उत्तर प्रदेशमध्ये एकेकाळी सत्तेत असलेला बहुजन समाज पार्टी हा पक्ष सध्या आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना दिसतो आहे. संपूर्ण देशभरात उमेदवार उभे करणाऱ्या काही मोजक्या राष्ट्रीय पक्षांपैकी एक असलेल्या बसपाला आता आपल्या घरातच मोठा फटका बसला आहे. बसपाला उत्तर प्रदेशमध्ये एक जागाही प्राप्त करता आलेली नाही. त्यामुळे, मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचे भवितव्य काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या निवडणुकीमध्ये बसपाने संपूर्ण देशभरात ४२४ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये बसपाने सर्वच्या सर्व म्हणजे ८० जागा लढवल्या होत्या.

हेही वाचा : सत्ताधारी ‘आप’ला पंजाबमध्ये फटका; भाजपा शून्य तर काँग्रेसला ‘इतक्या’ जागांवर आघाडी

गेल्या निवडणुकीत दहा जागा; आता शून्य

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, बसपाने समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दलासोबत युती केली होती. तेव्हा बसपाला दहा जागा प्राप्त झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये बसपाने ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. उत्तर प्रदेशमधील बहुतांश जागांवर बसपा तिसऱ्या अथवा चौथ्या स्थानावर गंटागळ्या खात आहे. निवडणूक आयोगाने सायंकाळी पाच वाजपेर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बसपाला संपूर्ण देशभरात जवळपास २ टक्के मते मिळवता आली आहेत. २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्यांचा मतटक्का चार टक्क्यांच्या आसपास होता. उत्तर प्रदेशमध्ये, बसपाचा मतटक्का ९.३२ टक्क्यांवर आला आहे. २०२२ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बसपाला १२.८८ टक्के मते मिळाली होती. त्या निवडणुकीमध्ये पक्षाला फक्त एक जागा प्राप्त करता आली होती.

या लोकसभा निवडणुकीमध्ये, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी संपूर्ण देशभरात ४० सभांना संबोधित केले होते. त्यांनी ३० सभा एकट्या उत्तर प्रदेश राज्यात घेतल्या होत्या. मायावतींचा भाचा आकाश आनंद हा त्यांचा राजकीय वारस असेल, असे म्हटले जात होते. बसपाच्या अनेक प्रचारसभांचे नेतृत्वही तो करत होता. मात्र, प्रचार ऐन भरात आलेला असताना मायावतींनी आकाश आनंद यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरुन हकालपट्टी केली. सीतापूरमधील प्रचारसभेत वैमनस्य वाढवल्याचे कारण पुढे करत त्यांना पदावरुन हटवण्यात आले.

मुस्लीम मतांवर स्वार होण्याचा प्रयत्न फसला

या लोकसभा निवडणुकीमध्ये, इतर सर्व राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेमध्ये बसपाने सर्वाधिक मुस्लिमांनी उमेदवारी दिली होती. बसपाने उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी तब्बल ३५ जागांवर मुस्लीम उमेदवार उभे करत दलित आणि मुस्लीम मतांवर स्वार होण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या २० टक्के आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्षानेही बसपावर जोरदार हल्ला चढवला होता. बसपा पक्ष भाजपाची बी टीम असून तो भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही इंडिया आघाडीने केला होता. मात्र, बसपाला मुस्लीम उमेदवार देऊनही मुस्लिमांची फारशी मते मिळवता आलेली नाहीत. एकेकाळी दलितांची मते मिळवून सत्ता उपभोगणाऱ्या बसपाला यावेळी दलितांचीही मते मिळवता आलेली नाहीत.

हेही वाचा : Loksabha Election Results 2024भाजपाला फटका! तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालवर पुन्हा वर्चस्व

चंद्रशेखर आझाद – दलितांचा नवा आवाज

उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये दलितांचा आवाज म्हणून बसपा पक्षाकडे पाहिले जात होते. मात्र, बसपाचा राजकीय प्रभाव दिवसेंदिवस घटत चालला असून दलित नेते चंद्रशेखर आझाद आता दलितांचे नेते म्हणून पुढे येत आहेत. त्यांनी नगिणा मतदारसंघातून तब्बल दीड लाख मताधिक्याने विजय संपादीत केला आहे. चंद्रशेखर आझाद यांनी इंडिया आघाडीमध्ये प्रवेश केलेला नव्हता. त्यांनी आझाद समाज पार्टी (कांशीराम) या पक्षाकडून निवडणूक लढवली. त्यांनी भाजपाचे ओम कुमार आणि समाजवादी पार्टीचे मनोज कुमार यांना मागे टाकून विजय प्राप्त केला आहे.