नागपूर : लोकसभेइतकीच किंवा त्याहीपेक्षा अधिक आक्रमकपणे भारतीय जनता पक्ष या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. सध्या पक्षाकडे असलेल्या जागा कायम ठेवतानाच विरोधकांच्या जागा कशा खेचून आणता येईल, यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि सावनेर या अनुक्रमे राष्ट्रवादी व काँग्रेसकडे असलेल्या दोन जागांवर भाजपने सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. यामागे आजी-माजी गृहमंत्र्यांमधील राजकीय संघर्ष तसेच जिल्ह्यातील राजकारणावरील वर्चस्वाचा वाद कारणीभूत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सावनेर, उमरेड आणि काटोल या तीन जागा काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) या विरोधी पक्षांकडे आहेत. उर्वरित तीनपैकी दोन जागा भाजपकडे आणि एक जागा शिंदेसेनेकडे आहे. सध्या भाजपकडे नसलेल्या तीनपैकी काटोल आणि सावनेर या दोन जागांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जागांसाठी पूर्ण शक्ती झोकून दिली आहे. रविवारी या दोन्ही मतदारसंघांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होणार आहे.

हेही वाचा – मोदी विदर्भात येऊन नागपूरला येणे का टाळतात ? लोकसभेनंतर विधानसभा निवणुकीतही प्रचिती

सावनेर मतदारसंघ

सावनेर हा काँग्रेस नेते सुनील केदार यांचा बालेकिल्ला आहे. त्यांचे जिल्ह्यातील एक हाती वर्चस्व मोडून काढण्याचे प्रयत्न यापूर्वी भाजपने केले होते. त्यात त्यांना यश आले नाही. २०१९ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर केदार मंत्री झाले. त्यानंतर त्यांची जिल्ह्यावरची पकड मजबूत झाली. जिल्हापरिषेदेतील भाजपची सत्ता त्यांनी हिसकावून घेतली. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला विजयी करण्यात केदारांची भूमिका महत्वाची होती. त्यामुळे ते भाजपच्या हिटलिस्टवर आले. त्यांच्याविरुद्धच्या बँक घोटाळा प्रकरणाचा जलदगतीने न्यायनिवाडा झाला. त्यांना शिक्षा झाल्याने ते अपात्र ठरले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी रामटेकमधून दिलेल्या उमेदवाराला रिंगणातून बाद करण्यात आले. तरीही काँग्रेस जिंकली. त्यामुळे भाजपची नामुष्की झाली. त्यामुळे भाजपचा केदार यांच्यावर राग आहे. या निवडणुकीत त्यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार देता यावा म्हणून काँग्रेसमधील त्यांचे पारंपरिक विरोधक आशीष देशमुख यांना पक्षात घेऊन त्यांना सावनेरची उमेवदवारी देण्यात आली. यंदा केदार यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अनुजा रिंगणात आहेत. मात्र अनुजांचा पराभव म्हणजे केदारांचा पराभव हे सुत्र स्वीकारून येथे भाजप कामाला लागली आहे. केदार याला कसे पुरून उरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा – ‘बाळापूर’ दोन्ही शिवसेनेसह वंचितसाठी आव्हानात्मक, लढतीला धार्मिक रंग; मतविभाजन निर्णायक

काटोल मतदारसंघ

नागपूरला लागून असलेला काटोल मतदारसंघ भाजपला आतापर्यंत फक्त एकदा (२०१४ ) जिंकता आला. मात्र हा मतदारसंघ भाजपने आजवर कधीच प्रतिष्ठेचा केला नाही. यावेळी मात्र चित्र वेगळे आहे. आजी-माजी गृहमंत्र्यांमधील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी यामागे आहे. याची सुरुवात २०२९ पासून झाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काटोलचे विद्यमान आमदार अनिल देशमुख गृहमंत्री होते. त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांचे मंत्रिपद गेले, तुरुंगवास झाला. या सर्व प्रकरणांमागे फडणवीस असल्याचा जाहीर आरोप देशमुख यांनी केला. त्यांचे अलीकडेच प्रकाशित झालेले पुस्तकही चर्चेत आहे व त्यात देशमुख यांनी तुरुंगवासातील घटनाक्रम नमुद केला आहे तो कसा खोटा आहे हे फडणवीस यांनी सांगितले. न्या. चांदीवाल यांच्या मुलाखतीतला संदर्भ यासाठी देण्यात आला. अनिल देशमुख यावेळी रिंगणात नाहीत, त्यांचे पुत्र सलील हे निवणूक लढवत आहेत. पण ही जागा भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. खुद्द फडणवीस यांनी या मतदारसंघात सभा घेतली. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मतदारसंघात येत आहे. ते काय बोलणार या बाबत उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha elections 2024 two opposition constituencies on bjp target katol saoner fight salil deshmukh ashish deshmukh anuja kedar print politics news ssb