हिंगोली : मागास अशी ओळख असणाऱ्या हिंगोली मतदारसंघात या वर्षभरात नवनवे राजकीय रंग भरण्यात आले. राज्याच्या राजकारणात प्रमुख पक्षांमध्ये फाटाफुट झाली आणि हिंगोलीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली. राजकीय नेत्यांबरोबर नोकरशाहीतील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचेही नाव चर्चेत आणले गेले. नानाजी देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात बळ अजमवण्यासाठी भाजपानेही जोर-बैठका आजमावल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी, डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचा जोर वाढावा म्हणून प्रयत्न केले गेले. या जोर-बैठकांमध्ये आम्ही मागे नाही, असा सूर शिंदे सेनेत गेलेले खासदार हेमंत पाटील यांनी लावला आहे. काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गटाला हिंगोली लोकसभा मतदारसंघ हवाहवासा आहे.

हेही वाचा – नितीश यांना विश्वासदर्शक ठरावासाठी १२ तारखेपर्यंतचा वेळ; काँग्रेस नेत्यांना काय वाटते? जाणून घ्या

हिंगोली लोकसभा मतदारसंघात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हा भाग जोडला गेलेला आहे. शिवाय नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगावसह जिल्ह्यातील तालुक्यांचा मिळून लोकसभा मतदारसंघ आहे. शिवसेनेचे हेमंत पाटील सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. मोर्चेबांधणीत हिंगोली लोकसभा मतदारसंघ कोणाकडे यावरून शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही बाजूला रस्सीखेच सुूरू आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनंतर शिवसेनेचा अधिक काळ वरचष्मा राहिला. काँग्रेसचे उत्तमराव राठोड वगळता दोन वेळा सलग निवडून येण्याची परंपरा या मतदारसंघात अन्य कोणाला साध्य झाली नाही. हा मतदारसंघ १९७७ साली अस्तित्वात आला. जनता दलाचे चंद्रकांत पाटील गोरेगावकर यांना पहिले खासदार होण्याचा मान मिळाला. त्यानंतर उत्तमराव राठोड निवडून आले. सूर्यकांता पाटील यादेखील एकदा राष्ट्रवादीकडून, तर एकदा काँग्रेसकडून निवडून आल्या. ॲड. शिवाजी माने हेदेखील दोन वेळा निवडून आले. मात्र, सलग नाही. विलास गुंडेवार, सुभाष वानखेडे यांनी नंतर शिवसेनेकडून विजय मिळविला. पुढे काँग्रेसने ही जागा मागून घेतली. राजीव सातव निवडून आले. आता हेमंत पाटील शिंदे गटाकडून नेतृत्व करत आहेत.

अशोक चव्हाण यांची पकड

नांदेड जिल्ह्यातील मतदारसंघाची रचना लक्षात घेता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची हिंगोली जिल्ह्यावर पकड आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेतही महाराष्ट्रातून जे दोन खासदार निवडून आले त्यात अशोक चव्हाण आणि राजीव सातव यांचे नाव होते. २०१९ मध्ये चित्र बदलले. हिंगोली जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आता नागेश पाटील आष्टीकर आणि जयप्रकाश मुंदडा हे दोन प्रमुख नेते असले तरी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यात तशी सामसूमच आहे. हिंगोलीत अलिकडेच उद्धव ठाकरे यांनी एक सभा घेतली. या पलिकडे फारसे काही घडले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पातळीवर जागावाटप करताना लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, असे प्रयत्न सुरू झाले आहे. तसे झाल्यास साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. हिंगोलीचे सगळे राजकारण अवैध धंद्यांच्या भोवताली सुरू असते.

हेही वाचा – अभिनेते दीपक अधिकारींचा मोठा निर्णय, तीन महत्त्वाच्या पदांचा राजीनामा; तृणमूलचा ‘देव’ पुन्हा निवडणूक लढवणार का?

हिंगोली भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे आणि कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्यातील वाद ‘अवैध’ आणि ‘वैध’ यावरूनच पेटलेले असते. आमदार मुटकुळे आणि आमदार बांगर यांच्यातील वैध-अवैधतेचा हा खेळ लोकसभा निवडणुकीपूर्वीही कायम आहे. अशातच राधेश्याम मोपलवार, डॉ. श्रीकांत पाटील, रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार गजानन घुगे यांची नावे भाजपकडून चर्चेत आणली जात आहेत.

२०१९ च्या निवडणुकीतील चित्र

हेमंत पाटील (शिवसेना) – पाच लाख ८६ हजार ३८२

सुभाष वानखेडे (काँग्रेस) – तीन लाख आठ हजार ४५६

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review hingoli bjp efforts to increase strength in hingoli by division print politics news ssb