नाशिक : सध्या मंत्रिमंडळात कोणाचा सहभाग असणार, याविषयी वेगवेगळ्या नावांवर होणारी चर्चा म्हणजे केवळ अंदाज आहे, असे राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. मंत्रिमंडळात सहभागासाठी यावेळी मोठी स्पर्धा राहणार असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कायमच मंत्रिपदे कमी आणि इच्छुक जास्त असतात. सरकार स्थापन करणाऱ्या पक्षांची सदस्य संख्या नेहमी १६०-१७० इतकी असते. यावेळी ही संख्या २३३ पर्यंत गेली आहे. यात दोन-चार वेळा निवडून आलेल्यांचा समावेश आहे. त्यांची आम्हाला कधी मंत्रिपदे मिळणार, ही भावना असते. त्यामुळे त्यांना संधी दिली जाते. हे सर्व पक्षात होईल. नवीन-जुने चेहेरे दिले जातील. यातून मंत्रिमंडळात नवीन पिढी तयार होते, असे भुजबळ यांनी नमूद केले.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील मोटार अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

शिवसेनेइतकीच मंत्रिपदे राष्ट्रवादीला मिळावीत

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी (अजित पवार) आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना (एकनाथ शिंदे ) आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात शिंदे गटाइतकीच मंत्रिपदे आम्हाला मिळावीत, असा पक्षाचा आग्रह असल्याचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत आमदारांच्या झालेल्या बैठकीत स्ट्राईक रेटचा हिशेब करून यावर चर्चा झाली होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाला जास्त जागा मिळाल्याने त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या. तुलनेत अजित पवार गटाच्या जागा कमी होत्या. तरी महायुतीत अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकावर असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government formation chhagan bhujbal says discussion on cabinate just prediction print politics news css