ नेते होते. मात्र, त्यातील काही नेते दुसरीकडे (भाजपात) गेल्याने काँग्रेस विचारसरणीचे लोक आमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा लागणार आहे”, असं त्यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur politics maharashtra vidhan sabha election 2024 congress amit deshmukh vs bjp archana chakurkar gkt