उठा, उठा, निवडणूक आली पक्षांतरांची वेळ झाली !

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात पक्षातरांचा माहोल जोमात असेल, असे चित्र दिसू लागले आहे.

Marathwada, Maharashtra Vidhan Sabha Election 2024,
उठा, उठा, निवडणूक आली पक्षांतरांची वेळ झाली ! (संग्रहित छायाचित्र)

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘ताकदवान’ भाजपमध्ये राजकीय भवितव्य आहे असे मानून पक्षात प्रवेश घेणारी मंडळी आता पर्याय चुकला का, याची तपासणी करत आहेत तर पक्षांतराच्या चाचपणीमध्ये आपण ‘शरद पवार’ याचे नेतृत्व स्वीकारले तर कसे, अशा उमेदवारांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण आंदालनकर्ते ते राजकीय पटलावर ताकद दाखविणाऱ्या मनोज जरांगे या नेत्याने उमेदवार उभे केलेच तर आपणही त्यात असावे, असे वाटणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाचा ढीग साचला आहे. ‘उताडा’ आला आहे अर्जाचा अशी जरांगे टीप्पणी करतात. त्यांच्याकडे राज्यातून ८०० पेक्षा अधिक अर्ज आले असल्याचे मनोज जरांगे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात पक्षातरांचा माहोल जोमात असेल, असे चित्र दिसू लागले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मराठवाड्यातून नऊ आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. यामध्ये मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, ज्ञानेश्वर चौगुले, बालाजी कल्याणकर, संतोष बांगर, प्रा. रमेश बोरनारे यांचा समावेश होता. या मतदारसंघात संघटना मजबूत करणे किंवा नवे उमेदवार ठरवणे उद्धव ठाकरे यांना आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी अनेकांना पक्षात प्रवेश द्यायला सुरुवात केली. पैठणमध्ये राष्ट्रवादीतून दत्ता गोर्डे यांना शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ यांनाही ‘ शिवबंधन’ बांधले. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्या विरोधातील उमेवार म्हणून राजू शिंदे यांना तर वैजापूरमध्ये प्रा. बोरनारे यांच्या विरोधात दिनेश परदेशी यांना प्रवेश देण्यात आला. या पूर्वी वैजापूर मतदारसंघातून भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही ठाकरे गटात उडी घेतली होती. मात्र, परदेशी यांच्या प्रवेशानंतर त्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. सिल्लोडमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांना नवा भिडू मिळवता आला नाही की, या मतदारसंघात मेळावाही घेता आला नाही. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर बीड, परभणी, धाराशिव, लातूर, जालना या मतदारसंघातून शरद पवार यांना भेटून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बाबा जानी दुर्रानी वगळता परभणीतून कोणी पक्ष बदलला नाही. धाराशिवमध्ये निवडणुकीस इच्छुक असणाऱ्यांनी जागा सुटली नाही तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या, असेही शरद पवार यांना सूचवून पाहिले असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ?

दोन महिन्यांपूर्वी पुस्तक प्रकाशानाच्या कार्यक्रमास आलेल्या शरद पवार यांना भेटण्यासाठी रिघ लागली होती. पण त्यानंतर पवार यांनी त्यांचे सारे लक्ष पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीत केल्याने मराठवाड्यातून त्यांना भेटून येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. विशेषत: बीड जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षात जाण्यासाठी चाचपणी करणाऱ्यांची संख्या खूप आहे. परळीमधून रत्नाकर गुट्टे यांचे जावाई राजेश फड यांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांना अद्यापि पक्ष ठरवता आलेला नाही. रमेश आडसकर, संगिता ठोंबरे, संजय दौंड, लक्ष्मण पवार या मंडळीची पक्षांतरांसाठी चाचपणी सुरू असल्याची चर्चा बीडमध्ये आहे.

नांदेडमधील पक्षांतराचा प्रवास काँग्रेस आणि भाजप आणि पुन्हा माघारी असा आहे. भास्करराव पाटील खतगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. त्यांच्याबरोबर भाजपात असणारे ओमप्रकाश पोकर्णाही काँग्रेसमध्ये परतले. सूर्यकांता पाटील आणि माधवराव किन्हाळकरही स्वगृही आले. आमदार जितेश अंतापूरकर वगळता मराठवाड्यातून भाजपात पक्ष प्रवेशाचे प्रमाण नगण्य असल्याचे चित्र आहे. आता पुन्हा काही जण नव्या पक्षांतराच्या तयारीत आहेत. येत्या चार-पाच दिवसांत त्याला वेग येईल असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – तरुणांना निवडणूक खुणावतेय, मात्र भवितव्य अधांतरी! प्रा. बदखल, डॉ. खुटेमाटे, बंडू धोतरे, डॉ. गावतुरे, ॲड. घोटेकर संधीच्या शोधात

लातूर जिल्ह्यात अर्चना पाटील चाकुरकर, बसवराज पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतला. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीपूर्वी होती. तेव्हा भाजप हाच शक्तिशाली पक्ष असल्याचे वातावरण होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपात जाण्यास इच्छुकांची संख्या घटली. त्यामुळे पुढील काही दिवस उमेदवारी अर्ज भरेपर्यंत राजकीय पटावर ‘उठा उठा निवडणूक आली, पक्ष ठरवण्याची वेळ आली’ असेच चित्र दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 leaders may start changing parties after candidate anouncement in marathwada print politics news ssb

First published on: 16-10-2024 at 12:56 IST
Show comments