लहान भाऊ कोण व मोठा कोण या प्रश्नाचे नेमके करायचे तरी काय? प्रश्नच पडलाय अनेकांना. राजकारणात जरा कुठे चांगले वा वाईट घडले की एकमेकांची खेचण्यासाठी हा प्रश्न हमखासपणे वर आणला जातो. आता संजय राऊतांचेच बघा ना! हरियाणात काँग्रेस हरताच ते वदते झाले. आता मोठा व छोटा असे काँग्रेसने करू नये. यावर नाना पटोलेंनी बोलायची काहीच गरज नव्हती, पण ते स्वत:चा फोन बंद ठेवत असल्याने समोर आलेले कॅमेरे हाच त्यांच्या लोकसंपर्काचा आधार असतो. त्यामुळे घेतला त्यांनी आक्षेप त्यावर. मग काय राऊतच ते. कशाला संधी सोडतील. मग ते पुन्हा काँग्रेसला खडे बोल सुनावते झाले. अहो, नाना कशाला त्या राऊतांच्या तोंडी लागता? वाद घालण्यात त्यांचा हात कुणीच पकडू शकत नाही हे ठाऊक आहे ना तुम्हाला.

रोज सकाळी उठून वाहिन्यांसाठी ‘नरेटिव्ह’ सेट करायचे व दिवसभर साऱ्यांना त्यात खेळवत दमवून टाकायचे याचा आनंद (असुरी नाही) राऊतांना किती होतो हे ठाऊक तरी आहे का तुम्हाला? भलेभले हैराण असतात त्यांच्या या खेळामुळे. ते त्यात इतके माहीर झालेत की एखाद्या दिवशी विरोधकांना डिवचण्यासाठी विषय मिळाला नाही तर आघाडीतील मित्र पक्षांनाच ते चिमटे काढतात. या चालीत तुम्ही अडकताच कशाला नाना! राऊतांना काय? केवळ हाच खेळ खेळायचा. दुसरी जबाबदारीच नाही त्यांच्यावर. तुमच्यावर तर पक्षातले विरोधक व युतीतले मित्र सांभाळणे अशी दुहेरी जबाबदारी. त्यामुळे या लहान-मोठ्याच्या सापळ्यात अडकूच नका. पराभवाचे म्हणाल तर दोन दिवसांत विसरतात लोक. तेव्हा जरा काळ शांत राहून पुन्हा आम्हीच कसे वयाने, अनुभवाने (उंचीने नाही) मोठे असे सांगणे सुरू करा. फक्त हा वाद सुरू करताना ‘स्टॅमिना’ कायम राहील तेवढे बघा. कारण राऊत कधी दमत नाहीत. बाकी वादाच्या या खेळात हेही राज्य हातून निसटून जाईल याची काळजी तुम्ही दोघांनी करण्याची गरज नाही. मंथन करण्यासाठी आहेत की राहुल व उद्धवजी. ते बघत बसतील कुणाला दोषी ठरवायचे ते.

श्री. फ. टाके