अहो, राजे ना तुम्ही! मग त्याप्रमाणे वागा की जरा. आब राखून. बोटीत काय बसता. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक शोधायला काय जाता. परतल्यावर दिसलेच नाही असा आव काय आणता. संभाजी महाराज, नाही शोभत तुम्हाला हे. नागपूरचे ‘देवाभाऊ’ बरोबर बोलले यावर. दहा वर्षांपूर्वी शोधायला का गेला नाहीत म्हणून. अहो, तुमचा स्वराज्य पक्ष इटुकला. तरी प्रत्येक निवडणुकीत तो घेऊन तुम्ही इकडे तिकडे फिरत असता. राजवाड्यातील कुणाला उमेदवारी मिळाली की त्याला गुंडाळून ठेवता. आता किमान वडील आघाडीत तर तिकडे राहा ना सुखाने. कशाला तिसऱ्या आघाडीच्या उचापती करता. आता तुम्हाला स्मारक आठवले पण रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काय केले असे कुणी विचारले तर? पंचाईतच व्हायची की तुमची. एकेकाळी तुम्हीच म्हणत होते, स्मारके नको, किल्ले संवर्धन हवे. काय झाले त्याचे? असे ठिकठिकाणच्या तंबूत जाऊन पदे मिळत नाहीत हे कळत कसे नाही तुम्हाला? युतीच्या मदतीने तुम्ही राज्यसभेवर असताना स्मारकासाठी काय केले? पद गेले की स्मारकाची आठवण ही सर्वपक्षीय व्याधी आहे राज्याला लागलेली. उगाच कशाला ती अंगाला लावून घेता?

हेही वाचा : छगन भुजबळ यांचे निवृत्तीचे संकेत

कधी जरांगे तर कधी आंबेडकरांची वंचित. कधी मोदींची तारीफ तर कधी मातोश्रीला भेट. विश्वासार्हता जाते हो या अशा ‘रोटेशन’ पद्धतीच्या वागण्याने. घरातच ‘फितुरी’ हा आळ येतो तो वेगळाच. त्यापेक्षा एकाच ठिकाणी स्थिर राहा की जरा काळ. राजकारणात संयमाला महत्त्व असते हे पार विसरूनच गेला तुम्ही. तुमची विचारधारा नेमकी कोणती? पुरोगामी की प्रतिगामी हे एकदा वाड्यात निवांत बसून ठरवा. राजकीय स्वार्थासाठी समुद्राच्या उधाण वाऱ्याशी पंगा घेऊ नका. केवळ राजकारणासाठी मतलबी वारे कानात शिरू देऊ नका. समुद्रातले खारे वारे तर नकोच नको. महाराज, द्याल का याकडे लक्ष जरा!

-श्री.फ.टाके

आपटीबार