वसई- नालासोपारा मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसताना वसईत विधानसभेच्या जागेवर मात्र काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोघांनी दावा सांगितला आहे. १९९५ पासून शिवसेना या मतदारसंघातून निवडणूक लढवत असून मताधिक्य वाढत असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. दुसरीकडे हा कॉंग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघामुळे कॉंग्रेसतर्फे यंदा पाच जणांनी पक्षाकडे अर्ज भरला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेसच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे.

वसई विधानसभा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला. पक्षाचे सर्वेसर्वा असलेले हितेंद्र ठाकूर ६ वेळा येथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा पराभव झाला आणि पक्ष तिसऱ्या स्थानावर गेला. वसईतही पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. याच काळात महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी झाला. वसईत महाविकास आघाडीला चांगली मते मिळाली. वसईतील पारंपरिक ख्रिस्ती मतांबरोबर दलित आणि अल्पसंख्यकांची मते ही महाविकास आघाडीकडे वळली आहेत. त्यामुळे वसई विधानसभा महाविकास आघाडीला पोषक मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने वसई विधासभा मतदारसंघ जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. वसई हा सुरक्षित मतदारसंघ असल्याने यंदा कॉंग्रेसमधून ५ इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले आहे. त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय पाटील, पर्यावरण समितीचे समीर वर्तक, गाव वाचवा आंदोलनाचे ॲड जीमी घोन्साल्विस, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा आणि युवा नेता कुलदिप वर्तक यांचा समावेश आहे.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

विजय पाटील हे मूळचे कॉंग्रेसचे. मात्र २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. यंदा त्यांनी जोरदार तयारी केली आहे. वसई विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास नक्की झाले असताना आता शिवसेना ठाकरे गटानेही वसईवर दावा सांगितला आहे. लगतचा नालासोपारा जिंकण्याची शक्यात नसल्याने कॉंग्रेस आणि शिवेसना ठाकरे गट हे वसई मतदारसंघासठी आग्रही आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख हे वसई मतदारसंघातून इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ॲड भरत पाटील यांनी देखील आगरी मतांच्या जोरावर या मतदारसंघावर दावा सांगितला आहे.

मताधिक्य वाढत असल्याचा शिवेसनेचा दावा

१९९५ पासून शिवसेना या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मागील ६ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कधी जिंकला नसला तरी शिवसेनेचे मताधिक्य वाढत असल्याचा पक्षाचा दावा आहे. १९९५ आणि १९९९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे दिपक गवाणकर यांचा पराभव झाला होता. १९९५ च्या निवडणुकीत गवाणकर यांना ४७ हजार ८८८ मते (२४.७३ टक्के आणि १९९९ च्या निवडणुकीत ३४ हजार ९२४ मते (२३.१ टक्के) मिळाली होती. २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विवेक पंडित यांचा पराभव झाला तरी त्यांनी ९३ हजार ८०१ मते मिळावली होती. २००९ मध्ये हितेंद्र ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात नव्हते. तेव्हा शिवसेनेत असलेल्या विवेक पंडित यांनी जनआंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकली होती. त्यांना ४८.३५ टक्के मते (८१ हजार ३६८) मिळालेली होती. २०१४ साली पुन्हा शिवसेनेच्या पाठिंब्यावर विविक पंडित यांनी निवडणूक लढवली. त्यात पराभव झाला असला तरी त्यांना ३४.३ टक्के (६५ हजार ३९५ मते ) मिळालेली होती. २०१९ च्या निवडणुकीत विजय पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यांना ४०.५ टक्के (७६ हजार ९५५ ) मते मिळाली होती. २०२४ च्या पालघर लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेची कामगिरीही लक्षवेधी राहिली. संपूर्ण पालघर मतदारसंघात शिवसेनेला तब्बल ४ लाख १७ हजार ९३८ इतकी मते मिळाली. त्यात वसई विधानसभेतून शिवसेनेला ८८ हजार ८८८ इतकी मते मिळाली. या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपला ७८ हजार ३०७ तर बविआला ५० हजार ८६८ इतकी मते मिळाली आहेत. वसईतून पराभव होत असला तरी शिवसेना सातत्याने निवडणूक लढत आहे आणि हक्काची पारंपरिक मते वाढत आहे. शिवसेनचा जनाधार वाढत आहे. त्यामुळे वसई मतदारसंघ शिवसेनेला मिळायला हवा, असे शिवेसना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकद देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : सुजय विखे संगमनेरमधून निवडणूक लढण्याचे आव्हान स्वीकारणार?

काँग्रेस वसईवर ठाम

काँग्रेसतर्फे वसईतून ५ इच्छुक असले तरी विजय पाटील हे प्रबळ दावेदार आहे. त्यानी मागील निवडणुकीतील पराभवानंतरही मतदारसंघात आपली पकड निर्माण केली आहे. त्यांच्याकडे असलेली आर्थिक ताकद ही जमेची बाजू आहे. समोर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी सक्षम उमेदवार हवा आहे. दुसरीकडे कॉंग्रेस वसईच्या जागेवर ठाम आहे. कॉंग्रेस हा मतदारसंघ सोडायला तयार नाही.