गडचिरोली : शहरात नुकत्याच पार पडलेल्या महायुतीतील घटक पक्षाच्या महामेळाव्यात नेत्यांनी ”हम सब एक है” चा नारा देत महायुतीकडून जो उमेदवार घोषित होईल, त्याच्यासाठी सर्व मिळून काम करणार असे जाहीर केले. पण याच मेळाव्यात सहभागी पक्षातील कार्यकर्त्यांमधील अंतर्गत धूसफूस उघडपणे दिसून येते होती. आपलाच नेता कसा उमेदवारासाठी योग्य आहे. याची चर्चा सभागृहात ऐकू येत होती. अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी वर्षभरापूर्वीच आपण लोकसभा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. वेळोवेळी ते तसा दावा जाहीरपणे करत आहेत. त्यामुळे विद्यमान भाजप खासदार अशोक नेते यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. तर गडचिरोलीचे भाजप आमदार डॉ. देवराव होळी देखील पक्षशीस्त मोडून आपणच भावी खासदार असल्याचे सभांमधून उघडपणे बोलू लागले आहे. दुसरीकडे महविकास आघाडीकडून गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढणारे काँग्रेसचे नेते डॉ. नामदेव किरसान यांचा नावावर सर्व नेत्याचे एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण हीच चर्चा लोकसभा क्षेत्रात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली लोकसभा क्षेत्रात एकूण सहा विधानसभा येतात. २००८ साली सीमांकनानंतर हे क्षेत्र गडचिरोली-चिमूर असे करण्यात आले. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास एका टोकाहून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी तब्बल ४५० किमी पेक्षा अधिक अंतर पार करावे लागते. या मतदारसंघावर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतु बदललेल्या राजकीय समीकरणांचा प्रभाव यावरही पडला. त्यामुळे मागील दोन दशकांपासून भाजप आणि काँग्रेस पक्ष येथे तुल्यबळ आहे. २००९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार मारोतराव कोवासे यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अशोक नेते यांचा निसटता पराभव झाला होता. २०१४ साली नेतेंनी पराभवाचा वचपा काढत विजयश्री खेचून आणली. या निवडणुकीत काँग्रेसने मारोतराव कोवासेंना डावलून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिली होती. २०१९ मध्येही खासदार अशोक नेते यांनी विजयी घडदौड कायम ठेवली. परंतु मधल्या काळात बदलेल्या सत्तासमीकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवारांच्या नेतृत्वात महायुतीत सामील झाल्याने भाजपमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : हरियाणात ‘आप’ला मोठा धक्का, महत्त्वाच्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी; लवकरच भाजपात प्रवेश करणार!

सर्वात महत्वाची बाब म्हणजे, जिल्ह्यातील प्रभावी नेते अन्न व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्याने महायुतीतील कार्यकर्ते संभ्रमात आहे. त्यामुळे एकीकडे खासदार अशोक नेते यांचे समर्थक उमेदवारी ”भाऊंना”च मिळणार असा दावा करीत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) कार्यकर्ते यंदा ”बाबा” दिल्लीला जाणार असे ठामपणे सांगत आहेत. तर भाजपमधील खासदार नेते यांचे विरोधी आमदार डॉ. देवराव होळी यांनी देखील विधानसभा सोडून लोकसभा क्षेत्रात दौरे वाढवले आहे. त्यामुळे नेतेंची अधिकच कोंडी झाल्याचे चित्र आहे. त्याचमुळे स्थानिक मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्री पद ने देता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे ठेवत त्यांचे पंख छाटले. मागील दोन निवडणुकांमधील मतांचा विचार केल्यास २०१४ पेक्षा २०१९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला जवळपास १० टक्के मत अधिक मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीने देखील लाखभर मते मिळवून आपली ताकद दाखवली होती. या दोन्ही वेळेस काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान हे देखील स्पर्धेत होते. परंतु पक्षाने डॉ. नामदेव उसेंडी यांना संधी दिली. डॉ. किरसान यांना संधी नाकारल्यानंतरही त्यांनी दहा वर्षात संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला.

हेही वाचा : एकीकडे राम मंदिर सोहळा तर दुसरीकडे मोदींची मंदिरभेट मोहीम; भाजपाच्या रणनीतीला यश येणार?

मधल्या काळात काँग्रेसपक्षाचा जनसंपर्क कमी झाला होता. उमेदवारी मिळवायची पराभव झाला की घरी बसायचे, नेत्यांच्या या धोरणामुळे ही परिस्थिती ओढवली होती. या काळात डॉ. किरसान यांनी केलेल्या प्रयत्नांची पक्ष नेतृत्वाने वेळोवेळी दखल घेतली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीचा तेच चेहरा असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जिल्ह्यात लोहखनिज उत्खनन आणि त्यासंबंधी उद्योग सोडल्यास विकास आणि नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पेसा अंमलबजावणी, अधिकारासोबत ओबीसींच्या बाबतीत झालेले दुर्लक्ष यामुळे आदिवासी आणि ओबीसी समाजात नेत्यांविरोधात संताप आहे. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी लोकसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात उमेदवारांची नावे स्पष्ट होणार असले तरी वर्तमान परिस्थितीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे अनेकांची झोप उडाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : राजस्थान भाजपामध्ये मोठा बदल! प्रदेश सरचिटणीसांना हटवण्यामागे काय आहे खरे कारण?

विधानसभा निहाय बलाबल

अहेरी (गडचिरोली जिल्हा) – धर्मरावबाबा आत्राम(राष्ट्रवादी काँग्रेस)
आरमोरी(गडचिरोली जिल्हा) – कृष्णा गजबे (भाजप)
गडचिरोली(गडचिरोली जिल्हा)- डॉ. देवराव होळी(भाजप)
ब्रम्हपुरी (चंद्रपूर जिल्हा)- विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
चिमूर (चंद्रपूर जिल्हा)- बंटी भांगडीया (भाजप)
आमगाव (गोंदिया जिल्हा)- सहसराम कोरेटी (काँग्रेस)

२०१९ मध्ये उमेदवारांना मिळालेली मते

अशोक नेते (भाजप) – ५१९९६८
डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस) – ४४२४४२
रमेश गजबे (वंचित आघाडी) – १११४६८

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review of gadchiroli chimur dharmaraobaba atram mp ashok nete mahavikas aghadi print politics news css
Show comments