पालघर : बदललेल्या राजकीय परिस्थितीत गेल्या वेळी शिवसेनेने जिंकलेला पालघर मतदारसंघ आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडे कायम राहणार की भाजप ताब्यात घेणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. कारण भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुढाऱ्यांचे किती प्रमाणात पक्षांतर होणार तसेच बहुजन विकास आघाडीची भूमिका काय राहील यावरही मतदारसंघाची गणिते अवलंबून आहेत. पालघर हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभाव क्षेत्रातील असल्याने या मतदारसंघात शिंदे यांचीही कसोटी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाच्या मदतीने गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी झाले होते. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या मार्फत मतदार संघाला केंद्रातील निधी अथवा विशेष योजनांचे पॅकेज लाभले नाही. याउलट शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याने त्यांच्या वाट्याला राज्य सरकारकडून भरघोस निधी उपलब्ध झाला होता. त्यांचा दांडगा लोकसंपर्क पाहता ते आगामी निवणुकीत दावेदार राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ईडीचा ससेमिरा, शरद पवारांचे नातू अन् राष्ट्रवादीचे उदयोन्मुख स्टार; कोण आहेत रोहित पवार?

माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या कार्यकाळापासून उत्तर मुंबई व नंतर पालघर या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा लढतीमध्ये राहिला आहे. मतदार संघाच्या पुनर्ररचनेनंतर २००९ मध्ये पराभूत झालेल्या चिंतामण वनगा यांनी २०१४ मध्ये निवडून आले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत वनगा यांच्या पुत्राने शिवसेनेकडून निवडणूक लढविली. भाजपने मग काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना उमेदवारी दिली. पोटनिवडणुकीत भाजपचे गावित निवडून आले. २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीत पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. मग भाजपने आपले खासदार गावित यांना शिवसेनेच्या वतीने उभे करण्याची गळ घातली. गावित शिवसेनेकडून निवडून आले. यामुळे भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांची खासदारकी गावित यांनी भूषविली आहे.

बदलत्या परिस्थितीत भाजपा पालघरची जागा आपल्याला पुन्हा लढवायला मिळावी अशा भूमिकेत असताना शिवसेनेने (शिंदे गट) यांनी पालघर येथून धनुष्यबाणावर राजेंद्र गावित हेच निवडणूक लढवणार अशी घोषणा करून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच या घोषणेने राजेंद्र गावित यांना भाजपामधून निवडणूक लढवण्याची शक्यता हाणून पाडली. जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असला तरीही शिवसेनेने पालघर लोकसभेसाठी पक्ष स्तरावर नव्याने केलेल्या नेतेमंडळीच्या नेमणुकीमुळे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह नरेश म्हस्के व इतर नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेले पक्षीय मेळावे पाहता शिवसेना पालघरच्या जागेवर जोरदार दावा करण्याच्या स्थितीत असल्याबाबत एकंदर चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा : पांचजन्यमधून गंभीर आरोप; तरीही अयोध्या कार्यक्रमासाठी मूर्तींना विशेष आमंत्रण, कारण काय?

डहाणू मतदार संघावर पकड असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाने २०१८ पर्यंत लोकसभा निवडणूक दमदारपणे लढवली होती. २०१९ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. डहाणू तसेच विक्रमगड विधानसभा क्षेत्रांमध्ये कम्युनिस्ट पक्षाची अजूनही लक्षणीय ताकद असून “इंडिया” आघाडी तर्फे हा मतदारसंघ माकपला सोडण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

विद्यमान खासदार हे शिवसेना पक्षाचे असल्याने पालघरची जागा ‘इंडिया’ आघाडीतर्फे शिवसेनेला सोडण्यात यावी यासाठी देखील बांधणी सुरू आहे. या दृष्टिकोनातून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेतर्फे अनेक उमेदवारांची नावे पुढे येत असली तरीही त्यांच्याकडून उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचवण्यास विशेष कोणतीही योजना अथवा उपक्रम हाती घेण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्याने उमेदवारी जाहीर केल्यानंतर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेला कंबर कसून मेहनत करावी लागेल अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यामार्फत उमेदवारी देऊन इतर घटक पक्षांच्या मदतीने ही निवडणूक लढवावी असा मतप्रवाह देखील सुरू आहे. यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी अलीकडेच चाचपणी केली होती.

हेही वाचा : ठाकरे गटाला शह देण्यासाठी परभणीत महायुतीच्या तिन्ही पक्षांची स्वंतत्र मोर्चेबांधणी

२००९ मध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार पालघर म्हणून निवडून आला होता. त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने आगामी तीन निवडणूकीत पराभव पत्करला असला तरीही पोटनिवडणूक वगळता बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. आगामी निवडणुकीत बहुजन विकास आघाडी कोणत्या राजकीय विचारांच्या प्रवासी समरस होतात की स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे पसंत करतात यावर निवडणुकीची समीकरणे अवलंबून राहणार आहेत. सध्या पालघर लोकसभा अंतर्गत वसई, नालासोपारा व बोईसर या मोठ्या मतदार संघाच्या विधानसभा क्षेत्रात बहुजन विकास आघाडीचे आमदार निवडून आल्याने लोकसभा निवडणुकीत या पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पक्षाने निवडणूक लढविण्याचे योजिल्यास राजकीय परिस्थिती, त्यांचे जिल्ह्यातील बलाबल तसेच उमेदवाराची संपर्क कार्यक्षमता व प्रभावीपणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आपल्या पक्षाचा जिल्ह्यात जोर वाढत असल्याचे मतदारांपर्यंत पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून संभाव्य उमेदवारांसह स्थानिक नेते पक्षांतर करण्याच्या स्थितीत आहेत. निवडणुका जाहीर होईपर्यंत असे कार्यक्रम सुरू राहण्याची शक्यता असून पक्षांतर करणाऱ्या मंडळींचा कितपत प्रभाव राहील ही एक महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे.

हेही वाचा : ठाकरे गटासमोर जागा राखण्याचे कडवे आव्हान तर भाजपनेही कंबर कसली

आधी पराभव मग विजय

विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी सन २००४ मध्ये पालघर विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर त्याच जागेवर सन २००९ मध्ये विजेतेपद मिळवून कार्यकाळाच्या अखेरच्या वर्षात राज्यमंत्रीपद मिळवले होते. सन २०१४ विधानसभा व सन २०१६ मध्ये विधानसभा पालघर जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातून पराभव पत्करल्यानंतर सन २०१८ मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा मार्फत तर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर विजय संपादन गेला होता. त्यामुळे पराजय विजयाची मालिका साकारणारे राजेंद्र गावित आगामी लोकसभा निवडणूक लढवणार की पालघर विधानसभेकडे लक्ष केंद्रित करणार हा देखील सध्या चर्चेतील विषय आहे.

निवडणूक निकाल:

२०१९:
राजेंद्र गावित (शिवसेना) ५८०४७९, बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी) ४९१५९६

२०१८ पोट निवडणूक
राजेंद्र गावित (भाजपा) २७२७८२, श्रीनिवास वनगा (शिवसेना) २४३२१०

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review palghar cm eknath shinde bjp print politics news css
Show comments