सोलापूर : वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला ठरलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ गेल्या १० वर्षात भाजपने टप्प्या टप्प्याने काबीज करून मजबूत केला आहे. त्या तुलनेत काँग्रेसची बांधणी विस्कटली असल्यामुळे यंदाची सोलापूर लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी होणे अपेक्षित होते. परंतु येथील एकूण वातावरण पाहता जागा राखणे भाजपसाठी कसोटी ठरली आहे. तर काँग्रेससाठी अर्थात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे याच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील दहा वर्षे निष्क्रिय ठरलेले भाजपचे दोन्ही खासदार, रखडलेला स्थानिक विकास, तिस-यांदा दिलेला उपरा उमेदवार हे प्रमुख मुद्दे घेऊन काँग्रेसच्या प्रणिती शिंदे रणांगणावर उतरल्या आहेत. तर भाजपचे राम सातपुते यांनी ऊसतोड मजुराचा मुलगा विरूध्द माजी मुख्यमंत्र्याची कन्या असा रंग देत धार्मिक ध्रुवीकरणावर जास्त भर दिला आहे. यातून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मागील सलग दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी भाजपसमोर उभे केलेले तगडे आव्हान भाजप सहज परतावून लावू शकत नाही, हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येते.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी पत्नी सुनीता यांनी केलेला अर्ज फेटाळला? काय आहे नियम?

मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपने वीरशैव लिंगायत समाजाशी संबंधित गौडगाव मठाचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना उभे केले होते. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या पाठिंब्यावर एक लाख, ७० हजार मते मिळाली होती. यातून भाजपविरोधी मतांची मोठी विभागणी होऊन शिंदे यांचा एक लाख ५८ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपविरोधी मतविभागणी टाळण्याच्यादृष्टीने वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांनी शेवटच्या क्षणी माघार घेऊन थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर एमआयएमनेही उमेदवार उभा केला नाही. या माध्यमातून दलित आणि मुस्लीम मतदार भाजपच्या विरोधात एकवटण्याची चिन्हे पाहता त्याचा लाभ काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय यंदा २०१४ आणि २०१९ सालच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा पंतप्रधान मोदी आणि भाजपसाठी पोषक वातावरण दिसत नाही. शेतक-यांचा सरकारविरोधी नाराजीचा सूर, मराठा आरक्षण आंदोलन, भाजपचा ‘चार सो पार’ चा नारा देण्यामागे संविधान बदलले जाण्याची आंबेडकरी समाजामध्ये दिसणारी सुप्त भीती, यातच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात आल्यामुळे बदललेली समीकरणे आदी बाबी काँग्रेससाठी पोषक ठरू पाहतात. परंतु त्याचा प्रत्यक्षात लाभ काँग्रेस कसा घेऊ शकते, यावर त्यांचे यशापयश अवलंबून आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार आदींनी प्रचार सभा घेतल्या आहेत.

हेही वाचा : भाजपाला ‘हुकुमशाही’ म्हणणाऱ्या प्रचारगीतावर निवडणूक आयोगाचा आक्षेप का? आपची टीका

दुसरीकडे, पाच आमदारांसह पक्ष संघटनेची ताकद, संघ परिवाराचे जाळे, वीरशैव लिंगायत आणि विणकर पद्यशाली समाजाची बांधिलकी या भाजपच्या भक्कम बाजू आहेत. सोलापूरचा विस्कळीत पाणीपुरवठा, उजनी धरणाचा पाणी प्रश्न, रखडलेली विमानसेवा, विमानसेवेच्या नावाखाली सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची पाडलेली चिमणी, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ, उड्डाणपूल, स्मार्ट सिटी प्रकल्पाचा फोलपणा या बाबी भाजपला अडचणीच्या ठरू शकतात. परंतु त्यावर मोदी सरकारने केलेली विकास कामे आखलेली हिंदुत्व अनुकूल धोरणे हेच भाजपचे भांडवल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या प्रचार सभेत आपण हिंदुत्वासह दलित, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत आगामी काळात भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान बदलण्याची भीती व्यर्थ असल्याचा निर्वाळा दिला. त्यांच्या प्रचार सभेने भाजपला बळ मिळाल्याचा दावा केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review of solapur bjp s ram satpute vs congress s praniti shinde print politics news css
Show comments