जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत. महायुती सरकारला सरकारी योजनांची जाहीरात करण्याकरिता अधिक वेळ उपलब्ध झाला आहे. परंतु दिवाळीनंतर निवडणूक असल्याने इच्छूकांचा खर्च वाढणार आहे

हरियाणा विधानसभेची मुदत ही ३ नोव्हेंबर तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभांची निवडणूक ही २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये एकत्र झाली होती. यंदा महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका वेगवेगळ्या होणार आहेत. हरियाणा विधानसभेसाठी १ ऑक्टोबरला मतदान होईल.

हेही वाचा…सोलापूरची सूत्रे पुन्हा मोहिते-पाटील यांच्याकडे

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याने अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी आहे. तसेच एवढ्या लवकर निवडणूक घेणे हे सत्ताधारी महायुतीसाठी सोयीचे नव्हते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, लाडका भाऊ आदी लोकप्रिय घोषणांचा लोकांना लाभ मिळाला तरच त्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. यामुळेच निवडणूक लांबणीवर जाणे हे सत्ताधारी पक्षाला आवश्यकच होते. याउलट लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या विरोधातील लोकांमधील कल किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील संताप अजून प्रगट होण्याकरिता विधानसभेची निवडणूक दिवाळीपूर्वी होणे महाविकास आघाडीसाठी फायद्याचे होते. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडी तर १७ जागा महायुतीने जिंकल्या होत्या. तेव्हा विधानसभा मतदारसंघांचा विचार करता महाविकास आघाडीला १६० च्या आसपास तर महायुतीला १२५ च्या आसपास मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. आधीच महायुती सरकारने लोकप्रिय घोषणांचा सपाटा लावला आहे. त्यात महायुतीकडे पुरेशी साधने असल्याने महाविकास आघाडीसाठी पाऊण महिना निवडणूक लांबणे गैरसोयीचे ठरणार आहे.

दिवाळीनंतर निवडणूक होणे हे महायुतीसाठी फायद्याचेच आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आताशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यात हे पैसे जेव्हा जमा होतील तेव्हा त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल. शेतकऱ्यांसाठी मोफत वीज,अन्नपूर्णा योजना या योजनांची जाहीरात सरकारने सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वी या योजनांची जाहीरात व्हावी यासाठी सरकारने २०० कोटींची तरतूद केली आहे.

हेही वाचा…Kolkata Rape Case: ‘आंदोलनामागे राजकीय षडयंत्र’; तृणमूलमधील काही आरोप; काहींचा आंदोलनाला पाठिंबा

इच्छूकांवरील ताण वाढला

दिवाळीनंतर निवडणूक होणार असल्याने सर्वपक्षीय विद्यमान आमदार, इच्छुकांना दिवाळीनिमित्त मतदारांना खुश करावे लागणार आहे. दिवाळीनंतर निवडणूक असल्याने खर्चात वाढ होणार असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. कारण दिवाळीत मतदारांना खुश करण्याकरिता खर्च वाढणार आहे. फटाके, आकाशकंदिल, मिठाई, अन्य भेटवस्तू वाटाव्या लागतील, अशी प्रतिक्रिया एका उमेदवाराने व्यक्त केली.