सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर आणि त्यांनी निवडून आणलेले आमदार यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सक्रिय आहेत. परंतु यास तालुक्यातील नरखेड गावचे असलेले पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यात अनेक दिवसांपासून कमालीचा संघर्ष पाहायला मिळतो. हा संघर्ष कधी राष्ट्रवादी एकसंघ असताना शरद पवार यांच्यासमोर तर कधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर उजेडात आला होता. पवार काका-पुतण्यांकडून आतापर्यंत हा संघर्ष मिटविण्याच्या दृष्टीने कधीही हस्तक्षेप झाला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मोहोळ तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय राजन पाटील यांच्या अनगर गावात मंजूर झाले आहे. त्यास सर्वपक्षीय नेतेमंडळींचा प्रखर विरोध असून त्यातून उमेश पाटील यांच्याच पुढाकाराने वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. अजित पवार यांच्या मोहोळमधील जनसन्मान यात्रेच्या वेळी अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात ‘मोहोळ बंद’ पाळण्यात आला. त्याचवेळी अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याची आवई उठवण्यात आली होती. अखेर त्याची गंभीर दखल घेत, आपला दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, या शब्दात अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. अर्थात त्यांचा रोख उमेश पाटील यांच्याकडेच होता. त्यांनी राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आपली ताकद कायम राहणार असल्याचा निर्वाळा ही दिला. पण दोन नेत्यांमधील वाद मिटविण्यासाठी अजित पवार पुढाकार घेणार का, हा मूळ प्रश्न तसाच कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघ कळीचा मुद्दा

बैठक खंडपीठाची की राजकीय आखाडा?

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील वकिलांच्या संघटना, नागरिक दीर्घकाळ लढा देत आहे. याच प्रश्नावर कोल्हापुरात झालेली बैठक लक्षवेधी ठरली ती मूळच्या प्रश्नापेक्षा राजकीय टोमण्यांमुळे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील-खासदार धनंजय महाडिक यांच्यात टोकाचे वितुष्ट; पण दोघांनीही एकमेकांचा उल्लेख सन्मानपूर्वक केल्याने नवल होते. कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी पुन्हा इच्छुक असलेले शिंदे सेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भाषणावेळी सतेज पाटील यांनी तुमची जागा नक्की आहे का, अशी टिप्पणी केली. त्यावर ते तुम्हालाच अधिक माहीत, असे उत्तर देता क्षीरसागर यांनी आपण पुन्हा जिंकणार असे उत्तर दिले. कोल्हापुरातील खंडपीठासाठी बैठक घ्यावी असे पत्र खासदार धैर्यशील माने यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले आहे. तीन महिने झाले तरी काहीच प्रतिसाद मिळाला नाही. खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणेच हा विलंब आहे, अशी टिप्पणी खासदार शाहू छत्रपती यांनी करून हा प्रश्न लवकर सुटण्याबाबत अप्रत्यक्षपणे साशंकताच व्यक्त केली.

(संकलन : दयानंद लिपारे, एजाज हुसेन मुजावर)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chavdi solapur mohol rajan patil angarkar nationalist congress amy