सांगली : सांगली जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत महाविकास आघाडीतील गोंधळ संपता संपेना असे चित्र आहे. मिरज आणि खानापूर या दोन मतदारसंघांत उमेदवार निवडीवरून पेच निर्माण झाला आहे. तर सांगलीत महायुतीचा प्रचार सुरू झाला, तरी काँग्रेसचा उमेदवार ठरेना अशी स्थिती आहे. तर दुसरीकडे इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केला, तरी अद्याप तिथे सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) यांची नाराजी हटेना अशी सद्या:स्थिती आहे. या सर्व स्थितीमुळे जिल्ह्यात आघाडीतील गोंधळ संपता संपेना, असे चित्र आहे.

मिरज मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) आग्रही आहेत, तर खानापूरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आग्रही आहे. जर दोन्ही जागा दोन्ही काँग्रेसला मिळाल्या, तर जिल्ह्यात एकही जागा शिवसेना ठाकरे गटाला उरत नाही. यामुळे दोन्हींपैकी किमान एक जागा तरी शिवसेनेला (ठाकरे) मिळावी असा आग्रह धरला जात आहे. यामुळे दोन्ही जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. उद्यापर्यंत या जागेबाबतचा अंतिम तोडगा निघेल असे सांगितले जात आहे.

हेही वाचा : चैनसुख संचेती सातव्यांदा ‘मलकापूर ‘ रणसंग्रामात! मागील लढतीतील प्रतिस्पर्धीच रिंगणात, दुरंगी लढत अटळ

मिरज मतदारसंघातून काँग्रेसकडून मोहन वनखंडे, सी. आर. सांगलीकर यांची प्रबळ दावेदारी आहे, तर शिवसेनेकडून सिद्धार्थ जाधव, तानाजी सातपुते यांची दावेदारी आहे. तसेच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून बाळासाहेब होनमोरे यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. तर खानापूरमध्ये शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दावा केला असून, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी उमेदवारीसाठी वेळप्रसंगी राष्ट्रवादी (शरद पवार) अथवा शिवसेनेकडून (ठाकरे) लढण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे या दोन ठिकाणच्या जागेवरून महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये पेच निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांची जास्तीत जास्त जागा आपणास मिळाव्यात, अशी भूमिका आहे. या घोळामध्ये जिल्ह्यातील दोन जागांवरून पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा : मेळघाटमधून केवलराम काळे यांना भाजपची उमेदवारी; राजकुमार पटेलांना धक्‍का

दरम्यान, वरील दोन जागांचा गोंधळ संपत नसताना कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या सांगली मतदारसंघात पक्षाला अद्याप उमेदवार देता आलेला नाही. कॉंग्रेसमध्ये जिल्हा बँंकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील या दोघांनीही दावा केला असून, बंडखोरीचा इशारा दिला आहे. महायुतीचे भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांनी प्रचार सुरू केलेला असताना कॉंग्रेसला अद्याप उमेदवारही ठरवता आलेला नाही. दुसरीकडे इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केला, तरी अद्याप तिथे सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) यांची नाराजी हटेना, अशी सद्या:स्थिती आहे. या सर्व स्थितीमुळे जिल्ह्यात आघाडीतील गोंधळ संपता संपेना असे चित्र आहे.