अकोला : विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात तब्बल ३० वर्षांनंतर परिवर्तन घडले. मतदारसंघात आता काँग्रेसच्या यशाऐवजी भाजपच्या पराभवाचीच अधिक चर्चा रंगली आहे. अकोल्याच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव होऊच कसा शकतो, हा विषय सध्या राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आला. पक्षांतर्गत देखील या पराभवाची कारणमिमांसा शोधण्याची यंत्रणा कामाला लागली. भाजपला बंडखोरीतून झालेल्या मतविभाजनाचा मोठा फटका बसला. काही प्रमाणात हिंदुत्ववादी मतदान देखील विरोधात गेल्याने काँग्रेसच्या विजयाला हातभार लागल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड म्हणून ओळखला जात होता. सलग सहा निवडणुकांमध्ये भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी विजय मिळवला. त्यांच्या निधनामुळे ही जागा वर्षभरापासून रिक्त होती. भाजपमध्ये शर्मा कुटुंबातील सदस्यांसह इतर इच्छुकांनी उमेदवारीसाठी ओढाताण केली. पक्षाने माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यावरच विश्वास दाखवला. काँग्रेसने साजिद खान पठाण यांना पुन्हा मैदानात उतरले. लोकसभेत मतांचा टक्का वाढल्याने काँग्रेसचे मनोबल वाढले होते. स्व. गोवर्धन शर्मा यांच्या पश्चात अकोला पश्चिमचा गड कायम राखण्याचे आव्हान भाजपला पेलवले नाही.

हेही वाचा : नाना पटोलेंच्या भ्रमाचा भोपळा फुटला; साकोलीत लाजिरवाणा विजय!

अकोला पश्चिममध्ये सर्वधर्मीय मतदारांची संख्या मोठी आहे. हिंदू व मुस्लीम उमेदवार प्रतिस्पर्धी असल्याने निवडणुकीला धार्मिक रंग चढले. मुस्लिमांच्या गठ्ठा मतांसह काही प्रमाणात हिंदू मते मिळवण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीला यश आले. विशेष म्हणजे काँग्रेसने मुस्लिमांचे मतविभाजन टाळण्यासाठी टाकलेला मोठा डाव यशस्वी ठरला. काँग्रेसच्या डॉ. झिशान हुसेन यांनी वंचितची उमेदवारी घेऊन शेवटच्या क्षणी माघार घेतली. या माध्यमातून काँग्रेसने वंचितला कोंडीत पकडले. दुसरीकडे भाजपमधील नाराज इच्छुकांनी बंड केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा यांची बंडखोरी देखील काँग्रेसच्या दृष्टीने फायद्याचीच ठरली. भाजपने योगी आदित्यनाथांची सभा घेऊन ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारे देत हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. भाजपतील संघटनात्मक यंत्रणेला कामाला लावून मतदान वाढीवर देखील जोर दिला. बंडखोर अपक्ष हरीश आलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, राजेश मिश्रा या तीन उमेदवारांनी मिळून २६ हजारावर मते घेतली. त्याचा मोठा फटका भाजपला बसला. अवघ्या एक हजार २८३ मतांनी विजय अग्रवाल यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. हिंदुत्ववादी मतांच्या विभाजनाचा मोठा धक्का भाजपला बसला आहे, तर दुसरीकडे मुस्लिमांच्या मतांचे विभाजन टळणे काँग्रेससाठी फायदेशीर ठरले. त्यामुळे संपूर्ण राज्यात पक्षाची लाट असतांनाही अकोला पश्चिमचा भाजपचा बालेकिल्ला ढासळला. अकोला पश्चिममध्ये अविश्वसनीय निकाल लागल्याने त्याची चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा : UP Assembly Bypoll Election : तीन दशकांपासून हारत असलेल्या जागाही जिंकल्या, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही भाजपाची बाजी

दुरोगामी परिणाम?

अकोला पश्चिमच्या निकालामुळे राजकीय समीकरण बदलले असून त्याचे दुरोगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रनिहाय मतदान बघितल्यास भाजपचा प्रभाव असलेल्या भागात देखील काँग्रेसला दखलपात्र मते मिळाली. यावर भाजपला सखोल आत्मचिंतन करावे लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 akola west vidhan sabha bjp defeated by congress print politics news css