मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आल्यानंतर शिरोमणी महाराज बिजली पासी जयंतीच्या कार्यक्रमात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन उभारलं जाणार आहे अशी घोषणाच त्यांनी या कार्यक्रमात केली आहे. तसंच या कार्यक्रमाला आलेल्या उत्तर भारतीयांना संबोधित करताना तुम्ही इथे आलात, इथे राहिलात आणि इथलेच झाला आहात असंही म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी?
महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांची संस्कृती एकमेकांमध्ये मिसळून गेली आहे. तुम्हीही इथे आल्यानंतर महाराष्ट्रातलेच झाला आहात. तर तुमच्यामुळे आम्हीही वारंवार अयोध्येला जात आहोत. आम्ही लवकरच सगळया आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार आहोत तिथे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहोत.

अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारलं जाणार
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारलं जावं यासाठी मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं आहे. लवकरच अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारलं जाईल अशी महत्त्वाची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं तुम्ही खुश आहात ना?
पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं आहे तुम्ही सगळे खुश आहात ना? असा प्रश्न उपस्थित उत्तर भारतीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला त्यावेळी सगळ्यांनी एक सुरात हो असं उत्तर दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की आमच्या निर्णयामुळे संपर्ण देश खुश आहे असंही मला सांगितलं गेलं. आम्ही जिथे जिथे जातो तिथे लोक येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दोन-दोन तास थांबत आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद मला ओसंडून वाहताना दिसतो आहे. आमचा निर्णय योग्य असल्याचं यातून दिसतं आहे. आपलं सरकार हे जनतेचं सरकार आहे. सगळ्या जातीपातींना सोबत घेऊन आपल्याला विकास करायचा आहे. तुम्ही जिथे जिथे असाल तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. मी मुख्यमंत्री झालो आहे आता तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही काळजी करू नका असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आम्ही गुवाहाटीत गेलो होतो तेव्हा सर्वात आधी पासी समाजाने आम्हाला पाठिंबा दर्शवला होता. मी टीव्हीवरून पाहिलं होतं. उत्तर भारत आणि महाराष्ट्र यात काहीही फरक नाही. सर्व एकच आहे. तुम्ही जिथे राहता त्याबाबत आदरच बाळगता असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत पासी भवन उभारलं जाईल असंही आश्वासन आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी दिलं.

आमदारांना घेऊन आपण अयोध्येला जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. मात्र अयोध्येला नेमकं कधी जाणार ते स्पष्ट केलेलं नाही. शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर शिवसेना दुभंगली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांना घेऊन गुवाहाटीचा दौरा केला होता. आता सगळ्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे लवकरच सगळ्या आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra bhavan to be constructed in ayodhya soon announced chief minister eknath shinde scj