कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील अन्य लोकसभा मतदारसंघातील लढती कोणांकोणात होणार याबाबत अनिश्चितता असली तरी त्याला अपवाद आहे तो हातकणंगले मतदारसंघ. येथे गेल्या वेळेचेच खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात सामना निश्चित आहे. यामध्ये प्रतीक जयंत पाटील यांची भर पडताना दिसत असल्याने संघर्षाला टोकदार स्वरूप येणार आहे. माने- शेट्टी यांच्यातील लढत म्हणजे गेल्या वेळचीच पण नव्या रंगारूपातील पुनरावृत्ती ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. तेव्हा शेट्टी हे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढले होते. या वेळी पुन्हा उभयतांमध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत. शेट्टी यांना पाठिंबा देण्यास महाविकास आघाडीची तयारी असली तरी शेट्टी यांना स्वतंत्रपणे रिंगणात उतरायचे आहे. तसे झाल्यास तिंरगी लढत अटळ ठरेल.

हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूल काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला; जागावाटपावरून एकमेकांवर गंभीर आरोप!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि माने घराणे असे जणू अतूट नाते आहे. सलग पाच वेळा बाळासाहेब माने यांनी काँग्रेस पक्षाकडून खासदारकी मिळवली. पुढे कल्लाप्पाण्णा आवाडे (काँग्रेस) , निवेदिता माने ( राष्ट्रवादी) , राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना ) हे सलग दोनदा खासदार झाले. गेल्यावेळी माने यांचे नातू ,निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांना आखाड्यात उतरवले तेव्हा हा नवखा उमेदवार म्हणजे शेट्टी यांच्यासमोर बळीचा बकरा असे चित्र होते. सेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रचाराची राळ उठवली. त्याला भाजपचे पाठबळ आणि मराठा मोर्चाची पार्श्वभूमी लाभल्याने धैर्यशील माने यांनी मैदान मारले.

हेही वाचा : अयोध्या राम मंदिर सोहळ्याला बोलावलेल्या पाहुण्यांच्या यादीत नेमका कुणाचा समावेश? वाचा…

राज्यांमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून या गटाने कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडे राहतील असा दावा केला असल्याने माने हे पुन्हा नव्या सेनेकडून निवडणूक रिंगणात असणार हे उघड आहे. त्यांनी १८०० कोटीची विकास कामे केल्याचा दावा प्रत्येक सभेमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. तर, ही कामे खरेच काळात गावगाड्यात पोहचली आहात का असा प्रतिप्रश्न विरोधकांकडून केला जात आहे. याचे राजकारण निवडनू प्रचाराचा मुख्य मुद्दा बनण्याची चिन्हे आहेत. मतदारसंघात संपर्क कमी असणे अडचणीचे ठरू शकते. गेल्या वेळी राजू शेट्टी यांना इचलकरंजीचा पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास या मुद्द्यावर मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न केल्याने या शहरातच मिळालेल्या भरगोस मतांनी माने यांच्या विजयाची पायाभरणी झाली होती. पाच वर्षानंतरही इचलकरंजीत हे दोन्ही प्रश्न पूर्वीसारखेच आ वासून उभे असल्याने नाराजीचे बुमरँग होऊ शकते. लॉजिस्टिक पार्क, शाहूवाडीतील औद्योगिक वसाहतीबाबत कोणती भरीव प्रगती केली हेही माने यांना पटवून द्यावे लागणार आहे.

दुसरीकडे राजू शेट्टी यांनी पराभव झाल्यापासून लगेचच चळवळीचे काम सुरु केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न चालविला. यावर्षीच्या हंगामात ऊस कमी पडणार हे हेरून टोकदार आंदोलन केले. त्यामुळे मागील हंगामाला अधिक दर मिळवण्यात त्यांना यश आल्याने शेतकरी वर्गात प्रतिमा उंचावली आहे. हा दर प्रत्यक्षात मिळवून देणे हेच त्यांच्या समोरचे आव्हान असणार आहे. शेट्टी यांनी इंडिया वा माविआने आमच्याकडे चर्चेला येऊ नये,;आम्ही त्यांच्या दारी जाणार नाही , असे गेल्या आठवड्यात म्हटले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट अराजकीय असल्याचे शेट्टी म्हणत असले तरी राजनीती लपून राहिली नाही. शिवसेनेच्या कोठ्यातून शेट्टी यांना उमेदवारी देऊन गेल्यावेळच्या चुकीची दुरुस्ती करण्याची रणनीती आहे.

हेही वाचा : कोल्हापुरातील पाटील – महाडिक यांचे राजकारण सूडाच्या हिंसक वळणावर

त्याच वेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी पुन्हा मतदार संघात संपर्क वाढवला आहे. सांगलीतील दोन तालुक्यांमध्ये पाटील यांचा प्रभाव आहे. हातकणंगले मधील चार तालुक्यांमध्ये चांगली संपर्क यंत्रणा आहे. याचा फायदा ते उठवू पाहत आहेत. मात्र,शेट्टी – पाटील यांची मत विभागणी दोघांनाही अडचणीची ठरणार हे उघड आहे. अजूनही मतदारसंघात ठाकरे सेनेकडून खोके, ओके, गद्दार याची हवा तापवून जिल्ह्यातील खासदारांची प्रतिमा डागाळत ठेवली जात आहे. यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळाली तर बरेच असे माने समर्थक खाजगीत बोलतात. माने उमेदवार असणार हे निश्चित असले तरी ते शिंदेसेनेचे असणार कि भाजपचे याला महत्व आले आहे. भाजपकडूनही या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. पक्षाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे, त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे , जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांची नावे पर्याय म्हणून पुढे येत आहेत. यामुळे भाजपची भूमिका ही निर्णायक ठरू शकते.

२०१९ मधील निकाल –

धैर्यशील माने, शिवसेना – ५ लाख ८५ हजार ७७६.
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना- ४ लाख ८९ हजार ७३७

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review hatkanangale seat dhairyasheel mane raju shetty print politics news css