अहिल्यानगरः राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जिल्ह्यात बारापैकी सात जागा लढवताना पाच ठिकाणी सभा घेतल्या. मात्र त्यातील केवळ एकाच जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. जिल्ह्यातील साखर कारखानदारांची संख्याही त्यांच्या पक्षातून यंदाच्या निवडणुकीतून कमी झालेली आहे. तुलनेत फुटीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अधिक जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे पक्ष उभारणीच्या नव्या बांधणीचं आव्हान शरद पवार यांच्या शिलेदारांना जिल्ह्यात स्वीकारावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील नगर मतदारसंघाची जागा लढवताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहापैकी कर्जत- जामखेड, श्रीगोंदे व पारनेर अशा तीन विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. उर्वरित तीन मतदारसंघातून भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले होते. मात्र राष्ट्रवादीला मताधिक्य मिळालेल्या पैकी केवळ कर्जत-जामखेडमधूनच रोहित पवार एकमेव विजयी झाले, तेही अत्यंत निसटत्या मतांनी. राज्यातील लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पक्ष स्थापनेचा रौप्य महोत्सवी मेळावा शरद पवारांनी अहिल्यानगर शहरात घेतला होता. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे चिंतन शिबिरही जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते. म्हणजे शरद पवार यांना जिल्ह्याकडून चांगल्या यशाची अपेक्षा होती. मात्र लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वाटचालीला खीळ बसली आहे. पक्षाला केवळ एकच जागा मिळाली.

हेही वाचा >>>विस्कळीत कारभारामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव; ज्येष्ठ नेते आत्मचिंतन करणार का?

शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी पक्षाला अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे बारापैकी पाच आमदार विजयी झाले होते. या पाचपैकी चार साखर कारखानदार होते. त्यानंतर झालेल्या सन २०१४ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रत्येकी तीन आमदार विजयी होत गेले. गेल्या सन २०१९ च्या निवडणुकीत मात्र पक्षाला आजपर्यंत मिळाले नाही इतके घवघवीत यश मिळाले आणि तब्बल सहा आमदार विजयी झाले होते.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मात्र शरद पवार यांच्या पक्षाची घसरण सुरू झाल्याचे दिसते. फुटीच्या वेळी सहापैकी प्रत्येकी तीन आमदार शरद पवार व अजित पवार यांच्याकडे गेले. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाने सात तर अजित पवार यांच्या गटाने पाच जागा लढवल्या. शरद पवार गटाला सातपैकी एक तर अजित पवार गटाला पाचपैकी चार जागांवर विजय मिळाला. या चारपैकी अजित पवार गटाकडून एकमेव साखर कारखानदार, आशुतोष काळे विजयी झाले आहेत. इतर तिघे साखर कारखानदार नसलेले आहेत. शरद पवार गटाचे विजयी झालेले रोहित पवार हेही साखर कारखानदारच आहेत.

हेही वाचा >>>कोकणातील ढासळलेले गड सावरण्याचे उद्धव ठाकरेंपुढे मोठे आव्हान

यंदाच्या महायुतीच्या लाटेपुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा निभाव लागला नाही. निवडूण आलेल्यांपैकी आमदार रोहित पवार जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या घडामोडीत फारसे लक्ष घालत नाहीत. राज्य पातळीवर नेतृत्व प्रस्थापित करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना पक्ष संघटना बांधणीसाठी खासदार निलेश लंके यांचाच एकमेव आधार मिळणार आहे. खासदार लंके यांनीही विधानसभा निवडणुकीत जिल्हाभर प्रचार सभा घेतल्या. मात्र त्यांच्या स्वतःच्या पारनेर मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा फटका त्यांना बसला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 ahilyanagar result sharad pawar first time defeat print politics news amy