सातारा: सातारा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. मात्र पक्ष फुटीनंतर आणि मागील काही वर्षात भाजपाने केलेल्या पक्ष बांधणीनंतर या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची अस्तित्वासाठी लढाई सुरू असल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर १९९९ पासून जिल्ह्यावर या पक्षाचे वर्चस्व होते. पक्ष स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत दोन खासदारांसह नऊ आमदार निवडून आले होते. त्यामुळे राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता येण्यास मदत झाली होती. त्यानंतर आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यावर सत्ता होती. जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्रे- सातारा जिल्हा बँक, सातारा जिल्हा परिषद, सातारा जिल्हा खरेदी-विक्री संघ अशा अनेक छोट्या-मोठ्या संस्था पक्षाकडे होत्या. यामुळे अनेक कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी आणि अनेक आमदारांना मंत्रिपद मिळाले.

आणखी वाचा-हिंगण्यात मेघेंची हॅटट्रिक बंग रोखणार ?

परंतु २०१४ साली भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यानंतर हळूहळू जिल्ह्यातील पक्षाला खिंडार पडू लागले. एकामागे एक नेते बुरुज ढासळल्यासारखे पक्ष सोडत भाजपच्या दिशेने गेले. अगोदरच कमकुवत झालेला हा पक्ष दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर खूपच अशक्त झाला. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे वगळता पक्षाकडे नाव घ्यावे, असा नेताही उरला नाही. या पक्षफुटीनंतर पक्षाच्या जनाधारात घट झाली. त्यामुळे पक्ष अडचणीत आला. शरद पवार दैवत आहेत, असे म्हणणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि मकरंद पाटील हे दोन्ही आमदारही अजित पवार गटात सामील झाले. यातील रामराजे यांचा गट राजकीय सोय पाहत निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शरद पवार गटात सहभागी झाला. फलटण येथून निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती. तरीही आमदार दीपक चव्हाण, रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या पक्षात सामील झाले. आमदारकी टिकवण्यासाठी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन रामराजे अजित पवार यांच्या गटातच राहिले. आ. दीपक चव्हाण शरद पवार पक्षात गेल्याने सचिन पाटील यांना आयत्या वेळी भाजपमधून उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी द्यावी लागली.

आणखी वाचा-महायुतीत नाराजी टाळण्यासाठीच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर?

जिल्ह्यात कराड उत्तर बाळासाहेब पाटील, माण-खटाव प्रभाकर घार्गे, फलटणमध्ये दीपक चव्हाण, कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे, वाईतून अरुणादेवी पिसाळ हे पाच उमेदवार शरद पवार गटाचे आहेत. या पाचही मतदारसंघांत विरोधी उमेदवारांचे मोठे आव्हान आहे. माण खटाव मतदारसंघात पवार गटाच्या उमेदवारापुढे स्वपक्षीय असंतुष्टांना शांत करणे, त्यांची मोट बांधण्यांचेच मोठे आाव्हान आहे. एकसंघपणे प्रचार करण्याची सूचना शरद पवार, जयंत पाटील यांनी करूनही येथील वाद वाढत आहेत. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी तर निवडणुकीतून माघारच घेतली. फलटण, कोरेगाव, वाई येथील निवडणूक पक्षासाठी सोपी नाही. कराड उत्तरमध्ये भाजपचे मोठे आव्हान आहे. वाई मतदारसंघात मकरंद पाटील (अजित पवार पक्ष) यांच्या विरोधात लढण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारच न मिळण्याची नामुष्की पक्षावर आली होती. घाई गडबडीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मदतीने उमेदवार मिळवावा लागला. एकूणच कधी काळी बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची यंदा अस्तित्वासाठी लढाई मात्र सुरू आहे. शरद पवारांच्या प्रचारानंतरही विरोधकांना खूप मोठा धक्का बसेल, अशी काही परिस्थिती नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 sharad pawars ncp fight in satara district print politics news mrj