यंदाच्या जत्रंत कुस्ती करायचीच, अन् कुठल्याही स्थितीत नावाजलेल्या पैलवानाला आस्मान दाखवायचंच असं ठरवून गावातील अर्धा डझन पैलवान गावच्या ओढ्यात घाम गाळत होती. घाम गाळता, गाळता चर्चाही करायची, सगळ्यांचा खुराक विभागून गेला तर एकाच पैलवानाची तब्बेत सुधारणार कशी असा रास्त सवाल एकमेकाला विचारत होती, मात्र, माघार कुणी घ्यायची यावर एकमत काही केल्या होईना झाले होते. वस्ताद मंडळी तुझीच जोड लावणार अस शपथेवर सांगत असल्याने माघार घ्यायची कुणाचीच तयारी नव्हती. जत्रंचा फड काही दिवसावर आल्या, हालगी वाजू लागली. तुतारींचा आवाज मैदानात घुमू लागला आणि अचानकपणे नावाजलेल्या पैलवानाचा पठ्ठ्याच मैदानात उतरून जोर बैठका काढत आवाज घुमवू लागला तसा हालगीबरोबरच घुमकीनेही ठेका धरला. आतापर्यंतची अर्धा डझन पैलवानांची ओढ्यात केलेली मेहनत वाया जाते की कुस्तीच नुरा होते याकडे जत्रेकरूंचे आता लक्ष लागले आहे.

राजशिष्टाचाराची ऐसीतैसी

निवडणूक आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता आहे. यातूनच आपापली कामे करून घेण्याकरिता मंत्रालयात सध्या नुसती गर्दी झाली आहे. मंत्रालयाच्या व्हरांड्यात चालणेही कधीकधी कठीण होते. आपली कामे मार्गी लागावीत ही सत्ताधारी महायुतीच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य आदी खात्यांमध्ये गर्दी होत आहे. मंत्र्यांची भेट घेऊन फाईलीवर स्वाक्षरी घेण्याकरिता कार्यकर्त्यांची रेटारेटी सुरू असते. कार्यकर्त्यांची मंत्र्यांच्या भेटीसाठी लगबग. दुसरीकडे, आपापल्या विभागांची कामे मार्गी लावण्यासाठी मंत्र्यांना झालेली घाई वेगळीच. मंत्रालयात मंत्र्यांकडून सचिवांना आपल्या दालनात पाचारण केले जाते. पण सध्या साऱ्यांनाच एवढी घाई झाली आहे की, मंत्रीही सचिवांच्या दालनांमध्ये जाऊ लागले आहेत. मुख्य सचिवांच्या कार्यालतही मंत्र्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. काहीही करून काम किंवा फाईल मार्गी लागले पाहिजे अशीच सर्व मंत्र्यांची भावना आहे. यासाठी चक्क राजशिष्टाचाराला मंत्र्यांनी खुंटीला टांगले आहे.