सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची कोंडी करण्यासाठी एकास एक लढत निश्‍चित करण्यात महायुती यशस्वी ठरली आहे. सर्व विरोधक एकत्र आले असले तरी त्याचे मतात परिवर्तन कसे करतात यावर आमदार पाटील यांच्या स्वप्नातील मुख्यमंत्रीपदाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यात त्यांच्या पक्षाकडे चार जागा असून या सर्वच जागावर विजय संपादन करण्यासाठी आमदार पाटील यांची कसोटी लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार पाटील यांना मतदार संघातच गुुंतवून ठेवण्यासाठी महायुतीने केलेली व्यूहरचना यशस्वी ठरली आहे. त्यांच्या विरोधात उभारलेले इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, महायुतीच्या जागावाटपात इस्लामपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला देण्याबरोबरच उमेदवार म्हणून भोसले-पाटील यांना भाजपने दिले. यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात लढत होत आहे.

हेही वाचा : भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह

या मतदार संघामधून भाजपकडून राहूल महाडिक, विक्रम पाटील, शिवसेना शिंदे गटाकडून गौरव नायकवडी, आनंदराव पवार आदी इच्छुक होते. नायकवडी यांनी गेल्या निवडणुकीमध्ये ३५ हजारावर मतदान घेतले होते, मात्र, भोसले-पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून ४३ हजार मते घेतली होती. त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये आमदार पाटील यांना १ लाश १५ हजार मते मिळाली होती. यावेळी भोसले-पाटील विरूध्द आमदार पाटील यांच्यात सरळ लढत आहे. विरोधकांमध्ये ऐक्य घडवून आणण्यात राज्यस्तरिय नेत्यांना यश आले असल्याने यावेळी चुरस दिसून येत आहे.

आमदार पाटील यांनी सलग सात वेळा या मतदार संघाचे एकहाती प्रतिनिधीत्व केले आहे. आतापर्यंत विरोधकांमध्ये गैरमेळ हेच त्यांच्या विजयाचे महत्वाचे कारण मानले जात असले तरी विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मतांचे जाळे विणले आहे हेही मान्य करावं लागेल. मात्र, गेल्या ३५ वर्षाच्या कालखंडात मतदार संघातील विकास कामे का झाली नाहीत असा सवाल विरोधकांनी केला आहे, तर आष्ट्यात येउन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कासेगावमध्ये पोलीस ठाणे भाड्याच्या जागेत असल्याची टीका केली. मतदार संघाचे बारामती करतो म्हणणारे आमदार पाटील यांनी केवळ करामती करत गडावर वर्चस्व राखले असल्याचाही आरोप यावेळी झाला. उस उत्पादकांना साखर उतार्‍यानुसार दर का दिला जात नाही. पुणे जिल्ह्यातील कारखान्याच्या तुलनेत प्रतिटन २०० ते २२५ रूपये कुठे गेले असा सवालही उपस्थित करत आमदार पाटील यांना घेरण्याचे प्रयत्न केले आहेत. याला आता ते कशी मात करतात याकडे लक्ष असणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.

हेही वाचा : रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

आमदार पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत यात शंका नाही. त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठीचे गाजर मतदार संघाच्या जिव्हाळ्याचा विषय करून यावेळी नाही तर कधीच नाही अशा पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. राज्यातील सर्वोच्च पद मिळण्याची संधी भविष्यात येईलच असे नाही असे सांगून सहानभुती निर्माण करण्याचा आणि विरोधकांचा डाव उलटविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहेत.

हेही वाचा : आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?

भोसले-पाटील विरोधकांचा चेहरा म्हणून मैदानात उतरले असून गतवेळी विरोधात असलेले आमदार सदाभाउ खोत यावेळी प्रचारात जातीने सहभागी झाले आहेत. पाणंद रस्ते, उसदर, मागील फरक देयके आदी मुद्दे उपस्थित करून करोना काळात केलेली वैद्यकीय सेवा, प्रकाश मेडिकलच्या माध्यमातून दिली जात असलेली आरोग्य सुविधा या बाबीबरोबरच थेट नगराघ्यक्ष निवडीत मिळालेली मते यावर त्यांचा जोर आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी राजू शेट्टी यांना मदत केल्याचा आरोप पक्षातीलच काहींनी केला होता. यावेळी खा. माने हे त्यांच्या प्रचारात आहेत, याचबरोबर आरोपात तथ्य असेल तर शेट्टी यांची सहानभुतीही त्यांना मिळेल. राज्य सत्तेचे पाठबळ आणि आमदार पाटील यांना असलेला छुपा विरोध संघटित झाला तरच चमत्काराची अपेक्षा, अन्यथा मागील पानावरून पुढे चालू.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 sangli constituency ncpsp jayant patil vs nishikant bhosale patil print politics news css