यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या खासदारांचे विश्लेषण केले असता, १८ वी लोकसभा ही भारताच्या इतिहासातील आजवरची सर्वांत ‘वयस्कर’ अशी लोकसभा ठरली आहे. कारण- या १८ व्या लोकसभेतील खासदारांचे सरासरी वय हे ५६ आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भारतीय राजकारण्यांचे सरासरी वय आणि भारताची लोकसंख्या या दोहोंमध्ये असलेल्या विषमतेबाबतही चर्चा झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा : जेडीयूचा विरह नि प्रशांत किशोरांचा नवा राजकीय पक्ष; बिहारमधील राजकीय पेचात तेजस्वी यादव काय करणार?

निवडणूक लढविण्याचे वय २५ वरून २१ पर्यंत खाली आणण्यात यावे, अशी मागणी राज्यसभेतील आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी गुरुवारी केली. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी लोकसभेमध्ये याचसंदर्भात एक नवे खासगी सदस्य विधेयकही मांडले आहे. या विधेयकानुसार लोकसभेतील १० जागा वय वर्षे ३५ च्या खालील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी आहे. राघव चड्ढा (वय ३५) यांनी राज्यसभेमध्ये हा विषय छेडताना म्हटले की, भारताचे सरासरी वय संसदेमध्ये उमटायला हवे. आपल्या देशातील ६५ टक्के जनता ही ३५ वर्षांच्या; तर ५० टक्के जनता २५ वर्षांच्या खालील आहे. स्वत: राघव चड्ढा हेदेखील तरुण खासदारांपैकी एक आहेत. ते म्हणाले, “जेव्हा पहिली लोकसभा अस्तित्वात आली होती तेव्हा त्यावेळी २६ टक्के सदस्य हे चाळिशीच्या आतील होते. आता आपल्या १८ व्या लोकसभेमध्ये फक्त १२ टक्के सदस्य हे चाळिशीच्या आतील आहेत.” संसदेत निवडणूक लढवण्यासाठीचे वय कमी करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या ऑगस्टमध्ये कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्यायविषयक संसदीय स्थायी समितीने विधानसभा निवडणूक लढविण्याचे किमान वय २५ वर्षांवरून १८ वर्षे करण्याची शिफारस केली आहे.

लोकसभेचे वय

१९५२ साली भारतातील पहिली लोकसभा अस्तित्वात आली होती. खासदारांचे सरासरी वय ४६.५ वर्षे असलेली ही दुसरी सर्वांत तरुण लोकसभा होती. पहिल्या लोकसभेमध्ये चाळिशीतले वा त्याखालचे तब्बल ८२ खासदार होते; तसेच सत्तरी पार केलेला एकही सदस्य या लोकसभेमध्ये नव्हता. तेव्हापासून खासदारांचे सरासरी वय सातत्याने वाढतच गेलेले आहे. १९९८ मध्ये खासदारांचे वय सर्वांत कमी म्हणजेच ४६.४ वर्षे नोंदवले गेले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी १९९९ च्या निवडणुकीनंतर सर्वाधिक सरासरी वय ५५.५ वर्षे नोंदवले गेले होते. यावेळी १८ व्या लोकसभेतील खासदारांचे सरासरी वय ५६ वर्षांच्या वर गेले आहे. सध्याच्या लोकसभेमध्ये पस्तिशीच्या आतील फक्त ३५ खासदार आहेत. त्यातही फक्त सात खासदार हे तिशीच्या आतील आहेत. त्याआधी यापूर्वीच्या दोन लोकसभांमध्ये (२०१९ मध्ये २१ आणि २००९ मध्ये २२ खासदार) ३५ वर्षांपेक्षा कमी खासदारांची संख्या सर्वांत कमी होती. पहिल्या लोकसभेपासूनच ३५ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या खासदारांची संख्या सातत्याने घटत आहे.

हेही वाचा : मुंबईतून ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सहा लाख अर्ज; प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश

दुसऱ्या बाजूला संसदेतील ३८० खासदार हे ५१ वर्षे वा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यातीलही ५३ खासदार हे ७१ वर्षांहून अधिक वयाचे आहेत; तर १६१ खासदार हे ६१ ते ७० वयोगटामधील आहेत. ५० ते ६० वयोगटातील लोकांचे सभागृहात सर्वाधिक म्हणजेच ३०.६ टक्के प्रतिनिधित्व आहे. लोकसभेतील सर्वांत वयोवृद्ध खासदार म्हणजे द्रमुक पक्षाचे टी. आर. बाळू होय. तमिळनाडूमधील श्रीपेरंबुदुर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या टी. आर. बाळू यांचे वय ८२ असून, ते वयाची ऐंशी वर्षे पार केलेले लोकसभेतील एकमेव खासदार आहेत. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी वयाची २५ वर्षे पूर्ण असावी लागतात. या लोकसभेमध्ये वय वर्षे २५ असलेले फक्त तीनच खासदार आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील मच्छलीशहर मतदारसंघातून निवडून आलेल्या समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज आणि कौशांबी मतदारसंघातून निवडून आलेले पुष्पेंद्र सरोज, तसेच बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) समस्तीपूरमधून निवडून आलेल्या खासदार शांभवी चौधरी यांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारतीयांचे सरासरी वय हे २७.८ वर्षे आहे.