२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (४ जून) होत आहे. देशाचे भवितव्य काय असेल, ते आता अवघ्या काही तासांनंतर स्पष्ट होणार आहे. एकीकडे सत्ताधारी एनडीए आघाडी विजयासाठीचे बहुमत प्राप्त करीत असली तरीही विरोधकांची कामगिरीही अनपेक्षितपणे सुधारलेली दिसून येत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर बाहेर आलेल्या एक्झिट पोल्समधील आकडेवारी खोटी ठरताना दिसत आहे.

हेही वाचा : 2024 Lok Sabha Election Result Live Updates : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात १३ हजारांचा फरक, बारामतीचा गड राखण्यासाठी लेकी-सुनेत चढाओढ

इंडिया आघाडीची दमदार कामगिरी

‘अब की बार, चारसों पार’, अशी घोषणा देत नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे एनडीएला ४०० पार जागा मिळण्याचा आत्मविश्वास होता. दुसरीकडे आम्हाला किमान २९५ जागा नक्कीच मिळतील, असा आत्मविश्वास इंडिया आघाडीने सात टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर व्यक्त केला होता. एक्झिट पोल्समधून बाहेर आलेला अंदाज एनडीए आघाडीच्या दाव्याला अनुकूल असला तरीही इंडिया आघाडीच्या कामगिरीत सुधारणा होईल, असे अंदाज वर्तविण्यात आलेले नव्हते. मात्र, याच्या अगदी विपरीत चित्र सध्या मतमोजणीमध्ये दिसत आहे. २०१९ च्या कामगिरीशी तुलना करता, इंडिया आघाडीने यावेळी अत्यंत दमदार कामगिरी करीत २२५ जागांवर आघाडी घेतली आहे. एकट्या काँग्रेस पक्षाला साधारण १०० जागांवर विजय मिळेल, असे चित्र दिसत आहे. २०१९ मध्ये इंडिया आघाडीला फक्त ९१ जागा मिळाल्या होत्या; तर काँग्रेस पक्षाला ५२ जागा प्राप्त झाल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीमधील कल लक्षात घेता, एनडीए आघाडीच्या ५० जागांमध्ये घट; तर इंडिया आघाडीच्या तब्बल १०० जागांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. अंतिम चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार असले तरीही हा कल पाहता, एक्झिट पोल्समध्ये करण्यात आलेले सगळे अंदाज फोल ठरल्याचे चित्र आहे.

मतमोजणीमध्ये उत्तर प्रदेशमधून समोर येणारे कल अत्यंत आश्चर्यकारक आहेत. मागील दोन्ही निवडणुका आणि राज्यांमध्ये भाजपाचा वरचष्मा असूनही इंडिया आघाडीला ४० हून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. एकट्या समाजवादी पक्षाला ३५ हून अधिक जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपाला सध्या ३४ जागांवर आघाडी मिळाली असून, काँग्रेस सात जागांवर आघाडीवर आहे. हे सुरुवातीचे कल असून, त्यामध्ये बदल होण्याची शक्यता गृहीत धरली तरीही असे चित्र सुरुवातीलाच उभे राहील, असे अंदाज एक्झिट पोल्समधून व्यक्त होताना दिसत नव्हते. त्यामुळे एक्झिट पोल्सचे सगळे अंदाज फोल ठरताना दिसत आहेत.

एक्झिट पोल्सनी काय अंदाज वर्तवले होते?

इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फार चांगली कामगिरी करणार नसल्याचे अंदाज बऱ्यापैकी सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवले होते. ‘न्यूज १८ मेगा एक्झिट पोल’नुसार, भाजपाप्रणीत एनडीए आघाडीला ३५५ ते ३७० जागा मिळतील, असा अंदाज होता. त्यातील एकट्या भाजपा पक्षाला ३०५ ते ३१५ जागा मिळतील, असे सांगण्यात आले होते. या एक्झिट पोलनुसार, इंडिया आघाडीला १२५ ते १४० जागा मिळतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यामध्ये एकट्या काँग्रेस पक्षाला ६२ ते ७२ जागा मिळतील, अशी शक्यता होती. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये ‘टुडेज् चाणक्य’चे एक्झिट पोल बऱ्यापैकी अचूक राहिले आहेत. यावेळी त्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, एनडीएला ३८५ ते ४१५ जागा, तर इंडिया आघाडीला ९६ ते ११८ जागा मिळतील, असे म्हटले होते. ‘दैनिक भास्कर’च्या एक्झिट पोलनुसार इंडिया आघाडीला १४५ ते २०१ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. दुसरीकडे ‘जन की बात’ एक्झिट पोलनुसार, त्यांना १४१ ते १६१ दरम्यान जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. ‘इंडिया टुडे – माय एक्सिस पोल’नुसार, इंडिया आघाडीला १३१ ते १६६ जागा मिळतील, अशी शक्यता होती. तर ‘सी व्होटर’ एक्झिट पोलने, इंडिया आघाडीला १५२ ते १८२ जागा दिल्या होत्या. ‘इंडिया न्यूज – डी डायनॅमिक्स’नुसार, इंडिया आघाडीला १२५ जागा मिळण्याची शक्यता होती. ‘रिपब्लिक भारत – मॅटराईझ पोल’नुसार, इंडिया आघाडीला ११८ ते १३३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता; तर ‘रिपब्लिक टीव्ही – पीएमएआरक्यू’ एक्झिट पोल्सनुसार १५४ हा आकडा सादर करण्यात आला होता. ‘एनडीटीव्ही’च्या एक्झिट पोलनुसार इंडिया आघाडीला १४८; तर ‘इंडिया टीव्ही – सीएनएक्स’नुसार १०९ ते १३९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

हेही वाचा : दमदार कामगिरीसाठी कोणत्या पाच गोष्टींवर काँग्रेसचे लक्ष?

२०१९ मध्ये काय होती स्थिती?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला ३०३ जागा प्राप्त झाल्या होत्या; तर एनडीए आघाडीला एकूण ३५२ जागा मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीमध्ये ५२ जागा प्राप्त करून काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानी राहिला होता; तर तत्कालीन यूपीए आघाडीला फक्त ९१ जागा मिळाल्या होत्या.

२०१४ मध्ये काय होती आकडेवारी?

२०१४ मध्ये पहिल्यांदा मोदी लाट आली होती. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच भाजपाला २७२ च्या जादुई आकड्याच्या पल्याड जाता आले होते. २८२ जागा प्राप्त करीत एनडीए आघाडीने एकूण ३३६ जागा मिळविल्या होत्या. याआधी १९८४ साली काँग्रेस पक्षाला अशा प्रकारचे मोठे बहुमत मिळविता आले होते. २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्या होत्या. ती काँग्रेसच्या इतिहासातील आजवरची सर्वांत खराब कामगिरी ठरली होती. यूपीए आघाडीला फक्त ६० जागा मिळाल्याने विरोधी पक्ष कमकुवत झाले होते.