दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या नळपाणी योजनेवरून कागल तालुक्यातील नेते विरुद्ध इचलकरंजीतील नेते यांच्यातील सामना रंगला आहे. विशेष म्हणजे एकमेकांचे तोंडही न पाहणारे दोन्ही कडील नेते हातात हात घालून आपल्या मतदारसंघाचा किल्ला लढवण्यासाठी आंदोलनात उतरले आहेत. पाण्याच्या वादात राजकीय वैरभाव विरघळले असताना प्रतिस्पर्धी तालुक्यातील नेत्यांशी टोकाचा संघर्ष करण्याची तयारी ठेवली आहे. पाण्याच्या राजकारणातून वेगळाच रंग प्रवाहित होत असल्याचे आगळे चित्र पाहायला मिळत आहे.

पाण्याचे राजकारण राज्याला तसे नवे नाही. पाणी मिळण्यासाठी जसा संघर्ष होत आहे तसा तो नाकारण्यासाठीही होत असल्याचा इतिहास आहे. इचलकरंजी महापालिकेच्या नळ पाणी योजनेवरून याचा प्रत्यय बाहेर येत आहे. इचलकरंजी महापालिकेने नळपाणी योजनेचे अनेक पर्याय आजवर चाचपून पाहिले आहेत. सध्याची पंचगंगा योजना प्रदूषित झाली असून कृष्णा योजना गळकी आहे. यामुळे वारणा पाणी योजनेला शिरोळ तालुक्यातून विरोध झाल्यानंतर इचलकरंजीकरांचे लक्ष कागल तालुक्यातील दूधगंगा नदीवरील सुळकुड गावातील पाणी आणण्यासाठी अमृत दोन योजनेतून १६० कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. जलसंपदा विभागाने संमती दर्शवली आहे. तरीही आता पाण्यावरून वाद तापला आहे.

हेही वाचा >>>सांगलीत काँग्रेसचा उमेदवार ठरला, भाजपमध्ये बदलांचे वारे

कागलकरांची गट्टी

सुरुवातीला या पाणी योजनेला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध होता. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून मतपेटीकडे लक्ष देत त्यामध्ये आपोआप राजकारण शिरले. कागल तालुक्यातील एकेक राजकारणी यामध्ये उतरत राहिले. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख नेते उतरले आहेत. आता या आंदोलनाची व्याप्ती कागलसह सहा तालुक्यांमध्ये पसरवण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत. हे करीत असताना आपापसातील मतभेद विसरून तालुक्यातील नेते एकत्रित आले आहेत. हसन मुश्रीफ -समरजित घाटगे यांच्यात गेली दहा वर्ष राजकीय संघर्ष सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोघांमध्ये सामना झाला होता. गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या कारणावरून त्यांच्यामध्ये वादाच्या ठिणग्या पडत आहे. मतदारसंघातील काही पाणी प्रकल्पावरून श्रेयवाद सतत झाडत आहे. तरीही उभय नेते दूधगंगा पाणी योजनासाठी एका मंचावर येवून एकाच स्वरात विरोधाचा राग आळवत आहेत हे विशेष.

हेही वाचा >>>गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

इचलकरंजीत ऐक्यभाव

इचलकरंजी महापालिकेला पाणी मिळवायचे असल्याने येथील नेतेही कागलच्या नेत्यांपाठोपाठ इचलकरंजीतील नेत्यानाही एकत्रित येणे भाग पाडले आहे. . खासदार धैर्यशील माने आणि भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यात गुळपीठ आहे. पण या दोघांचे आमदार प्रकाश आवाडे आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी पटत नाही. माने – आवाडे राज्यातील सत्तेत एकत्र असले तरी छुपा संघर्ष लपून राहिलेला नाही. असे असतानाही या सर्वांनी आपापसातील मतभेद टाळून इचलकरंजीला पाणी आणायचे या मुद्द्यावर एकोपा राखला आहे. अर्थात त्यालाही राजकीय श्रेयवादाची सुप्त किनार आहेच. याच वेळी इचलकरंजीत या पाणी प्रश्नासाठी दोन कृती समिती स्थापन झाल्या आहेत. त्यामध्येही मतभेद असले तरी दोन्ही कृती समिती या प्रमुख नेत्यांसोबत असल्याचे दिसत आहे. पाण्या तुझा रंग कसा? ज्याला जसा हवा तसा ! या पंक्तीप्रमाणे मतभेदाचा रंग विसरून पाण्याला मैत्रीचा रंग आल्याचे वेगळे चित्र खूप दिवसांनी दिसत आहे. या निमित्ताने इचलकरंजीकर विरुद्ध कागलकर यांच्या राजकीय स्पर्धा रंगली असून त्यात बाजी कोण मारणार हे मात्र लक्षवेधी ठरले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders of kagal taluka clash with leaders of ichalkaranji over municipal water scheme print politics news amy