नगर : देशाला आदर्श निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करायला लावणारा (विखे-गडाख निवडणूक खटला), महाराष्ट्रात शरद पवार विरुद्ध बाळासाहेब विखे असा कडवा राजकीय संघर्ष दाखवून देणारा, मुलासाठी विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांचा प्रचार करतो आहे, असा राजकीय इतिहास निर्माण करणारा हा नगर लोकसभा मतदारसंघ. कधीकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो आता भाजपकडे झुकलेला. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासाठी फरक इतकाच की मागील निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीसाठी पायघड्या अंथरल्या गेल्या होत्या आता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार सुजय विखे यांचा नगर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारीचा प्रवास अतिशय रंजकतेचा झाला. वडील राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्ये. विरोधी पक्षनेते. नगरची जागा आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे. शिर्डीची जागा राखीव. नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास आणि सुजय विखे यांच्या राष्ट्रवादीमधील उमेदवारीलाही शरद पवार यांनी नकार दिला. त्याला कारण होते पवार आणि विखे कुटुंबातील राजकीय वैमनस्य. ‘दुसऱ्याच्या नातवाची जबाबदारी माझी नाही’, असे पवार यांचे वक्तव्य होते. एकवेळ तर अशी आली होती की पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडल्याचे जाहीरही केले होते आणि सुजय यांनी त्याबद्दल पवार यांचे आभारही मानले होते, परंतु माशी शिंकली आणि पवार यांनी जागा सोडण्यास नकार दिला. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश आले आणि सुजय विखे यांचा गेल्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश झाला.

हेही वाचा : झारखंडमध्ये चंपई सोरेन यांचा शपथविधी ते तृणमूल काँग्रेस, आपची निदर्शने; दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, वाचा…

त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते होते, राधाकृष्ण विखे. मुलाच्या, भाजप उमेदवाराच्या विजयाचे नियोजनात ते सक्रिय होते, नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सहकारातील आणि मराठा नेतृत्वाचा प्रमुख चेहरा भाजपला मिळाला. ही निवडणूकही विखे विरुद्ध पवार अशीच रंगली होती. तत्पूर्वी भाजपचे दिलीप गांधी या मतदारसंघातून तीनवेळा निवडून गेले होते. शिवसेनेत प्रवेश केलेले, खासदार सुजय यांचे आजोबा, बाळासाहेब विखेही याच नगर मतदारसंघातून सन १९९८ मध्ये निवडून गेले होते. १९५२ ते १९९८ अशी तब्बल ४६ वर्षे काँग्रेसने या मतदारसंघावर प्राबल्य ठेवले होते. परंतु काँग्रेस अंतर्गत गटबाजी आणि ओबीसींचे हक्काचे मतदान या आधारावर दिलीप गांधी बाजी मारत गेले. सुजय यांच्या प्रवेशाने गांधी यांची उमेदवारी रद्द झाली.

आता सुजय विखे यांच्या उमेदवाराला पक्षातूनच आव्हान दिले जात आहे. माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी उमेदवारीसाठी दावेदार असल्याचे जाहीर केले आहे. माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरडही शर्यतीत उतरले आहेत. गेल्या वेळचे विरोधी उमेदवार उमेदवार व सध्याचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी जुळून घेण्याचे राजकीय कसब विखे यांनी दाखवले, मात्र त्यांच्या या भूमिकेने भाजपमधील निष्ठावान नाराज झाले. जगताप विरोध हा भाजपचा मूलभूत दृष्टिकोन. त्यालाच धक्का बसला. संपर्काचा अभाव भरून काढण्यासाठी डॉ. विखे यांनी गावोगाव साखर-डाळ वाटप करत ‘मतपेरणी’ केली, त्यावर आता टीका होऊ लागली आहे.

हेही वाचा : अर्थसंकल्पातून २०४७ पर्यंत विकसित भारताची गॅरंटी; पंतप्रधान मोदींच्या आगामी निवडणूक प्रचार धोरणांवर आधारित अर्थसंकल्प

महाविकास आघाडीत या मतदारसंघावर शरद पवार गटाने दावा केला आहे. मात्र त्यासाठी त्यांना सक्षम उमेदवार हवा आहे. शरद पवार यांनी केलेल्या चाचपणीत आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्ता तनपुरे, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके अशी काही नावे समोर आली. मात्र यातील कोणीही स्वतःहून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार नाहीत. अगदीच पक्षाने आदेश दिला तर नाईलाजाने त्यांना ही भूमिकांनी निभवावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नगरची जागा लढवण्यास शिवसेना इच्छुक असून आमदार शंकरराव गडाख आमचे उमेदवार होऊ शकतात, असे सुतोवाच करून चर्चेला सुरुवात करून दिली. गडाख यांचा नेवासा विधानसभा मतदारसंघ नगर लोकसभेमध्ये नाही. यामुळे शिर्डी- नगर जागेचे आदलाबदली होणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विखेविरोधी इतर कोणत्याही उमेदवारापेक्षा अधिक चर्चा होत आहे ती पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या भूमिकेची. त्यांनी थेट सुजय विखे यांना आव्हान देत, पक्ष, चिन्ह कोणते हे स्पष्ट न करता उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दाखवून दिले. मात्र हे केवळ पारनेर विधानसभेसाठी दबावतंत्र आहे की ते खरंच निवडणूक लढवणार याबद्दल त्यांच्याच भूमिकेने संदिग्धता निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमदार लंकेच प्रमुख दावेदार ठरले होते. परंतु नंतर ते अजितदादा गटाकडे गेले. तरीही त्यांनी पत्नी, जिल्हा परिषद माजी सदस्य राणी लंके यांच्या माध्यमातून मतदारसंघात ‘शिवस्वराज्य यात्रा’ आयोजित करत आपली दावेदारी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते स्वतः या यात्रेत सहभागी झाले नव्हते. ते पुन्हा शरद पवार गटाकडे जाणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपविरोधी उमेदवार कोण असेल हे अद्यापि गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा : कर रचना ‘जैसे थे’, लोकप्रिय घोषणाही नाही! मोदी सरकारला २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास?

मतदारसंघात एकत्रित राष्ट्रवादीची ताकद मोठी होती. तब्बल चार आमदार या मतदारसंघात होते. परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही ताकतद विभागली गेली. आता शरद पवार गटाकडे रोहित पवार व प्राजक्त तनपुरे राहिले आहेत. अजितदादा गटाकडे संग्राम जगताप व निलेश लंके असे दोघे आहेत. ठाकरे गट आणि काँग्रेसचा तर एकही आमदार नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे हेही अजितदादा गटाच्या वाटेवर आहेत.

विधानसभानिहाय आमदार

नगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय आमदार: नगर शहर- संग्राम जगताप (अजितदादा गट), श्रीगोंदे-नगर- बबनराव पाचपुते (भाजप), कर्जत-जामखेड- रोहित पवार (शरद पवार गट), पारनेर-नगर- निलेश लंके (अजितदादा गट), राहुरी -पाथर्डी- प्राजक्त तनपुरे (शरद पवार गट), शेवगाव-पाथर्डी-मोनिका राजळे (भाजप).

सन २०१९ च्या निवडणुकीतील मते

डॉ. सुजय विखे (भाजप)-७०४६६०
संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)-४२३१८६
.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review of ahmednagar will sujay vikhe patil gets challenge print politics news css
Show comments